रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग

काळानुरूप समाजात बराच बदल झाला; पण महिलांच्या बाबतीत म्हणावी तेवढी सुधारणा झालेली नाही. ''स्त्री-पुरुष समानता'' या गोंडस नावाला आजही समाजमान्यता मिळालीच नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला घरकुटुंबासाठी काय काय करतात आणि पुरुषवर्गाने त्यांच्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
sampadkiya
sampadkiya
स्त्रियांचा खुल्या जगाशी परिचय झाला तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच! स्त्रियांनी शिकू नये... घराबाहेर येऊ नये... हे पाप असते. या खुळ्या कल्पना मोडीत काढण्यासाठी या दांपत्याला खूप त्रास सहन करावा लागला. म्हणून स्त्रियांनी सावित्रीबाईंचा वारसा अगदी धाडसाने चालवला पाहिजे. ग्रामीण भागातील बहुसंख्य मुलींचे प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षणच बंद होते. पालकांच्या अज्ञानामुळे महाविद्यालयीन शिक्षण सर्वच मुलींना घेता येत नाही. म्हणून आजच्या स्त्रियांनी अशा मुलींसाठी ''आधुनिक सावित्री'' होणे गरजेचे आहे. महिलांचा विचार केला तर परिवर्तनाच्या दिशेने त्या धाडसी पाऊल टाकत आहेत. जिद्द, प्रेम, त्याग, चिकाटी, सहनशीलता या गुणांची देण स्त्रियांना असते. म्हणून तिला ''शक्ती'' म्हटले जाते. या शक्तीचा उपयोग करून प्रत्येक क्षेत्रात ती पोचली आहे. क्रीडा, संगीत, अभिनय, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य या क्षेत्राबरोबर विज्ञान तंत्रज्ञानात त्या धडाडीने कार्य करताहेत. राष्ट्राच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोलाचे आहे. बचत गटांच्या माध्यमातून तर महिलांच्या जीवनात क्रांतीच निर्माण झाली आहे. गटाच्या माध्यमातून त्यांची बचतीची सवय वाढली आहे. एकमेकींच्या मदतीमुळे त्यांना जगण्यासाठी बळ मिळतेय. बचत गटांच्या माध्यमातून अनेक उद्योग त्या करताहेत, त्यातून त्या स्वावलंबी होत आहेत. त्यांच्यात संघटनकौशल्य निर्माण होत आहे. सरकारच्या लोककल्याणाच्या विविध योजनांची त्यांना माहिती होत आहे. बँकेच्या व्यवहाराची ओळख होत आहे. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्या धाडसी बनत आहेत. अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांनी श्रमदानातून रस्ते, दारूबंदी, आरोग्यविषयक जनजागृती, अनाथांना, अपंगांना अर्थसाह्य इत्यादी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. स्वबळावर उभे राहण्यासाठी महिलांचे हे वैचारिक परिवर्तन खूपच महत्त्वाचे वाटते. ग्रामजीवनातील स्त्रियांना तर खूपच कष्ट उपसावे लागतात. त्यांच्या कष्टाशिवाय शेती अपूर्णच आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या शेतात राबतात. स्वयंपाक करणे, पाणी भरणे, कपडे धुणे, मुलांची काळजी घेणे या घरच्या कामांसह शेत स्वच्छता मोहिमेपासून ते शेतमाल काढणीपर्यंत अनेक शेतीविषयक कामं स्त्रियाच करतात. फळे-भाजीपाला विक्रीतही महिलाच आघाडीवर आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलाच शेतीच्या कामात जास्त सहभागी होतात. महिलांची ही शेतीविषयक कामं आणखी सुकर व्हावीत, यासाठी विविध यंत्रांचा शोध लावणे गरजेचे आहे. शेतीची बहुतांश कामं स्त्रियांना वाकून करावी लागतात. त्यामुळे त्यांना पाठीचा, मानेचा त्रास होतो. कामाच्या व्यापात त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष तर होते, परंतु कर्ते पुरुषही याकडे लक्ष देत नाहीत. शेतीच्या कष्टाच्या कामातील महिलांच्या अडचणी सर्वांनी समजून घ्यायला हव्यात, तसेच त्यांचे शारिरीक कष्ट कमी करणारे यंत्र-अवजारे विकसित करण्यावरही भर द्यायला हवा. शेतीला जोडधंदा म्हणून कोंबडीपालन, दूध व्यवसाय महिलाच सांभाळतात. विविध शेतीपूरक, घरगुती व्यवसायातून दररोज ताजा पैसा कमावून कुटुंबाच्या दैनदिंन गरजा भागविणे, त्यातून थोडीफार बचत करून आर्थिक अडचणीत अनेक महिला हातभार लावतात. हे शास्त्र महिल्यांच्या अंगभूत असते, ते शिकण्यासाठी त्यांना कुठेही जावे लागत नाही, हे विशेष! हे करीत असताना त्यांना कधी, कुठल्या लाभाची... सन्मानाची अपेक्षा नसते. अनेक शेतकऱ्यांनी हतबलतेतून आत्महत्या केल्या आहेत. त्या वेळी हजारो स्त्रिया रणरागिनी झाल्या. शेती आणि कुटुंबाचा भार त्यांनी एकहाती पेलून दाखविला. शेती नसलेल्या ठिकाणी अनेक महिलांनी मजुरी करून कुटुंब चालवितात. शेतीतील त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात मात्र भेदभाव केला जातो. त्यांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जाते. ही दरी नष्ट होणे गरजेचे आहे. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील अखेरचा काळ आज आपण अनुभवत आहोत. काळानुरूप समाजात बराच बदल झाला; पण महिलांच्या बाबतीत म्हणावी तेवढी सुधारणा झालेली नाही. समाजाचा बारकाईने अभ्यास केला तर एक वेगळीच बाजू समोर येते. आणि तुकोबांच्या ''रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'' या अभंगाची प्रचिती देते. आभाळाला गवसणी घालण्याचे काम आजची स्त्री करत आहे. तरीही आम्ही स्त्रीला उपेक्षितच ठेवलंय. ठराविक वर्तुळाबाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषी मानसिकता वेळोवेळी धक्का देते. तिचे मोठेपण नाकारते. ती आजही असुरक्षित आहे. तिला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जात नाही. तिचे पंख छाटण्याचे प्रयत्न पुरुषप्रधान संस्कृतीकडून सातत्याने होत आहेत. समाजात ताठ मानेने जगताना तिला पुरुषांच्या कुबड्या घ्याव्याच लागतात. ''स्त्री-पुरुष समानता'' या गोंडस नावाला आजही समाजमान्यता मिळालीच नाही. शहरी भागातील महिला सोडल्या, तर आजही वाड्या-तांड्यावरच्या, खेड्यापाड्यांतल्या महिलांचे, मुलींचे दुःख पाहून अस्वस्थ होते. समाजात महिलांना असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागते. एखाद्या कुटुंबाला कर्ता पुरुष सोडून गेला तर संसाराचा भार महिलेवरच पडतो. कोरं कपाळ घेऊन ती निराधार महिला हिमतीने जगते. कोणाचे उपकार नकोत म्हणून हाडाची काडं होईपर्यंत कष्ट करते. जगण्याशी झुंजच देते. तरीही समाज तिला दुषणे देतो. समाजात हिमतीने लढणाऱ्या अशा महिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र पुरुषी मानसिकता रचते. अशा दुषित विचारांमुळे समाज गढूळ बनतो. म्हणून आदर्श समाजनिर्मितीसाठी प्रथम स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांच्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे व्हावे, या अपेक्षेसह सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Bharatkumar Gaikwad : ९८८१४८५२८५ (लेखक ग्रामीण कथाकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com