ऊस लागवड थांबवा : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचे शेतकऱ्यांना आवाहन !

ऊस लागवड थांबवा : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचे शेतकऱ्यांना आवाहन !
ऊस लागवड थांबवा : उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांचे शेतकऱ्यांना आवाहन !

लखनौ, उत्तर प्रदेश  : चालू गाळप हंगामात देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांकडील वाढती थकबाकी आणि २०१७-१८ च्या हंगामात उत्तर प्रदेशात उसाचे झालेले विक्रमी उत्पादन यामुळे येथील खासगी साखर कारखान्यांनी २०१८-१९ मध्ये ऊस लागवड न करण्याचे शेेतकऱ्यांना आवाहन केले आहे.  उत्तर प्रदेशात नगदी पीक म्हणून उसाकडे शेतकऱ्यांचा मोठा ओढा आहे. २०१७-१८ च्या हंगामात येथे ऊस लागवड १२ टक्क्यांनी वाढून २०.५४ लाख हेक्टरवरून २३ लाख हेक्टरवर आली होती. त्यामुळे २०१७-१८ च्या हंगामात राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले. तसेच कारखान्यांकडे साखर पडून आहे. दर नसल्याने कारखाने निर्यात करण्यास किंवा विक्री करण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे पुढील गाळप हंगामात शेतकऱ्यांना ऊस लागवड न करण्याचे आवाहन खासगी साखर कारखाने करत आहेत. कारखाने शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी ऊस बेणे, कीटकनाशक आणि इतर कृषी निवष्ठा उधारीवर किंवा अनुदानावर देत होते त्याच भागात आता कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम थांबविले आहेत.   प्रत्येक साखर कारखाना ऊस विभागाने नेमून दिलेल्या १६ किलोमीटरच्या क्षेत्रात प्रत्येक वर्षी गाळापासाठी ऊस उपलब्ध व्हावा यासाठी ऊस विकास कार्यक्रम राबवत असत. आता खासगी साखर कारखाने तर थेट शेतकऱ्यांना बांधावर जाऊन, हस्तपत्रके वाटून आणि इतर माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहेत. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडील शेतकऱ्यांची देणी १२ हजार कोटींवर गेली आहेत. थकबाकी असलेले ४० टक्के कारखाने अद्यापही गाळप करत आहेत.  जेव्हा येथील काही शेतकऱ्यांनी खासदार मेनका गांधी यांच्याकडे थकबाकीविषयी तक्रार केली तेव्हा त्यांनीही शेतकऱ्यांना ‘‘जर उसाला एवढा कमी दर मिळत असेल तर तुम्ही दुसरे पीक का घेत नाही. देशात साखरेचे उत्पादन जास्त झाल्यास मागणी कमी असल्याने दर पडणारच. त्याचा परिणाम ऊस दरावरही होणारच.’’ असे सांगितले होते. कारखान्यांनी शेतकऱ्यांना वाटेलेल्या हस्तपत्रकांमध्ये शेकऱ्यांनी २०१८-१९ च्या हंगामात ऊस लागवड कमी करावी. त्यामुळे कारखान्याचे साखर उत्पादन कमी होईल आणि उसाची देणी देण्यासाठी लागणारा विलंब होणार नाही. शेतकऱ्यांनी जर कारखान्यांनी सांगितल्यानुसार लागवड कमी केली नाही, तर येणाऱ्या हंगामात साखरेचे उत्पादन वाढून दर पडतील, असेही म्हटले आहे. अतिरिक्त उत्पादन  देशात २.३० कोटी टन साखरेचा दरवर्षी वापर होतो. मात्र २०१७-१८ च्या हंगामात ३.२५ कोटी टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा देशात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त साखरपुरवठा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मगील वर्षी ८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र यंदा विक्रमी ऊस उत्पानामुळे साखर उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ होऊन १.१२ कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

थकबाकी वाढली जास्त ऊस गाळपामुळे कारखान्यांकडील थकबाकी वाढली आहे. सध्या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांकडी थकबाकी १२ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. कारखान्यांच्या सूत्रानुसार एक क्विंटल साखर उत्पादनासाठी ३७०० रुपये खर्च येतो. मात्र सध्या बाजारात साखरेचे दर २६०० ते २६५० रुपये प्रतिक्विंटलच्या मध्येच घुटमळत आहेत.

इतर पिके घ्या... आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी यासाठी कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मार्गदर्शिकेमध्ये काही सूचना केल्या आहेत. ‘‘ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात या हंगामात गहू पीक घेतले आहे. त्यांनी पुढील हंगामात उसाची लागवड न करता तूर, मूग आणि उडीद यांसारखी कडधान्ये पेरावी,’’ अशी सूचना केली आहे. तसेच ‘‘शेतकऱ्यांनी मान्यता नसलेल्या जातीच्या उसाची लागवड करू नये. शेतकऱ्यांनी असा ऊस पिकवल्यास कोणताही कारखाना तो खरेदी करणार नाही,’’ अशा सूचनाही साखर कारखान्यांनी केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com