सावधान! हवामान बदलतेय

हवामान बदलाचे सर्वाधिक फटके भारताला बसतील, असे यापूर्वीसुद्धा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितले आहे. याचा प्रत्यय आपणास सध्या येत असून त्याकडे शासन-प्रशासन डोळेझाक करतेय.
sampadkiya
sampadkiya

भारत हा हवामान बदलास जगात सर्वांत जास्त संवेदनशील देश असून, त्याचा मोठा फटका शेती क्षेत्राला बसेल, अशा इशारा एचएसबीसी बॅंकेने दिला आहे. खरे तर हवामान बदलाचे सर्वाधिक फटके भारताला बसतील, असे यापूर्वीसुद्धा अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितले आहे. याचा प्रत्यय आपणास सध्या येत असूनसुद्धा त्याकडे शासन-प्रशासन डोळेझाक करतेय, ही बाब अधिक गंभीर म्हणावी लागेल. मागील पावसाळ्यात देशातील अर्ध्या भागाला महापुराचा तडाखा बसला, तर अर्ध्या भागात कमी पाऊसमान झाल्याने पिकांची उत्पादकात घटली आहे. त्यानंतर हिवाळ्यामधील धुके, धुई, कधी अत्यंत कमी; तर कधी फारच जास्त थंडीने रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान केले.

आता उन्हाळ्यात दिवस-रात्रीच्या तापमानातील मोठ्या फरकाने फळे-भाजीपाला पिकांच्या वाढीवर परिणाम होतोय. पहाटे गारठा, तर दुपारी उन्हामुळे फळपिकांवर अनेक रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाचे मोठे खंड, ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस, गारपिटीने पिके उद्‌ध्वस्त होत आहेत. याचा अर्थ असा होतो, की भविष्यात शेतीचे भवितव्य धोक्यात येणार असून, त्याची सुरवात झाली म्हणावी लागेल. अशा परिस्थितीमध्ये हवामान बदलाचा बारकाईने अभ्यास करून त्यावर उपाय योजना करायला हव्यात. 

हवामान बदलाचे सर्वाधिक चटके हे जिरायती शेतीला बसत असतात. आपल्या देशात जिरायती शेतीक्षेत्र सुमारे ६० टक्के, तर राज्यात ते ८२ टक्के आहे. मागील काही वर्षांपासून वाढते तापमान आणि कमी झालेल्या पावसाने जिरायती शेती संकटात आहे. मागच्या तिन्ही हंगामात हवामान बदलाने शेतीचे नुकसान वाढले. आगामी खरिपावरसुद्धा सध्यातरी अनिश्चिततेचे सावट आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज अमेरिकेच्या हवामानतज्ज्ञांनी दिला आहे. भारतीय हवामानतज्ज्ञांनी मात्र यंदाच्या मॉन्सूनवर एल-निनोचा प्रभाव पडणार नसल्याचे सांगितले आहे. हवामानाच्या बाबतीत जागतिक हवामानाचे जसे स्थानिक परिणाम असतात, तसेच स्थानिक हवामानाचेसुद्धा जागतिक परिणाम असतात. आपला कल मात्र जागतिक हवामानकडेच अधिक असून, अंदाजामध्ये स्थानिक घटकांचासुद्धा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे.

सध्या अल्पकालीन हवामानाचे आपले अंदाज बऱ्यापैकी खरे ठरताहेत. परंतु, बदलत्या हवामान काळात शेतीचे नुकसान होणार नाही किंवा कमीत कमी नुकसान होईल, अशा निविष्ठा आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आता उपलब्ध व्हायला पाहिजे. त्याकरिता देशातील हवामान तज्ज्ञ आणि कृ.िषतज्ञ्जांना एकत्र काम करावे लागेल. दीर्घकालीन हवामानाचे अचूक अंदाज, त्यात विभागनिहाय पाऊस, खंड, अवकाळी पाऊसमान कधी, केव्हा, कसे राहील, याची माहिती हंगामापूर्वीच शेतकऱ्यांना मिळायला हवी. त्यानुसार पिकांची आणि त्यांच्या वाणांची निवड कशी करायची, लागवड तंत्रात काय बदल करायचे, हे शेतकऱ्यांना सांगावे लागेल. बदलत्या हवामानानुसार आपले कृषी संशोधन वाढवून त्याद्वारे विविध पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवावे लागतील. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवताना उत्पादन घटीच्या सर्वांत परिणामकारक हवामान बदल या घटकाकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष होता कामा नये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com