अभ्यासातून शिकले शेती नियोजनाचे सूत्र

द्राक्ष शेतीमध्ये रमलेल्या राजश्री दरबारे
द्राक्ष शेतीमध्ये रमलेल्या राजश्री दरबारे

बेळंकी (ता. मिरज,जि.सांगली) येथील सौ.राजश्री सिद्धार्थ दरबारे यांनी मोठ्या कष्टाने माळरानावर चार एकर द्राक्ष बाग फुलवली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांकडून त्यांनी द्राक्ष शेतीची सूत्रे समजाऊन घेतली. स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग करत, चुका सुधारत त्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनावर भर दिला आहे.

बेळंकी (ता. मिरज, जि. सांगली) येथील सौ. राजश्री दरबारे यांचे पती सिद्धार्थ हे एरंडोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहेत. काही वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाल्याने सिद्धार्थ दरबारे यांच्यावर शेतीची जबाबदारी आली. परंतू नोकरीमुळे दैनंदिन शेती व्यवस्थापनात लक्ष देण्यासाठी त्यांना फारसा वेळ नसायचा. परंतू शेती करणे गरजेचे होते. त्यामुळे शेतीच्या नियोजनाची जबाबदारी राजश्रीताईंनी स्वतःकडे घेतली.

शेती नियोजनाला केली सुरवात  शेती नियोजनाबाबत राजश्रीताई म्हणाल्या की, आमच्या वाट्याला अठरा वर्षांपूर्वी चार एकर जमीन आली. सुरवातीच्या काळात आम्ही मका, बाजरी या पांरपरिक पिकांच्या लागवडीवर भर दिला. मला स्वतःला पीक व्यवस्थापनाची फारशी माहिती नव्हती. परंतू सासरी आल्यानंतर शेतीमधील दैनंदिन कामे आणि वर्षभराच्या पीक नियोजनाची माहिती मी घेत गेले. शेतीमध्ये नवीन काही तरी करायचे असा विचार सतत चालू असायचा. माझे पती सिद्धार्थ हे वैद्यकीय अधिकारी, त्यांनादेखील शेतीची आवड आहे. परंतू नोकरीमुळे ते दैनंदिन शेती व्यवस्थापनात फारसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतीची सर्व जबाबदारी मी घेतली. आर्थिक आणि बाजारपेठेच्या नियोजनासाठी मला पतीची चांगली मदत होते. सध्या कुटुंबाच्या वाट्याला आलेली वडिलाेर्जित चार एकर आणि आम्ही गेल्या काही वर्षात विकत घेतलेली सात एकर अशा अकरा एकर शेतीचे नियोजन मी पाहते. सध्या आमच्या शिवारात चार एकर द्राक्षबाग आहे. यंदा चार एकरावरील केळीची काढणी झाली आहे. तेथे जुलै महिन्यात ऊस लागवड करणार आहे. दरवर्षी खरिपात तीन एकरावर मका लागवड असते.  शेतीमध्ये तीन विहिरी आणि दोन कूपनलिका आहेत. काटेकोर पाणी वापरासाठी आठ एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे.   द्राक्ष बागेची उभारणी मिरज पूर्व भाग हा दुष्काळी टापू. मर्यादित उपलब्ध पाण्यावर येथील शेतकरी पारंपरिक पिकांच्या बरोबरीने द्राक्ष शेती करतात. अनेक शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देत द्राक्ष बागा जगविल्या आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रयोग लक्षात घेऊन राजश्रीताईंनी द्राक्ष लागवडीचा निर्णय घेतला. यास त्यांचे पती सिद्धार्थ यांचा पाठिंबाही मिळाला. आर्थिक नियोजन करून २००० मध्ये त्यांनी पाऊण एकरावर द्राक्ष बागेची उभारणी केली.  याबाबत राजश्रीताई म्हणाल्या की, द्राक्ष बाग उभारण्यापूर्वी मी तासगाव परिसरातील प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांच्या बागांना भेटी दिल्या. द्राक्ष बागेचे नियोजन, त्यातील अडचणी समजाऊन घेतल्या. या अभ्यासातून टप्प्याटप्प्याने चार एकरावर सुपर सोनाका द्राक्ष जातीची लागवड वाढवत नेली. प्रत्येक टप्प्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांची चर्चा करून द्राक्ष बागेतील कामकाजाचे नियोजन मी मजुरांकडून करू घेऊ लागले. मजुरांच्या बरोबरीने मी स्वतः बागेत दिवसभर राबते. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आणि बागेतील चुका सुधारत द्राक्ष बाग नियोजन करत गेले.  बागेच्या व्यवस्थापनाबद्दल राजश्रीताई म्हणाल्या की, आमचे घर द्राक्ष बागेमध्येच आहे. मी सकाळी आठ वाजता बागेत जाते. 

पहिल्यांदा मजुरांच्या बरोबरीने दिवसभर बागेमध्ये कोणती कामे करायची आहेत याचे नियोजन केले जाते. त्यानंतर बागेतील कामे सुरू होतात. मीदेखील किमान सहा ते सात तास बागेमध्ये असते. मणेराजुरी, कदमवाडी, तासगाव या भागातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बागेला भेटी देऊन त्यांच्या बरोबरीने चर्चा करून छाटणी तसेच बागेचे नियोजन समजाऊन घेतले. खुडा करणे, वांझ फुटी काढणे, शेंडा मारणे, डिपिंग करणे, कीडनाशकांची योग्य फवारणी कशी करायची हे मी स्वतः शिकले. पहिल्यांदा काही चुका झाल्या, परंतू अनुभवातून मी शिकत गेले.    

शेती नियोजनाची सूत्रे 

  • प्रयोगशील शेतकऱ्यांची द्राक्षबाग, कृषी प्रदर्शनाला भेट.
  • पीक व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञ आणि प्रयोगशील बागायतदारांशी चर्चा.
  • जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय खते, आच्छादनाचा जास्तीत जास्त वापर.   ठिबक सिंचनावर भर.
  • पीक व्यवस्थापनाची नोंद, त्यातून पुढील वर्षातील चुका सुधारणेला संधी.
  • यंत्रांच्या वापरातून मजूर टंचाईवर मात.
  •  महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
  •        नोंदवही ठरली दिशादर्शक  राजश्रीताईंनी बागेच्या नियोजनासाठी नोंदवही ठेवली आहे. या वहीत दैनंदिन कामाची सर्व नोंद ठेवली जाते. या नोंदीतून व्यवस्थापनामध्ये काही चुका झाल्या असतील तर पुढील वर्षी दुरुस्त करणे सोपे जाते. बागेची पहिल्यापासून काटेकोर काळजी घेतली जाते. प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञांच्या सल्ल्याची नोंद ठेवल्याचा फायदा बागेच्या व्यवस्थापनासाठी होतो. 

      यांत्रिकीकरणावर भर  राजश्रीताईंनी मजूर टंचाई लक्षात घेऊन फवारणी यंत्र आणि द्राक्ष बागेत शेणस्लरी सोडण्यासाठीही यंत्राची खरेदी केली. ही ट्रॅक्टरचलित यंत्रे चालविण्यासाठी एका मजुराची गरज असायची. परंतु आता मुलगा संदेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत ट्रॅक्टरचलित यंत्रे चालवितो. त्यामुळे योग्य वेळी शिफारशीत प्रमाणात कीडनाशकांची फवारणी तसेच बागेमध्ये शेणस्लरी देणे शक्य होते. खर्चात बचत होते.

      सेंद्रिय व्यवस्थापनावर भर  बदलत्या आव्हानांना सामोरे जात राजश्रीताईंनी बागेच्या व्यवस्थापनात बदल केले. बागेमध्ये रासायनिक खते, कीडनाशकाच्या वाढत्या वापरामुळे उत्पादन खर्च वाढत होता. जमीन सुपीकतेवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांनी प्रयोगशील बागायतदार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर भर दिला आहे. दर पंधरा दिवसांनी शेणस्लरी बागेला दिली जाते. प्रमाणित सेंद्रिय खते आणि कीडनाशकांच्या वापरावर त्यांचा भर आहे. बागेत पाचटाचे आच्छादन केले जाते. याचा चांगला परिणाम झाला आहे. जमीन भुसभुशीत झाली, सेंद्रिय कर्ब वाढला. द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन मिळू लागले. यंदाच्या वर्षी एकरी सरासरी बारा टन उत्पादन मिळाले. बागेतच व्यापारी येऊन द्राक्षाची खरेदी करतात.  

    - सौ. राजश्री दरबारे, ८३९०६०१५०७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com