उन्हाळी भेंडीची पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. पेरणी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी. गरजेनुसार विरळणी करून २ रोपांतील अंतर ३० ते ४५ सेंमी ठेवावे. लागवडीसाठी हेक्टरी १०-१२ किलो बियाणे पुरेसे आहे. उन्हाळी हंगामात घेतले जाणारे भेंडी हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भेंडी पिकास बाजारात वर्षभर मागणी असते. त्यामुळे भेंडीचे पीक हे वर्षभर घेतले जाते. भेंडीमध्ये कॅल्शिअम, आयोडीन आणि जीवनसत्वे क भरपूर प्रमाणात असते.
भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान या पिकास उपयुक्त असते. तापमान २० ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास बियांची उगवण व झाडाची वाढ चांगली होते. आणि फूलगळ होत नाही. भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरच्या थरातून होत असते. लागवडीसाठी मध्यम भारी ते काळी कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ६.८ पर्यंत आणि क्षारता ०.२० पेक्षा कमी असावा. चोपण, क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमिनीत लागवड करणे टाळावे. एकाच जमिनीत भेंडीची वारंवार लागवड करू नये. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा. जाती परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले कीर्ती, फुले उत्कर्षा, पुसा सावनी, कामिनी, पुसा मखमाली. बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा किंवा थायरम ४ ग्रॅम प्रति किलो बियाणास प्रक्रिया करावी. दोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. गरजेनुसार २ ते ३ वेळा खुरपण्या करून झाडांना भर द्यावी. हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २५ किलो पालाश द्यावे. लागवडीवेळी नत्राची अर्धी आणि स्फुरद, पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी. पेरणीच्या एक महिन्यानंतर नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो या प्रमाणात द्यावा. सतत एकाच जमिनीत भेंडीचे पीक घेऊ नये. भेंडीचे पीक घेण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाचे अवशेष नष्ट करावेत. पीक वाढीच्या अवस्थेत नत्र खताचा वापर कमी करून पोषण संतुलन करावे. शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी गंध सापळे व प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झेंडूचे आंतरपीक घ्यावे. किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणे करावा. पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर लागवड करावी. पेरणी ४५ बाय १५ किंवा ६० बाय २० सेंमी अंतरावर करावी. गरजेनुसार विरळणी करून २ रोपांतील अंतर ३० ते ४५ सेंमी ठेवावे. लागवडीसाठी हेक्टरी १०-१२ किलो बियाणे पुरेसे आहे. पेरणीनंतर पिकांस हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ ते ७ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास भेंडी पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी २ ओळींत सुक्या गवताचे आच्छादन करावे. - डॉ. बालाजी थोरात, ९१४५७ ७२२९३ (डॉ.. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)