नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते. साधारणतः त्याचबरोबर बागेतील इतर गवतही उपलब्ध होत असते. या उपलब्ध झावळ्या व कचरा याचा वापर करून गांडूळखत तयार करावे.
गांडूळखतनिर्मितीसाठी सिमेंट टाकीचा वापर करावा. यामध्ये १ः१ या प्रमाणात शेण आणि कुजलेला पाचोळा यांचे थर द्यावेत. त्यावर पाणी शिंपडून ते ओले करावेत आणि त्यामध्ये ५० गांडुळे १० किलो मिश्रण या प्रमाणात सोडावीत. सदर युनिटसाठी सावलीची व्यवस्था करावी. ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार वारंवार पाणी शिंपडावे. एक ते दोन महिन्यांत यांची वाढ होऊन जवळ जवळ ३०० पटींनी गांडुळे वाढतात. सदर गांडुळे मोठ्या प्रमाणात खत करण्यासाठी वापरावीत. गांडूळखत हे खड्डा पद्धत व ढीग पद्धत या दोन्ही पद्धतींनी करता येते. उपलब्ध घटकांनुसार सिमेंट टाकी बांधावी. टाकीत गांडूळखत तयार होण्यास दोन ते तीन महिने लागतात. या कालावधीत वाफे ओले राहण्यासाठी त्यावर आवश्यकतेनुसार पाणी शिंपडावे. ज्या ठिकाणी गांडूळ खत तयार केले जाणार आहे, तो भाग सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी मंडप अगर छप्पर करावे. ढिगामध्ये गांडुळे सोडावीत. वापरण्यात आलेल्या झावळ्यांनुसार ७० टक्के गांडूळखत ६० ते ७५ दिवसांत तयार होते. त्या वेळी पाणी शिंपडणे थांबवावे, जेणेकरून गांडुळे खालच्या थरात निघून जातील. दोन आठवड्यांनंतर गांडूळविरहित वरच्या थरातील गांडूळखत जमा करावे. ते चाळून घेऊन सावलीत वाळवावे. तसेच खालच्या थरात जमा झालेली गांडुळे पुढील गांडूळखत तयार करण्यासाठी वापरावीत. नारळ झावळीपासून तयार झालेल्या गांडूळखतात १.२ ते १.८ टक्के नत्र, ०.१ ते ०.२ टक्का स्फुरद आणि ०.२ ते ०.४ टक्का पालाश अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. याचे आकारमान इतर सेंद्रिय खतांपेक्षा कमी असल्याने, वाहतूक व वापरण्यासाठी सोपे जाते. काथ्यानिर्मितीमध्ये सोडणापासून काथ्या अलग केल्यानंतर त्याचा भुसा उरतो. हा भुसा काथ्या आणि भुशाचे प्रमाण पाहिले तर १ः२ असते. या भुशामध्ये त्याच्या वजनाच्या १० पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे; परंतु या भुशात अगदी अल्प प्रमाणात नत्राचे प्रमाण असते. लिगनीन आणि फायटोटॉक्सिक पॉलिफिनॉल मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे याचा खत म्हणून वापर करावयाचा असेल तर त्यासाठी अगोदर त्याचे कंपोस्ट खत करावे. ०२३५२-२३५०७७,प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी