प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात शनिवार (२० मार्च) रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. १७ ते २१ मार्च या दरम्यान आर्द्रतेत घट संभवते व आकाश निरभ्र राहील. इशारा शनिवार (२० मार्च) रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता असल्याने गाई, म्हशी इ. जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी व पाण्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर बांधावीत. आंबा
शनिवारी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने आंबा काढणीस तयार असलेल्या आंब्याची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह आंबा फळांची काढणी झेल्याच्या साह्याने सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढू शकते. आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस अगोदर झाडावर कोणतीही फवारणी करू नये. देठकुजव्या, फळकूज या काढणीपश्चात बुरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेच फळे ५२ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावे. नंतर ही फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळांचे पॅकिंग करावे. संभाव्य पाऊस झाल्यास आंबा फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळे डाग पडण्याची शक्यता असते. पाऊस झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम. आर्द्रतेत घट संभवत असल्याने वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांच्या अवस्थेत असलेल्या आंबा झाडाला ताण बसून फळगळ होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे. मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देणे बंद करावे. आंबा फळांचे संभाव्य पावसापासून संरक्षणासाठी अंड्याच्या आकाराच्या आंबा फळांना २५ × २० सें.मी. आकाराच्या कागदी/ वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. मोठ्या आकाराच्या आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी शिफारशीत रक्षक फळमाशी सापळे एकरी २ या प्रमाणात लावावेत. हे सापळे बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावेत. काही ठिकाणी आंबा, मोहोर तसेच फळधारणा अवस्थेत असलेल्या बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव कमी असल्यास निमयुक्त कीटकनाशक ॲझाडिरेक्टीन १ टक्का (१०,००० पीपीएम) ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. प्रादुर्भाव आर्थिक नुकसानपातळीपेक्षा जास्त असल्यास, थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्ल्यू. जी.) १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. बी अवस्थेत असलेल्या काजूवर ढेकण्या आणि मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडी कोवळ्या बी आणि बोंडातील रस शोषून घेतात. मावा कीटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर मुंग्या आकर्षित होताना दिसून येतात. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडींच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ॲसिटामिप्रीड (२० टक्के एसपी) ०.५ ग्रॅम. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.) आर्द्रतेत घट संभवत असल्याने भेंडी पिकास ४-५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी देण्याची व्यवस्था करावी. भेंडी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा तसेच मावा कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतात. प्रादुर्भाव असलेल्या कीडग्रस्त फांद्या व फळे जमा करून नष्ट करावीत. नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि. लि. शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ५ गंध सापळे वापरावेत. - (०२३५८) २८२३८७ (कृषी विद्या विभाग व ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)