पीक अवशेषाचा आच्छादन म्हणून वापर करावा. आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. सिंचनासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. कापूस
मागील हंगामातील कपाशीची धस्कटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. त्यामुळे त्यावर असलेल्या किडींच्या अवस्था नष्ट होतील. जमिनीची खोल नांगरट करावी. जेणेकरून जमिनीत असणाऱ्या गुलाबी बोंड अळीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील. नवीन लागवड केलेल्या फळाबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे. फळबागांमधील बाष्पीभवन कमी होण्यासाठी पालापाचोळ्याचे आच्छादन करावे व ठिबकद्वारे पाणी द्यावे. लसूण पीक काढणी अवस्थेत असल्यास तीन आठवडे आधी पाणी तोडावे. प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो. पाणी झिरपण्याचा वेग जास्त असणाऱ्या जमिनीत आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून गरजेइतकेच पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा खोलवर निचरा होत नाही व जमिनीची धूप होत नाही. या पद्धतीद्वारे रासायनिक खते देणे शक्य असते. तणांचे प्रमाण, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे शक्य असते. तुषार सिंचनानंतर पाऊस पडला तरी पिकांवर अनिष्ठ परिणाम होत नाही. कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर सिंचन करता येते. पाण्याच्या कमतरतेनुसार पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर (ठिबक व तुषार सिंचन) पीकनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात करावा. त्यामुळे पाण्याची बचत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. संपर्क ः ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)