सोलापुरात आज जमीन सुपीकतेचा जागर

सोलापुरात आज जमीन सुपीकतेचा जागर
सोलापुरात आज जमीन सुपीकतेचा जागर

सोलापूर ः ‘सकाळ-ॲग्रोवन'च्या वतीने आज, शुक्रवारी (ता. २९) सोलापुरात ‘जमीन सुपीकता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेजवळील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात सकाळी १० ते दोन या वेळेत हे चर्चासत्र होईल.  यूपीएल कंपनीने हा कार्यक्रम प्रायोजित केला असून, ट्रेडकॉर्प हे सहप्रायोजक आहेत. जिल्ह्यातील ऊस, डाळिंब, द्राक्ष उत्पादकांसाठी हे चर्चासत्र एक पर्वणी ठरणार आहे. विशेषतः क्षारपड जमिनीमुळे जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा भागातील ऊस उत्पादकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्यासाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. जमीन सुपीकता, जल-मृद संधारण या विषयातील तज्ज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे आणि जमीन सुपीकता या विषयावर सखोल अभ्यास असणारे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर हे या चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. राज्यातील जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालल्याने कसदार शेती दुरापास्त होत चालली आहे, हे लक्षात घेऊन ‘ॲग्रोवन'ने हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्याअंतर्गत हे चर्चासत्र होत आहे. सोलापूर हा कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण जिल्ह्यातील निम्मा भाग हा उजनी धरणामुळे बागायती झाला आहे. या पट्ट्यात ऊस, डाळिंब, द्राक्ष या पिकांत जिल्हा अग्रेसर आहे. विशेषतः डाळिंब आणि उसामध्ये जिल्ह्याची आघाडी आहे. पण नदीकाठच्या पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा या भागात ऊस, डाळिंब उत्पादकांना क्षारपड जमिनीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याशिवाय कोरडवाहू क्षेत्रातीलही विविध पिकांच्या उत्पादनवाढीसाठी जमिनीचा कस सुधारणे आवश्‍यक आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होत असताना खते व पाण्याचा अनियंत्रित वापर या कारणामुळेही जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. परिणामी उत्पादकता घटली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. हे आहेत चर्चासत्रातील वक्ते ः- प्रताप चिपळूणकर ः प्रताप चिपळूणकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी. चिपळूणकर बी.एस्सी.(कृषी) पदवीधर असून, पासून पूर्णवेळ शेती करतात. जमिनीची सुपिकता जपत ऊस आणि भात पीक उत्पादनवाढीसाठी त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी चिपळूणकर यांनी १९९० पासून भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाच्या अभ्यासास प्रारंभ केला. जमीन सुपिकता आणि पीक उत्पादनवाढीसंदर्भात शास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास, त्यानुसार आवश्‍यक टिपणे काढणे, स्वतःच्या शेतीमध्ये तसेच राज्यभरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये विविध पिकांमध्ये विनानांगरणी शेतीचे प्रयोग पडताळून पाहणे, त्यामध्ये सुधारणा करून शाश्वत शेतीसाठी सर्व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी तंत्रे विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. स्वतःच्या शेतीतील प्रयोगांच्या अनुभवातून शून्य मशागत तंत्र, तण व्यवस्थापन, उपयुक्त सूक्ष्मजीव व्यवस्थापन, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न, अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनावर भर देत शाश्वत शेतीचे तंत्र त्यांनी विकसित केले. नांगरणीशिवाय शेती" हे स्व अनुभवाधारित पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. डॉ. अजितकुमार देशपांडे ः जमीन सुपिकता, कोरडवाहू शेती पद्धती, जल-मृद संधारण हे डॉ. अजितकुमार देशपांडे यांचे संशोधनाचे विषय आहेत. याचबरोबरीने त्यांनी शेतीसाठी खत म्हणून स्पेंटवॉशच्या वापरावर विशेष संशोधनही केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रीय मासिकांमध्ये डॉ. देशपांडे यांचे सत्तरहून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. देशपांडे यांची बारा पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यातील दोन पुस्तके जमीन सुपिकतेविषयी आहेत. जमिनी सुपिकता, जल-मृद संधारणातील विशेष संशोधनाबाबत त्यांना राष्ट्रीय; तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. डॉ. देशपांडे हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधून सहयोगी अधिष्ठाता म्हणून निवृत्त झाले आहेत. चर्चासत्राचे नियोजन विषय ः जमीन सुपीकता स्थळ ः शिवछत्रपती रंगभवन सभागृह, जिल्हा परिषदेजवळ, सोलापूर दिनांक, वेळ ः- शुक्रवार, ता. २९ जून, सकाळी १० ते दुपारी दोन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com