दूधदराच्या तिढ्यावर दोन दिवसांत निर्णय : मुख्यमंत्री

दूधदराच्या तिढ्यावर दोन दिवसांत निर्णय : मुख्यमंत्री
दूधदराच्या तिढ्यावर दोन दिवसांत निर्णय : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात दूधदराच्या तिढ्यावर येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ९) विधानसभेत केली. तसेच, या संदर्भातील लक्षवेधी राखून ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.  शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी ही लक्षवेधी मांडली होती. या वेळी श्री. भोईर म्हणाले, की दूध दरासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. खासगी दूध संघांवर सरकारचे नियंत्रण नाही. राज्य सरकारने तातडीने कायदा करून खासगी संघांवर अंकुश निर्माण करावा. तसेच गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे ५ रुपये भुकटी अनुदान जाहीर करावे. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील दूध धंद्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, शेतकऱ्यांना १७ ते १८ रुपयांच्यावर दर मिळत नाही. राज्यात दूध उत्पादकांची परवड सुरू असताना सरकार तातडीने उपाययोजना करण्यापेक्षा बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहेत. राज्यात दुधाचा महापूर आला आहे. अतिरिक्त दुधाचे पावडरमध्ये रूपांतर करताना अनुदानाशिवाय निर्यात होणार नाही. गुजरात सरकारने त्यासाठी दीडशे कोटी रुपये अनुदान दिले आहे. राज्य सरकारनेही अनुदान जाहीर करावे. दुधाचा शालेय पोषण आहारात समावेश करावा. जेणेकरून पोषण आहारातील भ्रष्टाचार आणि निकृष्ठ पुरवठा होणार नाही. सरकारने त्या त्या जिल्ह्यातील दूध संघांवर जबाबदारी सोपवावी. गैरप्रकार घडल्यास संघांना जबाबदार धरावे. फरकाचे ५ ते ७ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी विखे यांनी केली. 

त्यानंतर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर म्हणाले, की सरकारने दोन वर्षांत दुधाचे दर वाढवण्यासाठी निर्णय घेतले. त्यामुळे दूध दर २७ रुपयांवर गेले. दुधाला ७०-३० चा फॉर्म्युला लागू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सरकारच्या योजनांमध्ये दुधाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन अनुदानासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाणार आहे. दुधाचे वाटोळे कोणी केले, महाराष्ट्रातही गुजरात आणि कर्नाटकप्रमाणे एकच फेडरेशन का झाले नाही, असा सवालही त्यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या टिप्पणीवर उत्तर देताना केला. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही लक्षवेधी राखून ठेवावी अशी मागणी केली. या वेळी विरोधकांनी काहीकाळ गोंधळ केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी घोषणा केली. तसेच तोपर्यंत लक्षवेधी राखून ठेवली जाईल असे स्पष्ट केले. दूध धंद्याचे वाटोळे केल्याची  नोंद होईल ः अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, दूध संघ ७० टक्क्यांपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना देतात. सरकार शुगर प्राईस कंट्रोल अॅक्टप्रमाणे दुधाचा कायदा करू पाहत आहे. पण साखर आणि दुधाची तुलनाच होणार नाही. सरकारला हा कायदा आणताच येणार नाही. १९, २० रुपयांपेक्षा अधिकचा दर देणे संघांना परवडतच नाही. महानंदलाही अधिकचा दर देता आलेला नाही, त्यांच्यावर सरकारने कोणती कारवाई केली. राज्यात सध्या दूध धंद्याचे वाटोळे होतच आहे. सरकारने तातडीने निर्णय न केल्यास या धंद्याचे वाटोळे केल्याची नोंद तुमच्या कार्यकिर्दीत होईल, असा इशाराही अजित पवार यांनी मंत्री महादेव जानकर यांना या वेळी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com