आठ दिवसांपूर्वी तत्कालीन संचालकांवर गुन्हे, सातव्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर

आठ दिवसांपूर्वी तत्कालीन संचालकांवर गुन्हे, सातव्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर
आठ दिवसांपूर्वी तत्कालीन संचालकांवर गुन्हे, सातव्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह संचालक, सचिव आदी ३७ जणांवर सुमारे ३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे यांनी गेल्याच आठवड्यात पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर सातव्याच दिवशी सोमवारी (ता.२८) या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील या बाजार समितीशी संबंधित या दोन्ही घटना निव्वळ योगायोगाच्या समजल्या जात असल्या, तरी या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग असल्याचे गुपित आता गुपित राहिलेले नाही. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढणार आहे.  महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवरती असलेली सोलापूर बाजार समिती राज्यातील पहिल्या पाच बाजार समित्यांमध्ये गणली जाते. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र या बाजार समितीमध्ये येते. राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील ही बाजार समिती असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्यामध्ये सातत्याने बाजार समितीच्या मुद्द्यावरून राजकरण रंगत आल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यात राज्याच्या "सहकार व पणन'' विभागाची सत्ता देशमुख यांच्या हातात आल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. तत्कालीन संचालकांची चौकशी, मतदार याद्यावरील गोंधळ आणि शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार या निर्णयासाठी गेल्या दीड वर्षात बाजार समितीच्या प्रशासकाला दोन वेळेस मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली. आता तर आठ दिवसांपूर्वी सभापतींसह संचालकांवर दाखल झालेले गुन्हे आणि आता जाहीर झालेली निवडणूक, यामुळे शहकाटशहाचे राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसते. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनही मंत्री देशमुख या निवडणुकीकडे पाहत आहेत. यामध्ये त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण या सगळ्यामागील राजकारणाचं उघड गुपित आता गुपित राहिलेलं नाही.  १ जुलैला मतदान, ३ जुलैला निकाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २ जून ही उमेदवारी अर्ज दाखलाची शेवटची तारीख आहे. १ जुलैला मतदान आणि ३ जुलैला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांना या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी या निवडणूक कार्यक्रमाला सोमवारी (ता.२८) मंजुरी दिली. त्यानुसार २९ मे ते २ जून या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ४ जूनला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १९ जूनला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २० जूनला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर १ जुलैला मतदान आणि ३ जुलैला मतमोजणी होईल. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सुमारे १ लाख १८ हजार ८९९ शेतकरी मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com