विविध आजारांत जसे अभ्यंगाचे चांगले परिणाम दिसून येतात, तसे स्वास्थ्य टिकविण्यासाठीही उपयोग होतो. अभ्यंग केव्हा करू नये, नेमके कोणते तेल वापरले पाहिजे यासंबंधीचे ज्ञान असायला हवे. फक्त सणालाच नाही तर रोज अभ्यंग करून अारोग्य टिकविता येते.
आबालवृद्धांना हवाहवासा वाटणारा विशेषतः लहान मुलांना प्रिय असणारा सण दिवाळी! ज्योतीच्या तेजाने उजळलेले वातावरण मन प्रसन्न करते. प्रथेप्रमाणे दिवाळीला प्रत्येक घरी अभ्यंगस्नान केले जाते. सुगंधी तेल अंगाला लावून उटणे लावणे व स्नान करणे ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे.
दिवाळीमध्ये वातावरणात थोडा गारवा आलेला असतो. वातावरण एकदम बदलल्याने त्वचा कोरडी होऊ लागते. बदामाचे तेल, चंदन तेल लावून अभ्यंग केल्यास मऊपणा येतो. ज्यांची प्रकृती उष्ण आहे, त्यांनी खोबरेल तेल लावावे. तिळाचे तेल, मोहरीचे तेल टाळावे. फक्त सणातच (दिवाळीत) नाही तर रोज अभ्यंग करावे. त्यामुळे त्वचा मुलायम तर होतेच, शिवाय स्नायूंचे बल वाढते. सकाळी हाताची बोटे आखडत असतील तर रोज तेल लावल्यास चांगला परिणाम होतो. नवजात बाळाला साधे खोबरेलतेल अभ्यंगासाठी वापरावे. व्याधीप्रमाणे विचार केला तर सांधेदुखी, अंगदुखी, मानदुखी, पाठदुखी या सर्व प्रकारात अभ्यंगाचा चांगला परिणाम होतो. सांध्यांमधील सायनोव्हीअल फ्लुईड कमी झाल्याने झीज होते व सांधे दुखू लागतात. अशावेळी सहचर तेल, नारायण तेल यांसारख्या औषधी तेलाच्या अभ्यंगाचा फायदा होतो. आयुर्वेदिक पद्धतीने तयार औषधी तेल विविध प्रकारची असतात. नेमके कोणते वापरावे त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. जेव्हा सांधेदुखीसाठी अभ्यंग आपण करतो, तेव्हा तो भाग शेकला जाणे तेवढेच आवश्यक असते. गरम पाण्याची पिशवी, तव्यावर कापड ठेवून अशा कोणत्याही पद्धतीने शेक जरूर घ्यावा. याबाबतीत महत्त्वाचे म्हणजे सांध्यावर सूज असेल तर तेल न लावता वाळू गरम करून पुरचुंडीने शेकावे. फक्त तेलच नाही तर तुपानेही अभ्यंग करता येते. तळपायाला साजूक तूप रोज लावावे. अनेक स्त्रियांना पायात, पोटख्यांमध्ये पेटके येण्याची तक्रार असते. त्याचप्रमाणे हाताला मुंग्या येणे हे लक्षणही जाणवते. त्यासाठीसुद्धा पोटातल्या औषधांच्या जोडीला अभ्यंग केल्यास फायदा होतो. फक्त शरीराच्या त्वचेपुरतेच नाही तर केसांच्या आरोग्यासाठीसुद्धा अभ्यंग महत्त्वाचे असते. खोबरेल तेल, माक्याचे तेल किंवा जास्वंदीच्या तेलाने केसांच्या मुळांशी अभ्यंग केल्यास केसांच्या मुळांना पोषण मिळते. अर्थात औषधे सेवन करणे आवश्यक असते. पण केसांना तेल लावणे फार महत्त्वाचे आहे. बऱ्याचदा पोटाच्या तक्रारींसाठीही अभ्यंगाचा खूप उपयोग होतो. गॅसेस, जडपणा, अस्वस्थपणा असल्यास एरंड तेल नाभीभोवती गोलाकार चोळून शेकावे. चांगला परिणाम होतो. शारीरिक अनारोग्य नसले तरी उत्तम तब्येतीसाठी नियमित अभ्यंग जरूर करावे. नियमित अभ्यंग केल्यास शरीराचा जडपणा कमी होतो. उत्साह वाढून कामाची गती वाढते. स्नायूंचे बल वाढते. त्वचेचा पोत सुधारतो. स्नायू अखडणे, मुंग्या येणे, पाय दुखणे या वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारींना आराम पडतो. अभ्यंग कुणी करू नये ः ताप असताना, सांधे सुजलेले असताना अभ्यंग करू नये. खूप सर्दी आणि त्यामुळे असणाऱ्या अंगदुखीत अभ्यंग टाळावे. जेवण झाल्यावर ते पचायच्या आत लगेच अभ्यंग करू नये. पथ्य : अतिखारट, क्षारयुक्त पदार्थ, हरभरा, पावट्यासारखे वातुळ पदार्थ, मैद्याचे पदार्थ, उदा. बिस्किटे, ब्रेड टाळावा. खूप शिळे अन्न सेवन करू नये. अभ्यंगाच्या जोडीला पथ्य सांभाळले तर स्वास्थ्य टिकवायला मदत होते. (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)