जोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले बियाणे) भात बियाण्यांची पेरणी करून रोपवाटिका तयार करावी. भात रोपवाटिकेत बेणणी करून युरिया खताची दुसरी मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा क्षेत्राला पेरणीनंतर १५ दिवसांनी पावसाची उघडीप पाहून द्यावी. हवामान अंदाज विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक २० ते २६ जून, २०२१ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल. कमाल आणि किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे. खरीप भात
भात रोपवाटिकेतून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. जोरदार पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान झाले असल्यास, अशा ठिकाणी रहू पद्धतीने (मोड आलेले बियाणे) भात बियाण्यांची पेरणी करून रोपवाटिका तयार करावी. भात रोपवाटिकेत बेणणी करून युरिया खताची दुसरी मात्रा १ किलो युरिया प्रति गुंठा क्षेत्राला पेरणीनंतर १५ दिवसांनी पावसाची उघडीप पाहून द्यावी. भात पिकाची पुनर्लागवड करावयाच्या क्षेत्रामध्ये नांगरणी करावी. नांगरणीच्या वेळेस चांगले कुजलेले शेणखत एकरी ३ टन जमिनीत मिसळावे. बांधबंदिस्ती करावी. तसेच बांध तणमुक्त ठेवावेत. जेणेकरून किडींच्या खाद्य वनस्पतींचा समूळ नायनाट केल्याने भात पिकावर किडींचा प्रादुर्भाव कमी होईल. बांधावरील खेकड्यांच्या नियंत्रणासाठी सलग २ ते ३ रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या उजेडात पकडून त्यांची संख्या कमी करावी. नंतर विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचे नियंत्रण करावे. विषारी आमिष करण्याची पद्धत १ किलो शिजलेल्या भातामध्ये ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी पावडर) ७५ ग्रॅम मिसळून विषारी आमिष तयार करावे. या मिश्रणाच्या गोळ्या तयार कराव्यात. प्रत्येक छिद्राच्या आत तोंडाशी एक गोळी ठेवावी व छिद्र बुजवावे. दुसऱ्या दिवशी जी छिद्रे उकरली जातील, त्यात परत आमिष वापरावे. विषारी आमिषाचा वापर सांघिकरीत्या व एकाच वेळी केल्यास खेकड्यांचे नियंत्रण करण्यास मदत होईल. नागली
बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागली रोपवाटिका पेरणीची कामे पूर्ण करून घ्यावीत. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम (बुरशीनाशक) २.५ ग्रॅम चोळावे. रोपवाटिकेसाठी तयार केलेल्या गादीवाफ्यावर प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खताची मात्रा द्यावी. वाफ्यावर दोन ओळींतील अंतर १० सेंमी ठेवून बी ओळीत पेरावे. पेरणी विरळ व उथळ करावी. बी मातीने झाकून घ्यावे. तसेच पेरणी केलेल्या गादीवाफ्यातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. आंबा बागेला खत देण्याचे काम पूर्ण करावे. एक वर्षाच्या आंबा कलमास ५ किलो शेणखत, ३२५ ग्रॅम युरिया, ३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १६६ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रती कलम देण्यात यावी. हे प्रमाण दरवर्षी समप्रमाणात वाढवत न्यावे. दहा वर्षांवरील प्रत्येक आंबा कलमांस ५० किलो चांगले कुजलेले शेणखत, ३ किलो २५० ग्रॅम युरिया, ३ किलो १२५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २ किलो सल्फेट ऑफ पोटॅश किंवा १ किलो ६६० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा प्रती कलम बांगडी पद्धतीने देण्यात यावी. खते कलमाच्या विस्ताराच्या आत सुमारे ४५ ते ६० सेंमी रुंद आणि १५ सेंमी खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. चरामध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावेत. पावसाची तीव्रता कमी असताना झाडास खते द्यावीत. पालाश खताची मात्रा सल्फेट ऑफ पोटॅशच्या माध्यमातून दिल्यास फळांमध्ये साका येण्याचे प्रमाण कमी होते. पावसाची शक्यता असल्याने नारळ बागेस खते देणे पूर्ण करावे. नारळाच्या पाच वर्षावरील प्रती माडास ३० किलो शेणखत, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ७५० ग्रॅम युरिया व ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा बांगडी पद्धतीने देण्यात यावी. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस, पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट खतमात्रा द्यावी. पावसाची तीव्रता कमी असताना माडास खते द्यावीत. नवीन फळबाग लागवडीची कामे हाती घ्यावीत. लागवडीसाठी पूर्वतयारी केलेल्या जागेवर आंबा, काजू, चिकू, आवळा, फणस फळझाडांच्या नवीन रोपांची लागवड करावी. पिशवीतील कलम मातीच्या हुंडीसह माती, शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या मिश्रणाने भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी ठेवून कलम लावावे. लागवड करतेवेळी कलमाचा जोड जमिनीच्या थोडा वर राहील याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर कलमांना काठीचा आधार द्यावा. वांगी, मिरची, टोमॅटो इत्यादी भाजीपाला रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी बेणणी करावी. त्यानंतर पावसाची उघडीप पाहून प्रती वाफ्यास ५० ग्रॅम युरिया खताची मात्रा द्यावी. कंद पिकाची लागवड पूर्ण करून घ्यावी. तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे पातळ संडास होणे, खाणे कमी होणे तसेच वजन घटणे अशी लक्षणे दिसून येतात. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना अलबेन्डाझॉल ७.५ मिलिग्रॅम प्रति किलो शेळी वजन या प्रमाणात औषध द्यावे. (टीप : ही जॉइंट ॲग्रस्को शिफारस नाही. तथापि, हे विद्यापीठामध्ये घेण्यात आलेल्या संशोधनातील निष्कर्ष आहेत. ) - (०२३५८) २८२३८७ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)