जनावरांच्या शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. टाकाऊ- विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणी हा शरीरातील सर्व क्रियांसाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. पशुव्यवस्थापनामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जनावरांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण जवळजवळ ५५-६० टक्के एवढे असते. शरीरातील एकदशांश पाणी जरी कमी झाले, तरी जनावर दगावण्याची शक्यता असते, असे प्रयोगातून दिसून अाले अाहे.
पाणी शरीराची लवचिकता टिकवून ठेवते. पचनक्रियेत अन्नघटक पाण्यात विरघळून त्याचे संपूर्ण शरीरात विलयन होते आणि शरीरातील सर्व पेशींना पोषणद्रव्यं पुरवली जातात. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. टाकाऊ- विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेचे शरीरावर होणारे परिणाम
पाण्याच्या आभावामुळे डोळे व कातडी कोरडी पडते. जनावरांच्या उत्पादन क्षमतेत अाणि वजनात घट होते. शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास अडथळा निर्माण होतो. मूत्रपिंड व मूत्राशयावर विपरीत परिणाम होतो. जनावरांची प्रजनन क्षमता ढासळते. जनावरांचे पाय बधिर होतात. शरीरातील रक्ताचे प्रमाण घटते. रक्त घट्ट होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण क्रियेत अडथळा निर्माण होतो. जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण खालील बाबींवर अवलंबून असते.
जनावरांचे पाणी पिण्याचे प्रमाण हे जनावराने खाल्लेल्या शुष्कभागावर अवलंबून असते. गाय दिवसाला साधारण ४५-६० लिटर पाणी ग्रहण करते. गायीने खाल्लेले शुष्क पदार्थ आणि पाणी पिण्याचे गुणोत्तर १ः३ एवढे असते. शेळ्या व मेंढ्या प्रतिदिवस ४-६ लिटर पाणी ग्रहण करतात आणि त्यांचे शुष्क पदार्थ आणि पाणी पिण्याचे प्रमाण १ः४ एवढे असते. वराहांना प्रतिदिन ६-८ लिटर पाण्याची गरज असते, तर कोंबड्या प्रतिदिन २००-२५० मिलि पाणी ग्रहण करतात. जनावरांचे पाणी व्यवस्थापन ः
जनावरांना नेहमी स्वच्छ, ताजे पाणी पिण्यास द्यावे. ते मुबलक प्रमाणात असावे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही पाण्याचा रंग, वास, चव, तापमान, पाण्यातील गढूळपणा, पाण्याचा सामू आणि त्यात मिसळलेले क्षार, जैविक तत्त्व, जीवाणू इत्यादी बाबींवर अवलंबून असते. मुळात नैसर्गिक पाणी हे रंगविरहित असते. पाण्याला रंग हा त्यात मिसळलेले जैविक तत्त्व, धातू आणि अणुऊर्जा यामुळे येत असतो. पाण्याला हिरवट रंग हा पाण्यातील वनस्पती, पालापाचोळा इत्यादीमुळे येतो. जनावरांचे पिण्याचे पाणी हे स्वच्छ, रंगहीन असावे. गढूळ पाणी जनावरांना पाजू नये. पिण्याच्या पाण्याला कुठलाही वास नसावा. पाण्याला वास त्यात मिसळलेल्या जैविक तत्त्व, धातू, मातीचे कण इत्यादीमुळे येतो. नदीच्या, तलावाच्या पाण्यात कुजलेले गवत, झाडे-झुडपे, मेलेले जीवजंतू इत्यादींमुळे दुर्गंधी येते. कुठल्याही प्रकारची दुर्गंधी येणारं पाणी जनावरांना पाजू नये. अशा प्रकारचे पाणी रोगराईचे कारण होऊ शकते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याला उग्र चव नसावी. कीटकनाशके, कारखान्यातील विषारी पदार्थ, गवत कुजून तयार होणारे घटक, नदीतील पाण्याची चव बदलू शकतात. अशाप्रकारचे पाणी जनावरास पाजू नये. पाण्याचे तापमान खूप कमी किंवा जास्त नसावे. पाण्याचा रंग किंवा गढूळतेनुसार पाण्यातील दूषितपणा ओळखण्यास मदत होते. विहिरीच्या पाण्यामध्ये पुष्कळसे इतर पदार्थ असतात. यामुळे जनावरांना विहिरीचे पाणी देण्यापूर्वी पाण्याची अशुद्धतेसाठी चाचणी करून त्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक अशुद्धता ओळखण्याकरिता पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा. जैविक परीक्षणासाठी निर्जंतुक बाटलीमध्ये पाण्याचा नमुना गोळा करावा आणि प्रयोगशाळेत रंग, पाण्याचा जडपणा, नायट्रोजन, सल्फर, सूक्ष्म क्षारतत्त्व, विषारी घटक, जीवाणूंचे प्रमाण, प्रदूषणाची पातळी या गोष्टींकरिता परीक्षण करावे. हंगामानुसार पुरवा जनावरांना पाणी
दुभत्या जनावरांना पाणी दिवसातून दोनदा देण्यापेक्षा चारवेळा दिल्यास जनावरे १५ ते २० टक्के अधिक दूध देतात. उन्हाळ्यात जनावरांना मुबलक आणि योग्य तापमानाचे पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. दूध देणाऱ्या गाईंना एक वेळा जरी कमी पाणी मिळाले, तर त्यांचे दूध देण्याचे प्रमाण २०-२५ टक्क्यांनी कमी होते. उन्हाळ्यात जनावरांची पाणी पिण्याची गरज वाढते. परंतु, पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास जनावरे गरजेपेक्षा कमी पाणी पितात, त्यामुळे पाण्याची साठवण किंवा व्यवस्था सावलीत करावी, जेणेकरून पाण्याचे तापमान योग्य राहून जनावरे मुबलक पाणी ग्रहण करतील. जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरे कमी पाणी पितात. कारण हिरव्या चाऱ्यामार्फत त्यांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागविली जाते. कारण हिरव्या चाऱ्यामध्ये ६५-८५ टक्के पाणी असते व १५ ते ३५ टक्के शुष्क भाग असतो. मात्र उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, त्यामुळे अशा काळात जनावरे सुका चारा जास्त प्रमाणात खातात आणि त्यामुळे त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. सुक्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण फक्त १०-१५ टक्के एवढे असते. कळपात नवीन आणलेली जनावरे शक्यतो पाण्यातील बदलामुळे पाणी कमी पितात. अशावेळी पाण्यात थोडा गूळ मिसळून पाजावे म्हणजे नवीन जनावरे ते आवडीने पितात. दुभती जनावरे, गाभण जनावरे, लहान वासरे, भाकड जनावरे यांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे. जनावरे आजारी पडल्यास ती पाणी कमी प्रमाणात पितात. अशा जनावरांच्या पाणी पिण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवावे. जनावरांच्या सुरक्षिततेसाठी पाण्यातील घटकांचे प्रमाण
सामू | ६ ते ८.५ |
एकूण द्रवणीय घनपदार्थ | १००० मि.ग्रॅ. प्रतिलिटर पाणी यापेक्षा कमी. |
नायट्रेटचे प्रमाण | ० ते ४५ मि.ग्रॅ. प्रतिलिटर पाणी. |
सल्फेटचे प्रमाण | ५०० मि.ग्रॅ. प्रतिलिटर पाणी यापेक्षा कमी. |
क्लोराइड्सचे प्रमाण | २५० मि.ग्रॅ. प्रतिलिटर पाणी यापेक्षा कमी. |
संपर्क ः डॉ. गणेश गादेगावकर, ९८६९१५८७६० (पशुपोषणशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)