जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादन, गर्भ वाढ आणि शरीरक्रियेसाठी करतात. बाहेरील वातावरणातील उष्णता वाढल्यास जनावरांवर ताण येतो. परिणामी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची अतिरिक्त ऊर्जा खर्च होते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरांना अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. गायींच्या तुलनेत म्हशींची कातडी जाड, काळ्या रंगाची असते. म्हशींमध्ये घाम ग्रथींची संख्या कमी असल्याने घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे गायींपेक्षा म्हशींना वाढत्या तापमानाचा जास्त त्रास जाणवतो. जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादन, गर्भ वाढ आणि शरीरक्रियेसाठी करतात. बाहेरील वातावरणातील उष्णता वाढल्यास जनावरांवर ताण येतो. परिणामी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची अतिरिक्त ऊर्जा खर्च होते.
दूध उत्पादन, शरीर पोषण आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. वासरे आणि कालवडींच्या वाढीवर अधिक परिणाम होतो. दुधातील घटकांमध्ये बदल होतो. स्निग्धांश आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते. प्रजनन यंत्रणेवर परिणाम दिसून येतो. अतिउष्णतेमुळे गाई आणि म्हशींमध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची दिसतात. परिणामी, गाभण राहण्यास अडचणी येतात. जनावरे उष्माघाताला बळी पडतात. तहान आणि भूक मंदावून ती अस्वस्थ होतात. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते, धाप लागते. श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो. जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यांमधून पाणी गळते. लघवीचे प्रमाणही कमी होते. लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे इत्यादी लक्षणे दिसतात. जनावरांमध्ये आम्लपित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकतो. पचनक्रिया बाधित होते. गर्भपात व अकाली प्रसूती होते. जनावरे एकाच जागी दिवसभर बसून राहतात. चालताना अडखळतात. उपाययोजना गोठ्याचे व्यवस्थापन
गोठ्याचे छप्पर सिमेंट पत्र्याचे असावे. त्यावर वाळलेले गवत, कडब्याची मोळी किंवा उसाचे पाचट टाकावे. छताच्या पत्र्याला पांढरा रंग द्यावा. जेणेकरून उष्णतेचे परावर्तन होऊन गोठ्यात थंडावा राहण्यास मदत होईल. गोठ्यातील छताची उंची जास्त असावी. यामुळे बाहेरून येणारी गरम हवा बाहेर टाकली जाईल. दुपारच्या वेळी गोठ्यातील तापमान कमी ठेवण्यासाठी स्प्रिंकलर आणि फॉगरचा दर तासाला ३ ते ४ मिनिटांसाठी वापर कारावा. गोठा कोरडा राहील यासाठी फॅनचा वापर करावा किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा जनावरांना थंड पाण्याने धुवावे. थेट सूर्यप्रकाशापासून बचावाकरिता जनावरांना झाडाखाली किंवा सावलीमध्ये बांधावे. गोठ्याच्या बाजूने गोणपाट किंवा पोती पाण्याने भिजवून बांधावीत. दुधाळ जनावरे विशिष्ट अंतरावर बांधावीत. जेणेकरून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेमुळे जनावरांवर ताण पडणार नाही. गोठ्यातील तापमान नियंत्रित राहील. दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर ओले केलेले कापड किंवा पोती टाकावीत. दुपारच्या वेळी जनावरांची वाहतूक करणे टाळावे. गोठ्याच्या सभोवताली झाडे लावावीत. जनावरांच्या आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा समावेश करावा. जेणेकरून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून तापमान योग्य ठेवण्यास मदत होईल. जनावरांना पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी पाण्यामध्ये बर्फाचा वापर करावा. पाण्यामधून इलेक्ट्रोलाइट पावडर, ग्लुकोज पावडर व गूळ मिश्रित पाणी द्यावे. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे किंवा पाणी देण्याच्या वेळा वाढवाव्यात. दुपारच्या वेळी किंवा भर उन्हात जनावरांना चरण्यासाठी सोडू नये. वाळलेला चारा आणि खुराक शक्यतो सकाळी व संध्याकाळच्या वेळी द्यावा. दुपारच्या वेळी हिरवा चारा द्यावा. पुनरुत्पादनासंबंधित व्यवस्थापन
वाढत्या तापमानामुळे जनावरांमध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची दिसतात. म्हशींमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. सकाळ व संध्याकाळच्या वेळी जनावरांचे निरीक्षण करावे. खच्ची केलेला वळू कळपात फिरवावा, जेणेकरून माज ओळखण्यास मदत होईल. दिवसात तीन वेळा आणि रात्रीच्या वेळी किमान एकदा तरी माजाच्या लक्षणांचे निरीक्षण करावे. कृत्रिम रेतन करताना शक्यतो सकाळी व संध्याकाळी करावे. कृत्रिम रेतनानंतर किमान १५ दिवस जनावरे थंड निवाऱ्यात ठेवावीत. उन्हाळ्यामध्ये कमी वजनाच्या पहिलारू जनावरांत रेतन करणे टाळावे. जनावरांमध्ये तीव्र उष्माघाताची लक्षणे दिसल्यास, पशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावेत. - डॉ. प्रतीक जाधव, ९८९०९९७७९५ (पीएच. डी. स्कॉलर, पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय एवं गो-संशोधन संस्था (दुवासु), मथुरा. डॉ. खोसे हे परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत.)