‘आत्मा’ गुंडाळल्यास शेतकरी कंपन्यांचे भवितव्य अधांतरी

‘आत्मा’ गुंडाळल्यास शेतकरी कंपन्यांचे भवितव्य अधांतरी
‘आत्मा’ गुंडाळल्यास शेतकरी कंपन्यांचे भवितव्य अधांतरी

कोल्हापूर : कृषी विभागाने ‘आत्मा’ विभाग गुंडाळण्याच्या हालचाली सुरू केल्याने आत्माअंतर्गत स्थापन केलेल्या राज्यातील १ लाख २० हजार शेतकरी गटांबरोबरच १३४६ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ‘आत्मा’ व्यतिरिक्त कृषी विभागाकडे कृषी विस्ताराची कोणतीच स्वतंत्र यंत्रणा नसल्याने हा विभाग बंद झाल्यास गट, व या कंपन्यांची शासनाशी संपर्कच तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.  राज्यात ‘आत्मा’च्या कर्मचाऱ्यांनी १ लाख २० हजार शेतकरी गट स्थापन केले आहेत. याअंतर्गत या शेतकऱ्यांना गटशेतीच्या प्रोत्साहानाबरोबरच विविध प्रकारचे कृषी विभागाचे लाभ मिळवून देण्यासाठी संघटन करण्यात आले आहे. अगदी गाव पातळीवर जाऊन ‘आत्मा’च्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी या गटाची बांधणी केली आहे. यामुळे विविध प्रकारच्या भाज्या, पिके, फळपिके करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वतंत्र गट तयार झाले. संघटित असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती व्यवसायात सुसूत्रता आणणे शक्‍य झाले. गटांसाठी असणाऱ्या अनेक योजनांचा फायदाही शेतकऱ्यांना झाला आहे. समन्वयक म्हणून आत्माचे कर्मचारी काम पाहात आहेत. जर हा विभाग बंद केला तर प्रत्येक तालुक्‍याच्या समन्वयाचे कामच ठप्प होणार आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना गटाबाबतची सूक्ष्म माहिती नसल्याने गटासाठीच्या योजना भविष्यात कृषी विभागाच्या भरवशावर चालविणे अशक्‍य असल्याचेच कृषी विभागातीलच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  कंपन्यांचा जीव टांगणीला  लाखो रुपये गुंतवून राज्यभरात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये अनेक उपक्रमशील शेतकरी सहभागी झाले. या कंपन्या स्थापन करण्यासाठी आत्मा विभागाचा मोठा पुढाकार राहिला आहे. यामध्ये ४०० कंपन्यांना महाराष्ट स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत अनुदानही मिळाले आहे. तर उर्वरित कंपन्या स्वबळावर स्थापन झाल्या आहेत. या कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याचे काम संबधित ‘आत्मा’ क्षेत्रीय कर्मचारी करत आहेत. या कंपन्या अजूनही कृषी विभागाशी थेट जोडल्या गेल्या नाहीत. ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांमार्फतच समन्वयाचा अडचणीच मांडल्या जात आहेत. यामुळे ‘आत्मा’ विभाग बंद केल्यास या कंपन्यांकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होणार आहे.  कृषी विभागावर जबाबदारी शेतकरी कंपन्या स्थापन झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा ‘आत्मा’ कर्मचाऱ्यांनीच केला. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांचा थेट संबध आला नाही. यामुळे या कंपन्यांशी कसे व्यवहार करायचे याबाबत कृषी विभागातील घटकच अनभिज्ञ असल्याचे सूत्रांनी सांगितले. कृषी विभागातील कर्मचाऱ्यावर अगोदर भार आहे. यामुळे त्यांची नियमित कामे होतानाही दमछाक होत आहे. नवी जबाबदाररी कृषी विभागावर आल्यास कंपन्या व गटांच्या कामकाजाबाबत कशी नीती असणार याचे उत्तर सध्या तरी कृषी विभागाकडे नाही. यामुळे ‘आत्मा’ बंद झाल्यास शेतकरी गट, व कंपन्यांचे भवितव्यच धोक्‍याच आल्याची माहिती कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com