‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना

‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना  अचूक हवामानाची सूचना
‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना

मुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे. ‘‘महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली असून, त्याद्वारे गाव स्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती’’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गावात काही भागात पाउस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपिटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपन्या आहेत. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकऱ्यांनादेखील गावनिहाय कळेल. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे, तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले आम्ही उचलणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून, त्याद्वारे  ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे, असे श्री. फुंडकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com