खरीप हंगामाच्या पिक लागवडीसाठी पूर्वतयारी म्हणून जमिनीची खोल नांगरणी करावी. जमीन १५ ते २० दिवस उन्हात चांगली तापू द्यावी. जेणेकरून जमिनीतील कीड, रोगाच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ता. ७ ते ११ एप्रिल दरम्यान हवामान कोरडे राहील. तापमानात फारसा बदल संभवत नसून कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. आकाश अंशत: ढगाळ राहील. आंबा
काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साहाय्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आंबा काढल्यानंतर लगेच सावलीमध्ये ठेवावा. तसेच आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. फळे काढणीनंतर देठकुजव्या आणि फळकूज या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळे काढणीनंतर लगेच ५२ अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत. आणि नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. फळांचे पॅकिंग कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये करावी. वाढीच्या अवस्थेत (वाटाणा ते सुपारी आकाराची फळे) असलेल्या आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. तसेच झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे. मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. बागेमधील गळालेली फळे गोळा करून नष्ट करावीत. आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी दापोली विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळे’ एकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे लावावेत. साधारणतः जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. काजूमध्ये रोठा या किडीच्या (खोडकिडीचा) प्रादुर्भावासाठी खोडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. खोडकिडीचा प्रादुर्भाव झाडाचे खोड व उघडी मुळे यावर दिसून येतो. खोडकिडीची अळी झाडाची साल पोखरून आतील गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. खोडातून भुसा येताना दिसल्यास, नियंत्रणासाठी १५ एम. एम. पटाशीच्या साह्याने खोडाची प्रादुर्भावित साल काढून रोठ्याला बाहेर काढून मारून टाकावे. क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या द्रावणाने साल काढलेला भाग चांगला भिजवावा. हे करताना झाडाला कोणत्याही प्रकारे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. इजा झाल्यास त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळे उघडी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. बागेतील नियमित गवत काढावे. बाग स्वच्छ ठेवावी. नारळामध्ये सोंड्या भुंग्याच्या प्रादुर्भावासाठी माडाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. या किडीच्या अळ्या माडाच्या खोडातील मऊ गाभा खाऊन खोड आतून पोखरतात. अळ्या खोडाच्या आतमध्ये असल्याने प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी बुंध्यावर छिद्रे दिसतात. त्यातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव वाहताना दिसतो. किडीच्या नियंत्रणासाठी कोयतीच्या साह्याने छिद्रातून शक्य असतील तेवढ्या अळ्या कोयतीच्या साहाय्याने बाहेर काढाव्यात. माडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये. इजा झाल्यास त्यावर बोर्डोपेस्ट लावावी. सोंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी बागेत एकरी १ गंध सापळा लावावा. गंध सापळ्यात असलेले आमिष (ल्युर) साधारण २ ते ३ महिन्यांपर्यत कार्यक्षम राहते. नवीन फळबाग लागवड नवीन फळबाग लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये साफ सफाई करून घ्यावी. वाल, चवळी
पक्व शेंगांची तोडणी करून ४ ते ५ दिवस शेंगा उन्हात वाळवाव्यात आणि मळणी करावी. किंवा शेंगा झाडावर वाळल्यानंतर पिकाची कापणी करून झाडे खळ्यावर ३ ते ४ दिवस उन्हात वाळवावीत व नंतर मळणी करावी. साठवणूकीमध्ये भुंग्याचा उपद्रव टाळण्यासाठी वालाचे दाणे मातीच्या खळीचा थर देऊन चांगले वाळवावेत. खरीप हंगामासाठी हळद लागवड करावयाच्या जमिनीची पूर्व मशागत करण्यास सुरवात करावी. यासाठी पहिली नांगरणी १८ ते २२ सें.मी. खोल करून जमीन १५ ते २० दिवस उन्हात चांगली तापू द्यावी. जेणेकरून कीड, रोगाच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल. पायलाग रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशूवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना लसीकरण करून घ्यावे. जनावरांना हिरवा चारा देण्याची व्यवस्था करावी. पिण्यास थंड पाणी द्यावे. कुक्कुटपालन कुक्कुट पक्ष्यांना रानीखेत रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पशूवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. भुईमूग
भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकावर पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीची अळी पानांच्या वरचा पापुद्रा पोखरून आतील भाग खातात. नंतर शेजारील पानांच्या गुंडाळ्या करून त्यात राहून उपजीविका करते. परिणामी पाने वाळतात. नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि - ०२३५८- २८२३८७ - डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ - डॉ. शीतल यादव,८३७९९०११६० (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)