पालखी सोहळ्यात चित्ररथातून स्वच्छतेचा जागर

पालखी सोहळ्यात चित्ररथातून स्वच्छतेचा जागर
पालखी सोहळ्यात चित्ररथातून स्वच्छतेचा जागर

नगर ः आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसोबत संवाद साधत पालखी सोहळ्यातून स्वच्छतेबाबत जागृती केली जाणार आहे. त्यासाठी राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे नगरसह राज्यातील १९ जिल्ह्यांमधील २० स्वच्छता रथ संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहे. कलापथकाच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करणार आहेत. त्यासाठी चित्ररथ करण्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांनी वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर करावा, यासाठी अनेक वर्षांपासून जागृती केली जात आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक, अपंग व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना राज्य सरकारतर्फे अनुदानही दिले. ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे ‘हागणदारीमुक्त ग्रामपंचायत' हा उपक्रम राबविला जात आहे. आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी आळंदी (जि. पुणे) येथून प्रस्थान करणारी संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी व देहू (जि. पुणे) येथून निघणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात राज्यभरातील भाविक सहभागी होतात. त्यामुळे पालखी सोहळ्यातून स्वच्छतेबाबत जागृती केली जात आहे.  पालखी सोहळ्यात स्वच्छता रथासोबत कथापथके असून, त्यांच्यामार्फत स्वच्छतेबाबत प्रबोधन केले जाणार आहे. काही वर्षांपासून कलापथके, स्वच्छता रथाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात जागृती करण्यास सुरवात झाली. त्याचा परिणाम म्हणून यंदा राज्यातील सर्व जिल्हा पूर्णपणे हागणदारीमुक्त झाला असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र गावे हागणदारीमुक्त झाली असली तरी स्वच्छतेबाबतचे महत्त्व कळावे, बांधलेल्या शौचालयाचा वापर करावा यासाठी पालखी सोहळ्यातून स्वच्छतेचा जागर उपक्रम कायम ठेवला आहे. सोमवारी (ता. ९) पुणे येथील विभागीय कार्यालयात चित्ररथाचे उद्‌घाटन होईल. २२ जुलैपर्यंत स्वच्छतेच्या जागराचा उपक्रम सुरू राहील.  सहभागी जिल्हे परभणी, बीड, वाशीम, उस्मानाबाद, सांगली, लातूर, सातारा, पुणे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, जालना, ठाणे, अकोला, नगर, औरंगाबाद, अमरावती, तसेच सोलापूर जिल्ह्यांतील दोन स्वच्छता रथ सहभागी असतील. नावे नसलेल्यांचाही होणार विचार राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाने नुकतेच राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. ज्याची नावे बेसलाइन सर्व्हेत होती, त्यांनी शौचालये बांधल्याचे सांगत हागणदारीमुक्ती जाहीर केली. नावे असलेल्यांना प्रत्येकी बारा हजारांचे अनुदानही मिळाले. मात्र अजूनही अनेक कुटुंबाकडे शौचालये नाहीत. बेसलाइन सर्वेक्षणात त्यांची नावे आलेली नसल्याने त्यांना अनुदानही मिळाले नाही. आता अशा कुटुंबांचा सर्व्हे केला जात आहे. त्यातही अनेक गरीब कुटुंबे आहेत. सध्या सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यामुळे त्यांनी शौचालय बांधावे यासाठी शासन स्तरावर अनुदान देण्याबाबत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com