‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश

‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश
‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश

पुणे : कृषी खात्यामधील समुपदेशन बदल्यांच्या पारदर्शक धोरणाला होणारा विरोध मोडून कृषी आयुक्तांनी ६०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यातील १७५ अधिकारी खुर्च्या सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.  ‘‘मन मानेल तसे काम करण्यात तसेच कोणत्याही चौकश्यांमध्ये खोडा घालण्यास कृषी खात्यातील काही अधिकारी पटाईत आहेत. त्याचा प्रत्यय समुपदेशन बदल्यांच्या निमित्ताने शासनाला येतो आहे. बदल्या झाल्यानंतरदेखील अधिकारी आपल्या खुर्च्या सोडत नसल्यामुळे कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार व कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह अवाक् झाले आहेत. त्यामुळे कायदा पाळणार नसल्यास निलंबनाला तयार राहण्याचा इशारा आयुक्तांनी दिला असून, वेतनदेखील न देण्याची भूमिका घेतली आहे,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. समुपदेशन बदल्यांमध्ये आयुक्तांनी मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती. या पदांवर कोणाचीही नियुक्ती होणार नव्हती. मात्र, आयुक्तांनी यादी मंत्रालयात पाठविल्यानंतर सोनेरी टोळीने ‘‘नजराणा तंत्र’’ वापरून काही ‘ब्लॉक’ केलेली पदे ‘ओपन’ करून बदल्या केल्या. तथापि, अशी पदे कमी असल्यामुळे यंदा बदल्यांमधील घोडेबाजाराला चाप बसला आहे. बदल्या झाल्यानंतरदेखील शेकडो अधिकारी आपल्या पदाला चिकटून राहिल्याने -ऐन खरिपात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. कृषी खात्यातील मनमानीचा हा प्रकार थेट मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेला आहे. कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना स्वतः पत्र लिहून बदल्या झालेल्या कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी ६०० बदल्या केल्या असून किमान १७५ अधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडलेल्या नाहीत. ‘‘निलंबन व पगार कापण्याची कठोर भूमिका कृषी आयुक्तांनी घेतल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी खुर्च्यांभोवती टाकलेले वेटोळे सैल करून बदली झालेल्या ठिकाणी जाण्याची तयारी सुरू केली आहे. काही अधिकारी नाईलाजास्तव रूजू होत असून मलईदार खुर्च्या गमावल्याची नाराजीदेखील दिसते आहे. बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची खरोखर गैरसोय झाली आहे. तथापि, आयुक्तांना विरोध न करता असे अधिकारी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत’’, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. २१ जून २०१८ रोजी अपर मुख्य सचिव बिजय कुमार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रसिंगमध्ये बदली करूनही खुर्च्या न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. मराठवाडा व विदर्भात ऐन खरिपात कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ मुक्त करून बदलीच्या ठिकाणी सोडले पाहिजे’’, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. ‘‘बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांचे पगार बदलीच्या ठिकाणाहूनच काढावेत असे आदेश आयुक्तांनी यानंतर दिले. बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबनाचे प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले. ...तर शिस्तभंग कारवाई बदली होऊनदेखील अद्याप कार्यमुक्त न केलेल्या अधिकाऱ्यांना बदली झाल्याचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून मानीव कार्यमुक्त करावे. कार्यमुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन संबंधित (जुन्या) कार्यालयाने करू नये. असे वेतन काढल्यास संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याच्या वेतनातून या रकमेची वसुली करावी. कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त न करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश कृषी अायुक्तांनी दिले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com