परभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे २०१७-१८ या वर्षात शेतीमाल तारण योजनेअंतर्गत ३७ शेतकऱ्यांना ४० लाख ४७ हजार ७६३ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या स्थितीत शेतीमाल तारण योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतीमाल तारण ठेवून त्यावर कर्ज उचलून आर्थिक गरजा पूर्ण करता येतात. बाजारातील शेतीमाल दरात वाढ झाल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतमाल तारण योजना राबवली जात आहे.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात बाजार समितीने ३७ शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यामध्ये २० शेतकऱ्यांना सोयाबीन तारण ठेवून २४ लाख १७ हजार ९३० रुपये, १० शेतकऱ्यांना तूर तारण ठेवून ६ लाख ३० हजार ५८५ रुपये, ७ शेतकऱ्यांना हरभरा तारण ठेवून ९ लाख ९९ हजार २१८ रुपये असे एकूण ४० लाख ४७ हजार ७६३ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
गतवर्षी मार्चअखेरपर्यंत १३ शेतकऱ्यांना तूर, मूग, सोयाबीन हा शेतमाल तारण ठेवून ३ लाख ७ हजार ५०० रुपये कर्ज देण्यात आले होते. यंदा शेतीमालाचे बाजारभाव हमी दरापेक्षा कमी असल्यामुळे शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.