वृक्ष सन्मानातून वाढेल वनसंपदा

दक्षिणेकडे शेकडो नद्या वर्षभर वाहत असतात. वृक्षांचा या भागात सन्मान केला जातो. शासनापेक्षाही लोकसहभागामधून येथे वृक्षलागवड केली जाते व ती हमखास यशस्वीसुद्धा होते.
sampadkiya
sampadkiya

या वर्षीच्या द्विवार्षिक वन अहवालात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आढळल्या आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे दक्षिणेकडील सहा राज्यांत म्हणजे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि ओरिसामध्ये वृक्ष संपदा लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. मात्र, उत्तरेकडील सहा राज्यांत म्हणजे मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीममध्ये ती चांगलीच घसरलेली आहे. 

दाक्षिणेकडे वृक्षसंपदा वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डॉ. माधव गाडगीळ आणि डॉ. कस्तुरी रंगन यांनी वनश्रीने नटलेल्या पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनाची घातलेली कठोर नियमावली. या भागात अनेक ठिकाणे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित झाली आहेत. ४० टक्के पश्चिम घाट तसा गेलेलाच आहे; पण उरलेल्या ६० टक्के भागात विकासाचा दबाव असूनही बऱ्यापैकी संरक्षण झालेले दिसते. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळला याचा पूर्ण फायदा मिळाला आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणाचे मोजमाप एक हेक्टरपर्यंत सीमित करण्यात आल्यामुळे केरळमधील रबर शेती, काॅफी, कोको, नारळ यांसारखी वृक्षशेती या अहवालात मोजली गेलेली आहे, हाच प्रकार इतर दक्षिणात्य राज्यांतही घडला आहे. थोडक्यात, या सहा राज्यांमधील शेतकरी शाश्वत वृक्षशेतीकडे वळले आणि या अहवालास वेगळेच कोंदण चढले; पण यामधील शाश्वत जंगल हा शब्द पुसला गेला. दक्षिणेकडे शेकडो नद्या वर्षभर वाहत असतात. वृक्षांचा या भागात सन्मान केला जातो. शासनापेक्षाही लोकसहभागामधून येथे वृक्षलागवड केली जाते व ती हमखास यशस्वीसुद्धा होते. अर्थातच, या वृक्षांमुळेच या सहाही राज्यांवर वरुणराजाची कायम कृपा असते. 

उत्तरेकडील घनदाट जंगलात दिवसासुद्धा अंधार असतो, मग या भागात वृक्षसंपदेची नकारात्मक आकडेवारी का यावी? यासाठीसुद्धा अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य म्हणजे वातावरण बदल. हिमालयामधील बर्फ वितळून मोठमोठे कडे कोसळतात आणि त्यामध्ये हजारो वृक्षांचा बळी जातो. या भागात रस्ते बांधणी जोरात चालू असते. त्यामध्येसुद्धा पाइन, देवदार यांसारख्या शेकडो वर्षं आयुष्य असलेल्या वृक्षांना आहुती द्यावी लागते. पाइनसारख्या वृक्षांमध्ये टरपेनटाइन हा ज्वालाग्राही पदार्थ असतो. या भागात जंगल आगीमुळे प्रतिवर्षी हजारो वृक्ष नष्ट होतात. लाकडावर आधारित अनेक उद्योगधंदे या भागात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भागात नैसर्गिक वनसंपदाच सर्वत्र असल्यामुळे वृक्ष लागवडीचा सहसा प्रयत्न केला जात नाही. मातृवृक्षाकडून जी प्रभावळ निर्माण होते, तीच जंगल संवर्धनाचे कार्य करत असते. सध्या या सहा राज्यांत विकास कार्यक्रमावर जास्त जोर आहे. यासाठी जे वृक्ष तोडले जातात, तेवढे लावले मात्र जात नाहीत. टेहरी धरणासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन छेडले होते; पण असे प्रयत्न अपवादात्मकच झाले. 

पूर्वोत्तरेकडील वृक्षसंपदा कमी होण्यासाठी झुम शेतीसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. यामध्ये घनदाट जंगलामधील मोठमोठे वृक्ष तोडले जातात. नंतर त्यांना एकत्र करून जाळले जाते. यामुळे जमीन सुपीक बनते आणि त्यावर दोन तीन वर्षांनी भाताचे पीक घेतले जाते. भारताचे दक्षिण आणि पूर्वोत्तर टोक सोडले, तर मध्य भारताचे चित्र उत्साहवर्धक वाटते. मध्य प्रदेशला प्रथमपासूनच मोठमोठ्या जंगलांचे वरदान आहे, म्हणूनच २०१७ च्या अहवालात हे राज्य आघाडीवर आहे. नर्मदामातेच्या दोन्हीही तीरांवर भक्तांना पुढे करून केलेली वृक्ष लागवड हेही या राज्यातील वृक्ष लागवडीत आघाडीचे एक कारण आहे. नदीच्या तीरावर लावलेले हे लाखो वृक्ष डोळ्यांचे पारणे फेडतात. वृक्षांमुळे नर्मदा प्रदक्षिणा आता खूपच सुसह्य झाली आहे. एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात वृक्ष लागवडीचे अनेक प्रयोग या राज्यात झाले. 

बिहार, झारखंड, छत्तीसगड येथेही वनश्रीमंती वाढली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाना, राजस्थान, दिल्ली, गुजरात वनक्षेत्रात चढता आलेख दाखवितात; परंतु यामध्ये शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरची सलग शेतीही जबाबदार असू शकते. असाच प्रकार आसाम आणि पं. बंगाललाही लागू पडतो. वन अहवालात सर्वांत जास्त वृक्षसंपदा अंदमान, निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये आढळलेली आहे. लक्षद्वीपमधील ९० टक्के आणि अंदमानमधील ८१ टक्के जंगल म्हटले तर थोडे नकारात्मक आकडेवारी दाखवते. सुनामीमुळे या भागामधील हजारो हेक्टर जंगले समुद्रात वाहून गेली, त्यांचे उद्‍ध्वस्त अवशेष आजही तेथे पाहावयास मिळतात. येथील वृक्ष संपदा स्थानिक असल्यामुळे त्यांची पुन्हा लागवड करण्याचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. उपग्रहामधील आणि रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांत या शेकडो हेक्टर जागा वृक्षांअभावी मोकळ्या दिसतात. हे सर्व राखीव जंगल आहे आणि हा सर्व संवेदनशील अदिवासींचा अधिवास आहे. 

सिक्कीम हे माझे आवडते राज्य. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा हा भूप्रदेश स्थानिक वृक्षांवर नितांत प्रेम करतो. पर्यटनाचा आकर्षण बिंदू असलेले हिमालयातील हे छोटेसे राज्य आता उर्वरित भारताशी अनेक चकाकणाऱ्या सुंदर रस्त्यांनी जोडलेले आहे आणि अजूनही काम चालू आहे. सेंद्रिय शेतीसाठी येथील शेतकऱ्यांना जंगलाने जागा उपलब्ध करून दिली; पण जेवढे वृक्ष गेले, त्याच्या पटीत येथे तेवढी वृक्षलागवड झालेली नाही. सर्वत्र सूचिपर्णी जंगले असल्यामुळे वृक्ष लागवडीत अडथळा जरूर येतो. सिक्कीम विकासाच्या टप्प्यावरचे राज्य असल्यामुळे येथील वृक्षसंपदा ४७ टक्क्यांच्या आसपास घुटमळत आहे. 

२०१७ च्या केंद्र सरकारच्या वनसर्वेक्षणामध्ये सर्वांत मागे पडलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. या प्रगत राज्याची वनसंपदा जेमतेम १६.४७ टक्के आहे. वृक्ष लागवडीत गेल्या तीन- चार वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या या राज्याची वृक्षश्रीमंती आणि तिची सद्यपरिस्थिती, त्याची कारणे आणि उपाय हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा.  DR. NAGESH TEKALE : ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे  अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com