राज्यात मोठ्या धरणांमध्ये यंदा अधिक साठा

हतनूर धरणाचे लाभक्षेत्र आणि धरणालगतच्या मध्य प्रदेशाच्या भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
हतनूर धरणाचे लाभक्षेत्र आणि धरणालगतच्या मध्य प्रदेशाच्या भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पुणे : राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत बहुतांशी मोठ्या धरणांमध्ये यंदा अधिक पाणीसाठा आहे. यात कोयना, उजनी, जायकवाडीसह विदर्भातील धरणांचा समावेश आहे. मात्र, मुळा, गिरणा, येलदरी या धरणांच्या क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने या धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे.     काेकणासह राज्याच्या घाटमाथ्यावर विशेषत: पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांच्या पाणलोटातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने गेल्या १५ दिवसांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या धरणांच्या पाणलोटात यंदा पावसाचा जोर काहीसा कमी असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. विदर्भातही दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

राज्यातील १५ टीएमसीहून अधिक क्षमतेच्या धरणांचा विचार करता पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणात ४८ टक्के आणि भाटघर धरणांमध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या धरणांमध्ये अनुक्रमे ३३ व २६ टक्के पाणीसाठा होता. तर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण यंदाही अचल पातळीत असून, गतवर्षीपेक्षा २ टक्के अधिक पाणीसाठा आहे. सध्या अचल पातळीत असलेल्या या धरणात तब्बल ५९.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. तर, गेल्या वर्षी उजनीत सुमारे ५५ टीएमसी पाणीसाठा होता. भीमेच्या मुक्त पाणलोटक्षेत्रामधील पावसामुळे उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर आणि कोयनेच्या पाणलोटात दमदार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. कोयना धरणात यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक पाणी जमा झाले आहे. कोयना धरणातील अचल आणि उपयुक्त पाणीपातळी धरून जवळपास ६२ टीएमसीहून अधिक पाणी जमा झाले आहे. कोल्हापूरमध्ये पावसाने जोर धरल्याने दूधगंगा धरणात १४.६४ टीएमसी (६१ टक्के), तर सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात १९.८९ टीएमसी (७२ टक्के) पाणीसाठा आहे. दाेन्हीही धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणी उपलब्ध आहे.  

नाशिक आणि नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहिल्या होत्या. मराठवाड्याची जीवन वाहिनी असलेले जायकवाडी धरण गतवर्षी ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने यंदाही धरणाची पाणीपातळी चांगली आहे. जायकवाडी धरणात अचल आणि उपयुक्त असा एकूण ४०.७३ टीएमसी (४० टक्के) पाणीसाठा आहे. तर, गतवर्षीही याच तारखेला जवळपास ३८ टक्के पाणीसाठा होता. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाअभावी, तर नाशिकमधील गिरणा (१३ टक्के), आणि नगरमधील मुळा (१० टक्के) धरणांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. 

विदर्भात गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अनेक धरणे तळाशी गेली होती. मात्र, पूर्वमोसमी पावसासह मॉन्सूनने यंदा जोरदार हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. विदर्भातील मोठ्या धरणांमध्ये अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात यंदा ७.९० टीएमसी (४० टक्के) भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणात ६.६४ टीएमसी (२५ टक्के); तर नागपूरमधील तोतलाडोह धरणात ४.८० टीएमसी (१३ टक्के) पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.

धरणांची पाणीसाठ्याची तुलनात्मक स्थिती (टक्केवारी) 

धरणे    या वर्षी     गतवर्षी
मुळशी  ४८   ३३
भाटघर     ४३   २६
उजनी*     ५१    ४७
कोयना*   ५९    ३७
वारणा    ७२    ४०
दूधगंगा  ६१   ३९
जायकवाडी*   ४०      ३८
पूर्णा येलदरी    ०  
मुळा   १३    १५
गिरणा   १०   २६
ऊर्ध्व वर्धा    ४०   ३५
गोसी खुर्द    २५   ६
तोतलाडोह     १३    ६

* उजनी, कोयना, जायकवाडीचा धरणसाठा अचल पातळीतील पाणीसाठा मिळून आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com