सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात आतापर्यंत ५६ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या हंगामासाठी बँकांना २३५८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी १३३७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेने आघाडी घेतली आहे.
यंदा रब्बी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना २०४५ कोटी उद्दिष्ट दिले होते, त्यापैकी १००७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण बँकेस ६८ कोटीचे उद्दिष्ट दिले होते, त्यांनी ७७ कोटींचे, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेस २४४ कोटीचे उद्दिष्ट दिले होते. त्यांनी २५२ कोटींचे वाटप करत कर्जवाटपात सर्वाधिक आघाडी घेतली आहे. गेल्या चार वर्षांत रब्बी हंगामात दिलेल्या उद्दिष्टाच्या सरासरी ५० टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे, असा दावा अग्रणी बँकेने केला आहे. आता रब्बी हंगाम अगदी अंतिम टप्प्यात आहे. पण अनेक शेतकऱ्यांची प्रकरणे काही कागदपत्रांसाठी, काही नियम अटीमुळे अडकली आहेत. त्यांना हे कर्ज मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे आता पुन्हा कर्जवाटपाचा टक्का किती वाढतो, हे सांगता येत नाही. राष्ट्रीय बँकांची उदासीनता प्रामुख्याने स्टेट बँक, बँक ऑफ इंडियाकडून ५० टक्क्यांहून अधिक कर्जवाटप झाले आहे. बँक ऑफ इंडिया ५८ टक्के, स्टेट बँक ६५ टक्के, महाराष्ट्र बँक ४१ टक्के, आयसीआयसीआय बँक ३९ टक्के, बडोदा बँक ५० टक्के, युनियन बँक ४७ टक्के, आयडीबीआय बँक ३१ टक्के, सेंट्रल बँक १३ टक्के, एचडीएफसी बँक ३६ टक्के, कॅनरा बँक २५ टक्के, जिल्हा मध्यवर्ती बँक १०१ टक्के तर ग्रामीण बँक ९६ टक्के कर्जाचे वाटप केले आहे. यावरून राष्ट्रीय बँकांचा पुढाकार लक्षात येतो, जिल्हा बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांनी कमीच कर्जपुरवठा केला आहे. त्यावरून या बँकांची उदासीनता पुन्हा एकदा दिसून आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.