हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, रायगड, ठाणे जिल्ह्यांतील बऱ्याच ठिकाणी ९ ते १३ ऑक्टोबर या दरम्यान मध्यम स्वरूपाच्या, तर रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ संभवते. इशारा रायगड व ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी ८ ते ११ ऑक्टोबर दरम्यान, तर रत्नागिरी जिल्ह्यात ८ ते १२ ऑक्टोबरदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगाच्या वाऱ्यासह (३०-४० कि.मी.प्रति तास) जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरीप भात
दाणे भरण्याची अवस्था (निम गरव्या) फुलोरा अवस्था (गरव्या जाती) निमगरवे भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. गरवे भात फुलोरा अवस्थेत असून, पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत नियंत्रित करावी. हळवे भात पक्वता अवस्थेत असल्याने खाचरातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी. गरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा ७०० ग्रॅम युरिया प्रति गुंठा द्यावी. आपल्या भागातील संध्याकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता अंदाज घेऊन हळवे भात पिकाची कापणी जमिनीलगत ‘वैभव’ विळ्याने करावी. कापणी केल्यानंतर भात शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी न्यावे. मळणी करून उत्पादित भात कोरड्या व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावे. दुधाळ अवस्थेत असलेल्या निम गरवे आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या गरवे भात पिकावर लोंबीवरील ढेकण्या किडीच्या प्रादुर्भाव दिसून येत आहेत. पीक दुधाळ अवस्थेत असताना प्रौढ ढेकण्या व त्याची लहान पिले दाण्याला छिद्र पाडून आतील रस शोषतात. त्यामुळे दाणे पोचट राहतात आणि लोंब्या अर्धवट भरतात. अशा दाण्यावर एक सूक्ष्म छिद्र दिसून येते. छिद्राभोवती काळपट, तपकिरी ठिपका तयार होतो. प्रति चूड एक ढेकण्या आढळून आल्यास किडीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मि.लि. किंवा डेल्टामेथ्रीन (२.८% प्रवाही) ०.९ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारशी आहेत.) पावसाची उघडझाप, तापमानात वाढ यामुळे माळजमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तयार हळव्या भात पिकाची त्वरित कापणी करावी. कापणीनंतर जमिनीची खोल नांगरणी करावी. यामुळे किडीचे सुप्तावस्थेतील कोष नष्ट होण्यास मदत होईल. लष्करी अळीचा प्रादुर्भाव निमगरव्या आणि गरव्या भात जातीवरही दिसून येऊ शकतो. किडीच्या प्रादुर्भाव लक्षात येण्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री या किडीच्या अळ्या लोंब्या कुरतडतात, त्यामुळे दाणे जमिनीवर गळतात. किडीच्या नियंत्रणासाठी अंडीपुंज आणि अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. निमगरव्या आणि गरव्या जातींवर प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, क्लोरपायरिफॉस (१.५ टक्का भुकटी) २०० ग्रॅम प्रति गुंठा या प्रमाणे सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना धुरळणी करावी. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस). पावसाची उघडझाप, ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, पाणथळ भागातील गरवे भात खाचरातील पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येईल. विशेषतः जिथे दाट लागवड आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढेल. तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी, भाताची पाने पिवळी पडून नंतर वाळतात. जर रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) २.२५ ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.लि. टीप : फवारणी करताना द्रावण चुडाच्या बुंध्यावर पडेल, याची दक्षता घ्यावी. तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठवता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. नागली/नाचणी
बुधवार ते शुक्रवार (ता. ६ ते ८) दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची, तर शनिवार- रविवारी (ता. ९ -१०) हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे संध्याकाळी पावसाची अधिक शक्यता असून, कापणीस तयार झालेल्या नागली पिकाची कणसे पावसापूर्वी विळ्याने कापून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी आणावीत. वाळविण्यासाठी पसरून ठेवावीत. वाळल्यानंतर मळणी करण्याची प्रक्रिया करावी. आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी बागेतील गवत काढून बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण बाष्पीभवनामुळे लवकर कमी होऊन झाडांना ताण बसण्यास मदत होईल. काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पालवीतील रस शोषून घेते, त्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. नियंत्रणासाठी पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी (प्रमाण -प्रति लिटर पाणी) प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. (टीप : लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस) काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. नारळावरील इरिओफाइड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, चट्टे दिसून येतात. नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भावग्रस्त भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी, नारळ लहान राहतात. लहान फळांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी कडुनिंबयुक्त कीटकनाशक (ॲझाडिरॅक्टीन १ हजार पीपीएम) ७.५ मि.लि. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावे. हे द्रावण दिल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय शक्य असल्यास नारळ झाडांवर विशेषतः घडावर पडेल अशा प्रकारे कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मि.लि. प्रति लिटर पाणी ही फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व तयार, कीडग्रस्त नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत. पावसाचा अंदाज घेऊन तापमानात वाढ झाल्यास बाष्पीभवनात वाढ संभवते. नारळ बागेस पावसाचा अंदाज घेऊन ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. सुपारी / हळद तापमानात वाढीमुळे बाष्पीभवनात वाढ संभवते. सुपारी बागेत पावसाचा अंदाज घेऊन ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. चिकू
चिकू बागेस ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. चिकू बागांची गवत काढून साफसफाई करावी. वाळलेल्या, मृत आणि अशक्त फांद्या कापून विरळणी करावी. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. संपूर्ण झाडावर बोर्डो मिश्रणाची (१ टक्क) फवारणी करावी. रब्बी हंगामासाठी मिरची, वांगी, टोमॅटो पिकाची रोपे तयार करण्याकरिता जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरू करावीत. वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा मिसळावे. ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ से.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. पेरणीच्या वेळेस गादीवाफ्यावर प्रति चौरस मीटर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून १० सें.मी. अंतरावर ओळीने बियाण्याची पेरणी करावी. पेरणी करण्याआधी मातीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य मररोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून त्याचे पातळ आवरण बियाण्याभोवती होईल असे पाहावे. तापमानात वाढ संभवते. पेरणी केलेल्या भाजीपाला रोपवाटिकेला पाणी देण्याची व्यवस्था करावी. - ०२३५८ - २८२३८७ (ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)