तुरीला लगाम; सोयाबीन किंचित वाढणार

अॅग्रोवनी
अॅग्रोवनी

सरकार हमीभावाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर बाजारात विक्रीसाठी आणणार असल्याने तुरीच्या दरातील तेजी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. हरभऱ्याच्या दरातही तेजी राहण्याची शक्यता नाही. सोयाबीनच्या बाजारभावात मात्र १०० ते १५० रुपये वाढ होण्याची शक्यता आहे.  तूर मंदावणार केंद्र सरकारने तुरीच्या आयातीवर बंधने घातल्याने गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत तुरीच्या दरात सुधारणा झाली. सरकारच्या नव्या नियमानुसार यंदाच्या हंगामासाठी केवळ २ लाख टन तूर आयातीची मर्यादा घालण्यात आली. त्यातील बहुतांश तूर यापूर्वीच आयात करण्यात आलेली असल्याने इथून पुढच्या कालावधीत तुरीची मोठी आयात होण्याची शक्यता नाही. परंतु गेल्या वर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे सरकारने तुरीची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. एकट्या महाराष्ट्रात सुमारे ६.६ लाख टन तुरीची हमीभावाने (५०५० रुपये क्विंटल) खरेदी करण्यात आली. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन सरकारने ही तूर बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तुरीचे भाव वाढले असले तरी ते अजूनही हमीभावापेक्षा खालीच आहेत. त्यामुळे सरकारला या तुरीच्या विक्रीत तोटा सहन करावा लागणार आहे. परंतु सणासुदीच्या काळात भाव नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने सरकारी तूर बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे. त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी संपुष्टात येणार असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.    गेल्या वर्षी शेतकऱ्यांना तुरीच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागल्यामुळे यंदा तुरीचा पेरा कमी झाला आहे. देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीचे लागवड क्षेत्र सुमारे २० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज आहे. परंतु गेल्या हंगामातील शिल्लक साठा मोठ्या प्रमाणावर आहे. सरकार आपल्याकडील साठा बाजारात विकून मोकळे होण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे यंदा तुरीच्या लागवडीचे क्षेत्र घटूनही दरात तेजी येण्याची शक्यता नाही. दोन दिवसांपासून पावसाला चांगली सुरवात झाल्यामुळे पीक उत्पादनाविषयीची काळजी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्याचाही बाजारावर परिणाम होईल.  सरकारने तुरीच्या आयातीवर बंधने घालण्याचा निर्णय घेतला, परंतु निर्यातीवरील बंदी अजूनही कायम आहे. सध्या जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत देशात तुरीचे दर कमी असल्यामुळे निर्यातीसाठी मोठी संधी नाही. परंतु आता निर्यातबंदी हटवली तर पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत निर्यातीचे मार्केट तयार होऊ शकते. त्यामुळे यंदाच्या खरिपात तुरीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा माल बाजारात येण्याच्या सुमारास चांगला भाव मिळू शकतो. त्या दृष्टीने निर्यातबंदी उठवण्याच्या बाबतीत सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.   हरभऱ्याच्या आयातीवर सरकारने बंधने घातलेली नसल्यामुळे ऑक्टोबरपासून आयात सुरू होईल. उत्पादन, आयात, मागणी आणि पुरवठ्याचे गणित पाहता हरभऱ्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता नाही.   सोयाबीन वधारणार सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली. देशात यंदाच्या हंगामात सोयाबीनच्या लागवडीत घट झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी पिकाची स्थिती समाधानकारक नाही. एकूण स्थिती पाहता सोयाबीनच्या दरात येणाऱ्या कालावधीत आणखी १०० ते १५० रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या लातूर व इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल ३२०० ते ३२५० रुपयांच्या दरम्यान आहेत. येत्या काही दिवसांत दर ३३०० ते ३४०० रुपयांच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. या किंमत पातळीला शेतकऱ्यांनी आपल्याकडील माल विकून टाकणे योग्य ठरेल. कारण यापेक्षा मोठी तेजी येण्याची शक्यता धुसर आहे.  

- सुरेश मंत्री (लेखक शेतीमाल बाजार विश्लेषक असून , प्रो इंटेलिट्रेड सर्व्हिसेसचे संचालक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com