भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइप्रमाणे पोकळ आडवे छिद्रे पाडले जाते, यालाच ‘मोल निचरा पद्धत’ असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावे लागतात. जमीन नैसर्गिक उताराची असावी. पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. उसासारखे बहुवर्षिक बागायती पीक असल्यास नांगरट आवश्यक असते. त्यामुळे उसाची धसकटे, खोडक्या वगैरे निघून जमीन स्वच्छ होते. त्याबरोबरच पिकाच्या कालावधीत दिलेल्या पाण्यामुळे घट्ट झालेली जमीन मऊ करता येते. भुईमुगासारख्या काही पिकांना जमीन भुसभुशीत लागते, त्यासाठी नांगरट करणे आवश्यक असते. नांगरटीचे फायदे
पूर्वीच्या पिकाची धसकटे, बुडखे निघतात. योग्य वेळी नांगरट केल्यामुळे जमीन दीर्घकाळ सूर्यप्रकाशात उघडी राहून चांगली तापते. यामुळे किडींचा नायनाट होतो. पिकांचा पालापाचोळा, धसकटे जमिनीत गाडली जाऊन तिथे कुजतात. थराची उलथापालथ होऊन जमीन भुसभुशीत होते. बागायती पिकं घेताना सुरुवातीला त्यांना करावी लागणारी रानबांधणी आणि दिलं जाणार पाणी योग्य प्रकारे साठवण्यासाठी खोल नांगरट जरूर आहे. हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते. जमिनीचा पोत आणि रासायनिक तसेच भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. नांगरट उताराला आडवी नांगरट केल्यामुळे पावसाचे पाणी अडविले जाऊन जमिनीत मुरते. सबसॉयलर चालविण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल हा कालावधी चांगला असतो. सबसॉयलर चालवण्यापूर्वी जमिनीमध्ये असलेल्या पाण्याची पाइपलाइन, विजेच्या तारा असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे. तसेच काम करतेवेळी त्या तुटणार नाही याची दक्षता घ्यावी. सबसॉयलरला हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून २.५ ते ३ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ १ फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते. पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर (हार्ड पॅन) फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्यक आहे. हलक्या व कमी खोलीच्या जमिनीत २.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत २.५ ते ३ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो. नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्टरच्या अश्वशक्तीनुसार २.५ ते ३ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते. सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी. सबसॉयलर वापरल्यानंतर जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापू द्यावी. आणि नंतरच पुढील मशागत करावी. सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते. जमिनीस वाफसा लवकर येतो. तसेच जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते. जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते. मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापला जातो. त्यामुळे जमिनीखालून १ पोकळ फट तयार होते. मोल तयार झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने मशागत करावी. त्यामुळे मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतात. पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. तसेच जमिनीमध्ये मुरलेले अतिरिक्त पाणीसुद्धा मोलमध्ये जमा होते. अतिरिक्त पाणी जमिनीच्या उताराच्या दिशेने वाहून जाते. साध्या नांगराप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्टरला जोडून वापरले जाते. प्रत्येकी ४ मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. क्षारपड, पाणथळ जमिनीमध्ये भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. या पद्धतीसाठी साधारणतः हेक्टरी ४ हजार रुपये इतका खर्च येतो. मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास ३ ते ५ वर्षे टिकू शकते. कमी निचरा होणाऱ्या भारी काळ्या जमिनीमधून प्रभावी निचरा होण्यासाठी, तसेच अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा प्रणालीचा अवलंब करावा. त्यासाठी दोन मोलमधील अंतर ४ मीटर व खोली ०.६० मीटर ठेवावी. वापरण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता
जमीन नैसर्गिक उताराची असावी. १ ते १.५ टक्का उतार असलेली जमीन मोल निचरा पद्धतीसाठी उत्तम असते. मोल करताना ४० ते ७५ सें.मी. खोलीवरील मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण २० ते २५ टक्के असावे. कारण नांगर ४० ते ७५ सें.मी. खोलीवरून चालवले जाते. त्यामुळे या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. ओलावा जास्त असेल तर ट्रॅक्टर जमिनीमध्ये रुतू शकतो. मोलमधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ ७५ ते ९० सें.मी. खोलीची उघडी चर असावी. ट्रॅक्टरचा वेग १ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा कमी ठेवावा. - वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ (विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जि. जळगाव)