‘जलयुक्त’मुळे घटल्या टॅंकरच्या खेपा

जलयुक्त
जलयुक्त

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे राज्यात सुमारे ११ हजारांपेक्षा अधिक गावांत टॅंकरची संख्या तीन वर्षांत सरासरी ८० ते ९० टक्‍क्‍यांपर्यंत घटली. अनेक गावांत सध्या एकही टॅंकर नसल्याचे चित्र आहे. यामुळे टॅंकरवरील खर्चात बचत होऊन या गावांमध्ये १६.८२ लाख घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा झाला. २२ लाख हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांच्या संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली. मर्यादित सिंचन सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती, अनिश्‍चित आणि खंडित पर्जन्यमानामुळे कृषी क्षेत्रात अनिश्‍चितता वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार अभियान’चा निर्णय घेतला. तीन वर्षांत सुमारे १६ हजारांहून अधिक गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे झाली. सरकारबरोबरच लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. लोकांनी स्वयंस्फूर्तीने मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामपंचायत स्तरावरील जलसंवर्धन आणि जलसंधारण कामाची तालुकानिहाय एकत्रित माहिती जमवली. त्यानंतर गावाच्या उपचार क्षेत्रानुसार कामांचा आराखडा करून कामे झाली.  जलसंधारणाच्या माध्यमातून पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांध, जुने सिमेंट नाला बांध, केटी वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोतातील गाळ काढून त्यांचे बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड कामे हाती घेतली होती. जलसंधारणाचे अनेक उपाय विविध सरकारी योजनांसोबत लोकसहभागातून राबविण्यावर भर दिला. जलजागृती, जलअंदाजपत्रक बनविण्यात जनसहभागामुळे अभियान लोकचळवळ बनले. ते राबविण्यापूर्वी ऑक्‍टोबर २०१४ ते जून २०१५ आणि ऑक्‍टोबर २०१५ ते जून २०१६ या काळात अनुक्रमे २,७७२ आणि ६,१४० टॅंकर राज्यात पाणी पुरवायचे. तेथील टॅंकरची संख्या घटली आहे. तीन वर्षांत निवड झालेल्या गावांमध्ये ४,९८,२०६ कामे झाल्याने, एकूण ११ हजार ६८५ गावे जलस्वयंपूर्ण झाल्याचा सरकारचा दावा आहे.  जलयुक्त शिवार योजनेमध्ये विविध उपचार पद्धती केल्यामुळे या गावांत १६.८२ लाख घनमीटर (टीसीएम) पाणीसाठा झाला. २२ लाख हेक्‍टर संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली. अभियानात २०१८-१९ या वर्षासाठी ६,२०० गावांची निवड करण्यात आली. सध्या या ठिकाणी जलयुक्तची कामे प्रगतिपथावर आहेत. तहानलेली गावे झाली पाणीदार दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या, ऑक्‍टोबरपासून टॅंकरची मागणी असणाऱ्या गावांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. योजनेत पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये ६,२०२ गावांची निवड झाली. एप्रिल २०१६ मध्ये या गावांमध्ये १३७९ टॅंकर पाणी पुरवीत होते. एप्रिल २०१७ मध्ये याच ठिकाणची टॅंकरची संख्या ३६६ पर्यंत घटली, तर एप्रिल २०१८ मध्ये ही संख्या १५२ टॅंकरवर आली. २०१६-१७ मध्ये ५,२८८ गावांची निवड झाली. यातल्या ९१३ गावांमध्ये एप्रिल २०१६ मध्ये ९७४, तर एप्रिल २०१७ मध्ये ४२५ आणि चालू वर्षीच्या एप्रिलमध्ये १४५ गावांमध्ये फक्त ११५ टॅंकर सुरू होते. २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या ५,०३१ गावांपैकी ४३८ गावांत एप्रिल २०१६ मध्ये ४३० टॅंकर, एप्रिल २०१७ मध्ये २०७ गावांमध्ये १८६; तर एप्रिल २०१८ मध्ये २४४ गावांमध्ये १४५ टॅंकर पाणी पुरवायचे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com