कृषिकेंद्रित ग्रामविकासासाठी सरपंचाने 'लीडर' व्हावे

सच्चिंद्र प्रताप सिंह
सच्चिंद्र प्रताप सिंह

राज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी कृषी विभागाच्या योजना प्रत्येक गावात आणि सामान्य शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी विविध उपक्रमांवर भर दिला आहे. अॅग्रोवन सरपंच महापरिषदेच्या निमित्ताने सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याशी साधलेला संवाद...

कृषी आयुक्त म्हणून तुम्ही ग्रामपंचायतींना काय संदेश द्याल?  गावाचा विकास म्हणजे ग्रामविकास आणि कृषी विकास असे मी मानतो. ग्रामपंचायतीचे लाभार्थी ९० टक्के हे शेतकरीच आहेत. मात्र, बहुतेक ग्रामपंचायतींची कामे अजूनही कृषिकेंद्रित झालेली नाहीत. जिल्हा परिषदेत कृषी कामकाजाचा आढावा घेणारी समिती आहे. तालुका पंचायत समितीतदेखील कृषी कामाचा आढावा घेतला जातो. मग, गावपातळीवर ग्रामपंचायतीमध्ये कृषीविषयक कामकाजाची समिती का नको ? अर्थात असा प्रश्न सरपंच मंडळींनी उपस्थित करायला हवा. हा प्रश्न सुटण्यासाठी स्वतः सरपंचांनी पाठपुरावादेखील करायला हवा. ग्रामपंचायतींनी आता ग्रामविकासाच्या योजनांबरोबरच कृषी ज्ञान, माहिती आणि तंत्राचा विस्तार करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

कृषिविषयक कामकाजात सरपंच कशा पद्धतीने पुढाकार घेऊ शकतील?  गावशिवारातील ग्रामविकास किंवा कृषी विषयक कामांसाठी अनेक वेळा सरपंचांकडून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये भेटी दिल्या जातात. माझा आग्रह असा आहे की, सरपंचांनी शेतकरी आणि शेतीविषयक योजनांचादेखील पाठपुरावा करावा. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांमध्येदेखील सतत जावे. कृषी सहायक गावात येत नसल्यास सामान्य शेतकरी कृषी कार्यालयाला कळवू शकत नाही. मात्र, सरपंच हे काम करू शकतो.

विस्तार कामांमध्ये ग्रामपंचायतींचा प्रत्यक्ष सहभाग कसा घेता येईल ? गाव आणि त्याभागातील कृषी कार्यालये, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे यांची सांगड ग्रामपंचायती घालू शकतात. गावच्या शेतीला किंवा शेतकऱ्यांना नेमका कोठून कसा लाभ मिळू शकतो, याविषयी ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळू शकते. गावात कृषी विभागाची पीक प्रात्यक्षिके कशी वाढतील, नव्या प्रयोगांना चालना कशी मिळेल, खते-बियाणे-कीटकनाशके यांची उपलब्धता कशी वाढेल, शेतकरी गट कसे तयार होतील, या गटांची पुन्हा कंपनी कशी तयार होईल, अशा कितीतरी बाबी ग्रामपंचायतींना करता येतील. कृषिकेंद्रित गाव घडविण्यासाठी सरपंचाने 'लीडर' म्हणून काम केले पाहिजे. कृषी विभागाच्या विविध योजना गावशिवारात आणण्यासाठी पुढाकार घेतला तर गावाला कृषी केंद्रित आर्थिक सबलता मिळेल.

ग्रामपंचायतींमध्ये कृषी विभागाचा कर्मचारी जावा यासाठी नेमके काय प्रयत्न अपेक्षित आहेत ? राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कृषी विभागाचे महत्त्व ओळखून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला म्हणजेच कृषी सहायकाला ग्रामपंचायतीत बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. कृषी सहायकांकडे विविध योजनांची माहिती असते. ग्रामपंचायतीतून या योजनांचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. सरपंचांनी ग्रामपंचायतीत एक कृषी कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com