ऋतुनुसार काही आवश्यक बदल काही पथ्ये सांभाळावी लागतात. हिवाळ्यात ठराविक गोष्टी सांभाळल्या तर हिवाळा मानवणारा ठरून आरोग्य संपन्न राहील.
हिवाळ्यात होणारे काही आजार व उपाय
हवेतील गारवा कित्येक वेळा सर्दी, डोके दुखणे, खोकला, ताप ही लक्षणे उत्पन्न करतो. अशावेळी गरम पाणी प्यावे. तुळस, गवती चहा, दालचिनी घालून पाणी उकळावे व गाळून गरम स्वरुपात दिवसातून दोन वेळा तरी प्यावे. यामुळे सर्दी, खोकला लवकर कमी होतो. तव्यावर कापड गरम करून त्या कापडाने कपाळ, कानशिले हा भाग शेकावा. त्यामुळे डोके दुखणे कमी होते. रात्री झोपताना देठासहीत विड्याचे पान त्याला मध लावून खावे. यामुळे सर्दीचा त्रास पटकन कमी होतो. ज्यांना विड्याच्या पानामुळे तोंड येते त्यांनी हा उपाय एक दिवसाआड करावा. या पानात चुना, कात, सुपारी काहीही घालू नये. आल्याचा रस आणि मध हे चाटण २-३ वेळा घ्यावे छातीला तिळतेल लावून शेकावे. ज्येष्ठमध पावडर, पिंपळी पूर्ण असल्यास मधासह घ्यावे. त्यामुळे खोकल्याला लवकर आराम पडतो. लहान वानगीसाठी हा उपाय फलदायी ठरतो. ताप, अंगदुखी, थंडी अशी लक्षणे असल्यास पारिजातकाच्या पानांचा काढा दोन वेळ घ्यावा. अर्थातच बाकी आयुर्वेदिक औषधे आवश्यक असतातच. त्यासाठी तज्ञ वैद्यांचा जरूर सल्ला घ्यावा. हिवाळ्यामध्ये गारव्यामुळे गुडघे दुखणे, सांधे दुखणे ही लक्षणे विशेषतः स्त्रियामध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. सकाळी व रात्री या दुखण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी साधे खोबऱ्याचे तेल किंवा तिळतेल सांध्यावर लावून त्वरित गरम पाण्याच्या पिशवीने किंवा तव्यावर कापड गरम करून शेकावे. सुंठ पावडर, गुळवेलीचा काढा घ्यावा. सांध्यावर सुंठीचा गरम लेप लावावा. आणि वाळल्यावर काढून टाकावा. - रात्री पोटऱ्यांमध्ये पेटके येत असतील तर झोपण्यापूर्वी पोटऱ्यांना तेल हळूवार चोळावे आणि नंतर शेकावे. रोज हा उपाय केला तर पेटके येण्याचे प्रमाण कमी होते. वैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधी चिकित्सा लवकर सुरू करावी. त्वचा कोरडी पडणे व खाज येणे
त्वचा कोरडी पडणे, ओठांना भेगा पडणे, चेहऱ्याची त्वचा ताणली जाणे, हातापायांना खाज येणे, गांधी उठणे ही लक्षणे अनेक वेळा आपल्याला पहावयास मिळतात. त्यासाठी अंघोळीच्या आधी खोबऱ्याचे तेल किंवा तिळतेल कोमट करून लावावे. आणि त्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करावी. शक्यतो साबण न लावता उटणे किंवा त्रिफळा पूर्ण शरीराला लावावे. तेलामुळे त्वचेला स्निग्धपणा येतो. जो साबण लावल्याने निघून जातो म्हणून शक्यतो साबण लावू नयेत. आंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाचा पाला मिसळावा. त्वचेवर खाज येऊन गांधी उठत असतील तर आमसुलाचे पाणी त्वचेवर चोळावे. काळ्या मनुका भिजत घालून त्या मऊ झाल्यावर कुस्करुन कोळ करून प्यावा. योग्य औषधे त्वरित सुरू करावीत. हिवाळ्यात कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रथमपासून काळजी घ्यावी. आहारात दही, आंबट ताक, केळ्याचे शिकरण, केळी कमीत कमी असावे. पाणी भरपूर प्यावे. सकाळी व रात्री गरम पाणी प्यावे. लसूण, जिरे, आले, सुंठ, ओवा यांचा स्वयंपाकात जास्तीत जास्त वापर करावा. (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)