सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत आणि पीक उत्पादनात वाढ शक्य आहे. प्रचलित ठिबक सिंचनामध्ये जरी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत खूप फायदे असले, तरी त्यात नवीन बदल होत आहेत. यातील तंत्रज्ञान समजावून घेऊन अवलंब करणे फायदेशीर ठरते. ठिबक सिंचनामध्ये दाबनियंत्रीत गळती रहित ड्रीपर (पीसीएनडी) हे नवीन तंत्रज्ञान आहे. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या ठिबक यंत्रणेमध्ये ठिबक नलिका तसेच सबमेन, ठिबक यंत्रणा बंद केल्यानंतर रिकाम्या होतात. जेव्हा ठिबक यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते, तेव्हा ठिबक यंत्रणेतील नलिका व सबमेन यांना पूर्णपणे पाण्याने भरण्यासाठी आणि त्यानंतर आवश्यक तो दाब प्रस्थापित होण्यासाठी काही कालावधी लागतो. या कालावधीत काही झाडांना पाणी मिळते, तर काही झाडांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे झाडाझाडांत पाणी मिळण्याचे प्रमाण असमान असते. सामान्य ठिबक सिंचन यंत्रणेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त समानतेने पाणी देणे अपेक्षित असते. ही समानता यंत्रणेत पूर्णपणे पाणी भरल्यावर व सर्व नळ्यांत दाब प्रस्थापित झाल्यावर प्रत्यक्षात येते. तोपर्यंत काही पिकाला पाणी मिळण्यामध्ये असमानता झालेली असते. अशीच असमानता ठिबक यंत्रणेतील व्हॉल्व्ह बंद केल्यानंतर पुन्हा दिसून येते. यासाठी पीसीएनडी यंत्रणेचा वापर महत्त्वाचा ठरतो. पीसीएनडी यंत्रणेचा वापर
पाणीपुरवठ्यामध्ये असमानता होऊ नये म्हणून पीसीएनडी (PCND) यंत्रणा ठिबक सिंचनामध्ये उपलब्ध आहे. या यंत्रणेत ड्रीपरमध्ये PC (Pressure Compensating) आणि ND (Non Drain) अशा दोन यंत्रणा असतात. पीसी यंत्रणेमुळे ठिबक सिंचन यंत्रणेत सर्व पिकांना शेताच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक समान पाणी मिळते. व्हॉल्व्हपासून कमी, जास्त असलेले झाडाचे अंतर, पाण्याची लॅटरल व पीव्हीसी पाइपच्या अंतर्गत पृष्ठभागावर होणारे घर्षण (दाबाचा ऱ्हास) व कमी होणाऱ्या दाबामुळे तसेच शेतातील उंच सखल चढउतारामुळे पडणाऱ्या दाबामुळे ठिबक सिंचन यंत्रणेत झाडाला दिल्या जाणाऱ्या पाण्यात फरक पडत असतो. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या ठिबक यंत्रणेत अशा फरक पडणाऱ्या दाबामुळे झाडाला मिळणाऱ्या पाण्याच्या व खताच्या मात्रेत काही प्रमाणात फरक पडतो. तो फरक पीसी यंत्रणेत होत नाही, कारण पीसी यंत्रणेत वापरल्या गेलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रणा साधारणपणे एक किलो प्रति सें.मी. वर्ग ते चार किलो प्रति सें.मी. वर्ग इतक्या मोठ्या दाबातील फरकाला सुद्धा एकसमान पाणी देते. एनडी या घटकामुळे ठिबक यंत्रणेत जेव्हा दाब नसतो, तेव्हा यंत्रणा कार्यरत होऊन ड्रीपरला बंद करायचे काम करते. जोपर्यंत ठिबक यंत्रणेत दाब तयार होत नाही, तोपर्यंत लॅटरल व सबमेनमध्ये पाणी तुंबून ठेवले जाते. पुन्हा जेव्हा पंप व व्हॉल्व्ह चालू केले जातात आणि ठिबक यंत्रणेत दाब निर्माण होतो, तेव्हा ड्रीपरमधून पाणी पुन्हा पडण्यास सुरुवात होते. ठिबक यंत्रणा बंद केल्यानंतरही त्यामध्ये पाणी भरून राहिल्यामुळे जेव्हा यंत्रणा पुन्हा सुरू केली जाते, तेव्हा सर्व यंत्रणेतून तत्काळ पाणी पूर्ण प्रवाहाने येऊन सर्व पिकास एक समान पाणी मिळण्यास सुरुवात होते. हरितगृहे, उच्च गुणवत्तेची पिके, पाणी संवेदनशील पिके, पल्स पद्धतीने पाणी देण्याची गरज असलेली पिके इत्यादीमध्ये हे तंत्रज्ञान फायदेशीर आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणी व खतांचा योग्य वापर होऊन उत्पादनात वाढ मिळते. जास्त पाण्यामुळे मुळांच्या कक्षेत आवश्यक ते माती, हवा (ऑक्सिजन) आणि पाणी यांचे संतुलित प्रमाण नसल्यामुळे पिके चांगल्या पद्धतीने येत नाहीत. दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पाण्याचा पातळीमुळे पाण्याची बचत करणे अपरिहार्य आहे. अशा परिस्थितीत मातीच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी करणे फायद्याचे ठरेल. त्यासाठी पृष्ठभागाखालून ठिबक नलिकाद्वारे थेट मुळांच्या कक्षेत पाणी व खते देणे, हा देखील योग्य पर्याय ठरणार आहे. खते वापरताना योग्य खतांच्या ग्रेड व त्यांचे रासायनिक घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य सामू असलेली खते वापरल्याने जास्त सामू असलेल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत होते. त्यासाठी खतांचा सामू, क्षार गुणांक, खते पाण्यात विरघळणाचे प्रमाण आणि विद्युत वाहकता हे चार घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वयंचलित यंत्रणा फायदेशीर स्मार्टफोनद्वारे स्वयंचलित यंत्रणेत वेळ, पाणी, मजुरी व अन्य संसाधनाची बचत करून पीक उत्पादन वाढविणे शक्य होते. जीएसआय/जीएसएम प्रणालीचा वापर करून शेतातील स्वयंचलित ठिबक यंत्रणा मोबाईल व इंटरनेटद्वारे संचालित करता येते. यामुळे योग्य वेळेस अचूकपणे खते व पाणी देऊन पीक उत्पादनवाढीला मदत होते. स्वयंचलित यंत्रणा यंत्रणा संगणकाच्या माध्यमातून सुद्धा वापरता येते.
शेतावर जीएसएम / जीएसआय संचलित कंट्रोलर बसवले जाते. त्यात एका सिम कार्डच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे ठिबक यंत्रणा संचलित करण्यासाठी आवश्यक संदेश पाठविला जातो. हा संदेश एकदा पाठविल्यानंतर पुढे जोपर्यंत तो बदलायची आवश्यकता नसते, तोपर्यंत प्रोग्रॅमच्या स्वरूपात कायम असतो. त्यामुळे नित्यपणे ठिबक यंत्रणा कार्यरत राहते. कंट्रोलरद्वारे शेतातील स्वयंचलित व्हॉल्व्ह, पंप, खताची यंत्रणा, फिल्टरची स्वच्छता स्वयंचलित पद्धतीने कार्य करतात. विद्युत पुरवठा नसल्यास, पाण्याचा स्रोतात पाणी नसल्यामुळे, खताच्या टाकीत खताचे द्रावण नसल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे यंत्रणा सुव्यवस्थित कार्य करू शकत नसेल तर तसा संदेश ईमेलद्वारे शेतकऱ्यांना पाठविला जातो. यंत्रणा व्यवस्थित पाणी व खते देते की नाही हे शेतकरी स्वतः मोबाईल मध्ये किंवा संगणकावर पाहू शकतात. पाच वर्षांपर्यंतचा पाणी आणि खते दिल्याचा तपशील शेतकरी कधीही तपासू शकतात. या यंत्रणेत विविध प्रकारचे सेंसर बसविणे शक्य आहे. - सुनील पाटील, ०२०- २७५१८३०० (सहायक उपाध्यक्ष, फिनोलेक्स प्लासाँन इंडस्ट्रीज प्रा.लि, पुणे)