जळगाव ः खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २० दिवसांपासून सुरू आहे. पण खरेदी अल्प किंवा रखडत सुरू आहे. ज्वारी, मका व बाजरीची अल्प खरेदी झाली असून, अनेक शेतकऱ्यांना आपली ज्वारी कमी दर्जामुळे परत न्यावी लागली आहे.
हमीभावासाठी शेतकऱ्यांनी आपले धान्य राखले होते. परंतु दर्जा (एफएक्यू) व इतर मुद्दे उपस्थित केले जात आहे. जळगाव जिल्ह्यात १९ खरेदी केंद्र सुरू केले आहेत. धुळे व नंदुरबारात मिळून १० खरेदी केंद्रे सुरू आहेत. खानदेशात मिळून पाच हजार क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. तर मका व बाजरीची खरेदी अल्पच आहे. सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली होती. तर मका व बाजरी विक्रीसाठी सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. खरेदी उशिरा सुरू झाली. त्यापूर्वी अनेक नोंदणीधारक शेतकऱ्यांनी बाजारात आपला मका, ज्वारी व बाजरीची विक्री केली. डिसेंबरच्या मध्यानंतर खानदेशात खरेदी सुरू झाली. बाजारात मका, ज्वारीला हमीभाव कुठेही मिळाला नाही. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातच खरेदी सुरू झाल्यानंतर ज्वारी उत्पादकांना दर्जाच्या निकषांमुळे आपली ज्वारी परत न्यावी लागत आहे. अनेक खरेदी केंद्रांमध्ये यावरून वादही झाले आहेत. पण प्रशासन कुठलेही कारण ऐकण्यास तयार नाही. मध्यंतरी काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली, परंतु प्रशासन कुठलीही दखल घेण्यास तयार नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.