गुलाबापासून गुलकंद, गुलाबपाणी, सिरप अन् वाईनही..!

देशी गुलाबाची उपयुक्तता सांगताना जयश्रीताई यादव गुलाबालाकल्पवृक्षच मानतात. वाइननिर्मितीसहभविष्यात गुलाबापासून तेल निर्मिती करण्याचाही त्यांचा विचार अाहे.
गुलाब प्रक्रिया यशोगाथा
गुलाब प्रक्रिया यशोगाथा

पुणे शहरातील जयश्री यादव यांनी अत्यंत संघर्ष व अडचणींवर कसोशीने मात करीत गुलाब प्रक्रिया उद्योजिका अशी हुकमी अोळख तयार केली आहे. उत्कृष्ट दर्जा असलेल्या गुलकंद, गुलाबपाणी, सिरप, अावळा कॅण्डी आदी उत्पादनांचा स्वतःचा ब्रॅण्ड प्रस्थापित केला आहे. व्यवसायावरील या निष्ठेतूनच त्यांचा हा प्रवास अागळ्यावेगळ्या उत्पादनापर्यंत म्हणजे गुलाब वाइनपर्यंत पोचला अाहे. त्या अर्थाने उद्योगात त्यांनी केलेले हे सीमोल्लंघनच समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्शच ठरावे.  

सुखवस्तू घरात राहात असूनही काहीतरी उद्योग करावा, त्यातून संसाराला हातभार लागेल या हेतूने पुणे येथील जयश्री यादव यांनी ब्यूटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. त्यात १० ते १२ वर्षे त्या कार्यरत जरूर राहिल्या. परंतु याही पुढे जाऊन चांगली उद्योजिका होण्यापर्यंत मजल आपण मारू शकतो, हा आत्मविश्वास जागृत झाला. मनाने घेतलेली जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना.

‘इच्छा तेथे मार्ग’ अन् हीच होती संधी याच दरम्यान मैत्रिणीने ‘हर्बल कल्टिवेटिंग आणि प्रोसेसिंग’ व्यवसाय भागीदारीत करण्याचा विचार जयश्री यांच्यासमोर मांडला. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात गुलाबापासून पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. पण व्यवसायातील कायदेशीर अडचणींचे आव्हान पाहता मैत्रिणीला हा व्यवसाय पुढे करणे अशक्य वाटू लागले. हाच क्षण जयश्रीताईंसाठी महत्त्वाचा आणि कसोटी पाहणारा होता. मात्र खंबीरपणे त्याचा विचार करून त्यांनी पुढचे पाऊल उचलले.

उद्योजक होण्यामागील प्रयत्न एकदा उद्योजकतेची वाट पक्की झाल्यानंतर माघार घ्यायची नाही असे जयश्रीताईंनी ठरवले. गुलाबापासून गुलकंद, गुलाबपाणी बनविण्याचे ठरविले. गुलाबांसाठी त्या पुणे येथील फूल मार्केटमध्ये शेतकरी शोधायच्या. त्यांच्याकडून अाणि नातेवाइकांकडून फुले घ्यायच्या.

सुरुवातीला छोट्या प्रमाणात उत्पादने तयार करून परिचितांचे अभिप्राय घेतले. त्यातून विश्वास, हिंमत वाढत गेली. यात मुली गीतांजली, कश्मिरा अाणि भाच्यांची मोठी मदत झाली. पती कॉन्ट्रॅक्टर असल्याने कामात व्यस्त असायचे. मात्र जयश्रीताईंवर पूर्ण विश्वास टाकून व्यवसायात पूर्णपणे मोकळीक देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी पार पाडले.

खरे तर जयश्रीताईंनी शेतीची तशी काहीच माहिती नव्हती. त्यातच उद्योग म्हटला, की विपणन (मार्केटिंग) बॅंकेच्या कठोर नियमांचे पालन अशा अनेक गोष्टींशी सामना करावा लागे. मात्र सर्व अडचणींवर हुशारीने मार्ग काढत चिकाटीने जयश्रीताई लढत राहिल्या.

‘जयश्री प्रॉडक्ट्स’ची सुरवात साधारण २००० मध्ये जयश्रीताईंनी पुण्यातील पुनावळे येथे ‘जयश्री प्रोडक्ट्स’ कंपनी सुरू केली. देशी गुलाबांपासून गुलकंद, गुलाबपाणी ही उत्पादने तयार होऊ लागली. विविध आयुर्वेदिक दुकाने, नातेवाइक आदींना नमुना म्हणून उत्पादने देऊ लागल्या. संस्था, प्रदर्शनांमध्येही उत्पादने सादर करू लागल्या. उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्यानं ‘अाॅर्डर्स’ वाढत गेल्या.

जयश्रीताईंकडील उत्पादने

गुलकंद

  • संपूर्ण पारंपरिक व गुलाबी देशी गुलाबापासून गुलकंद बनविला जातो.
  • वेलची अाणि प्रवाळ भस्मयुक्त असे दोन फ्लेवर तयार केले जातात. त्यामुळे त्यांचे अाैषधी महत्त्व वाढते.
  • प्रवाळ भस्मामुळे गुलकंदातील कॅल्शिअमचे प्रमाण खूप वाढते. किलोला ४०० रुपयांप्रमाणे विक्री होते.
  • गुलाबपाणी

  • ऊर्ध्वपातन पद्धतीने गुलाब पाकळ्यापासून बनवले जाते.
  • १०० मि.लि. ते एक लिटरपर्यंत पॅकिंग. वर्षभर मागणी.
  • महिन्याला २०० ते ३०० लिटरपर्यंत    विक्री  
  • गुलाब अाणि वाळा सिरप

  • गुलाब अाणि वाळ्याच्या अर्कापासून सिरप बनवले जाते.
  • पाचशे मि.लि. अर्कात ३५ लिटर पाणी मिसळून सिरपचे एक लिटर बाॅटल पॅकिंग होते.
  • अावळा कॅण्डी

    अन्य उद्योजकांकडील अावळा कॅण्डीचे पॅकिंग करुन मार्केटिंग व विक्री

    जमीन खरेदीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा  

    एकीकडे उत्पादनांना मागणी वाढत होती. तर दुसरीकडे गुलाबाचा पुरवठा कमी पडू लागला. मग जयश्रीताईंनी गुलाबाची स्वतः लागवड करायचे ठरविले. त्यासाठी पुनावळे येथील प्रकल्पाची जागा विकून त्यातून जमीन विकत घेण्याचे ठरवले.

    नातेवाइकांच्या जागेत खादी ग्रामोद्याेग संस्थेच्या मदतीने चाकण येथे उत्पादननिर्मितीची तात्पुरती सोय केली. जमिनीसाठी मायलेकींनी पुण्याच्या अासपासचा परिसर पिंजून काढला. पण जागेचे गगनाला भिडलेले भाव पाहाता पुण्यापासून ६० किलोमीटरवर पाळू (ता. खेड) येथे १० एकर जमीन खरेदी करणे शक्य झाले. ही साधारण २०१५ ची गोष्ट.

    जमीन घेतल्यानंतर त्यात सुधारणा करून सहा एकरांवर देशी गुलाबाची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली. जवळच भामा आसखेड धरण असल्यामुळे पाण्याची सोय झाली.   गुलाबापासून वाइनही

    चिकाटीने अडचणींना तोंड देत उद्योगात जयश्रीताई स्थिर झाल्या. अनेक संस्थांतर्फे महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्याची संधी त्यांना मिळाली. गुलाबापासून सरबत, सिरप तयार होऊ शकते तर वाइन का नाही? असा विचारही त्यांच्या मनात अाला.

    कायम आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता तयार झालेल्या जयश्रीताईंनी गुलाबापासून घरीच वाइन तयार करण्याचा प्रयोग केला. प्रयोगशाळेत तपासणी करून इतरांना ती चाखण्यास दिली. ती पसंतीस उतरली देखील! असा प्रयोग यापूर्वी कुणीच केला नव्हता. मग या वाइनच्या पेटंटसाठी फाइलही दाखल केली. सर्व परीक्षणाअंती २००७ मध्ये गुलाब वाइनसाठी पेटंट मिळवण्यात जयश्रीताईंना यशही मिळाले.

    वाइननिर्मितीसाठी पुन्हा संघर्ष

    वाइननिर्मितीसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी मिळवण्यासाठी जयश्रीताईंनी प्रयत्न सुरू केले. कायदेशीर जाचक अटी अाणि परवाना पद्धतीमुळे त्यात अडचणी येत होत्या. सतत नऊ वर्षे सरकार दरबारी खेटे घातले. त्या काळात मुंबई ते पुणे असा अनेक वेळा प्रवास घडला. सरकार, अधिकारी बदलले. जयश्रीताईंच्या जिद्द अाणि संयमाचा कस लागला. उत्पादनांच्या व्यवसायाकडे थोडे दुर्लक्षही झाले. अखेर यंदा कष्टाचे फळ पदरात पडले. वाइननिर्मितीसाठी प्रायोगिक तत्त्वावर परवानगी मिळाली.

    आता वाकी (चाकण) येथे त्यासाठी जमीन खरेदी केली अाहे. येत्या फेब्रुवारीपर्यंत प्रकल्प सुरू होईल. हे गुलाबी स्वप्न साकार करण्यासाठी काटेही तितकेच वाट्याला आले.

      लेकींची मोलाची साथ

    जयश्रीताईंच्या दोन मुलींपैकी मोठी गीतांजलीचे लग्न झाले अाहे. उत्पादनाचे पॅकिंग, मार्केटिंगमध्ये तिची खूप मदत झाली. व्यवसायाच्या जागेच्या शोधासाठी धाकटी मुलगी कश्मिराची मदत मोलाची ठरली. उद्योगात अजून नवे घडवण्यासाठी मायलेकींचा प्रयत्न सुरू असतो.

    विक्री व्यवस्थापन

  • खादी ग्रोमोद्योग संस्थेतर्फे उत्पादनांची विक्री. यात यांना २० टक्के भागीदारी
  • विविध संस्था, आयुर्वेदिक दुकाने, विविध प्रदर्शनांतूनही उत्पादनांना मार्केट
  • उन्हाळ्यात सर्व उत्पादनांना अधिक मागणी.
  • एकूण उद्योगातून ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नफा
  • परदेशात जाऊन अभ्यास गुणवत्तेत अजून सुधारणा करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कश्मिराने जगभरातील वाइननिर्मितीतील अभ्यासक्रमांची माहिती घेतली. बारावीच्या शिक्षणानंतर अाॅस्ट्रेलियात वाइननिर्मितीचे अडीच वर्षाचे प्रशिक्षण घेतले.

    २०१६ मध्ये तुर्कस्थानात आईसोबत जाऊन गुलाबापासून तेल काढणाऱ्या उद्योजकाची भेट घेतली. तेथे दीड महिना ‘इंटर्नशिप’ केली. आता वाइनची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट ठेवण्याचा प्रयत्न राहील.

    जयश्रीताईंचा सन्मान   गुलाब विषयातील पुणे येथील ‘रोझ सोसायटी’ मंडळावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. देशी गुलाबाची उपयुक्तता सांगताना गुलाबाला त्या कल्पवृक्षच मानतात. भविष्यात गुलाबापासून तेल निर्मितीचाही मानस अाहे.

    संपर्क ः जयश्री यादव, ९३७२३११४१४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com