केरळ, तेलंगणा, कर्नाटकात पाऊस

येथे शुक्रवारी (ता. ८) जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती.
येथे शुक्रवारी (ता. ८) जोरदार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत होती.

नवी दिल्ली ः मॉन्सूनने केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक व्यापल्यानंतर या राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. तर गुरजरातमध्ये आधी जाहीर केल्याप्रमाणे वेळेवर मॉन्सून दाखल होईल परंतु त्याचा जोर मात्र कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.  मॉन्सूनने यंदा देशात वेळेआधीच धडक दिली आहे. केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक राज्य पूर्ण व्यापल्यानंतर मॉन्सूनने आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि महाराष्ट्राचा काही भागात प्रवेश केला. त्यामुळे या भागात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार म्हणाले, की गुजरातमध्ये ९ ते ११ जूनदरम्यान मॉन्सून दाखल होईल असा अंदाज आहे. मॉन्सून आगमानाला पोषक स्थिती असल्याने दक्षिण गुजरात आणि नैऋत्य सौराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता होती, मात्र सध्याची स्थिती पाहता मॉन्सून वेळेवर दाखल होईल; परंतु त्याचा जोर कमी असेल तसेच या काळात जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. शुक्रवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत गुजरातमधील तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.     केरळमध्ये जोरदार नैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण केरळमध्ये सक्रिय झाला असून, राज्याच्या दक्षिण भागात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अशाच प्रकारे पाऊस सक्रिय राहील, अशी माहिती तिरुअनंतपुरमच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. संतोष यांनी सांगितले. केरळ आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर ताशी ५० कि.मी. प्रतितास वारे वाहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम येथे ४५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर विमानतळ परिसरात ३५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसाचा विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. कोची विमानतळावर ५१.८ मि.मी. तर कन्नूर येथे ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.    सात जणांचा मृत्यू राजस्थानमध्ये पाऊस व वादळाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. येथे अनेक भागात गुरुवारी (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) जोरदार पाऊस झाला. तसेच उत्तर प्रदेशातील २० जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. उत्तर भारतातील सर्वच भागात सरासरी तापमानाची नोंद झाली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये जोरदार पाऊस झाला. तर उत्तर प्रदेशातील उन्नाव, फारुखाबाद, कनौज, वारानसी, गोरखपूर, बल्लीआ, घाजीपूर, कुशीनगर, माऊ, देवरीआ, महाराजगंज, बलरामपूर, श्रावस्ती, लखीमपूर, पिलिभीत, रामपूर, मोरादाबाद, बिजनोर आणि बरेली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हिमचाल प्रदेशातील शिमलासह अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बंगालचा उपसागर आणि बांगलादेशच्या किनारी भागात जोराच्या लाटा येत असल्याने माच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com