उष्णतेच्या ताणापासून दुधाळ जनावरांची काळजी

वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दुधाळ जनावरे, संकरित गाई आणि म्हशींमध्ये प्रामुख्याने ताण दिसून येतो. यामुळे जनावरे अस्वस्थ होतात. त्याचा आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी.
effect of heat stress in cattle's
effect of heat stress in cattle's

वातावरणातील तापमान व हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दुधाळ जनावरे, संकरित गाई आणि म्हशींमध्ये प्रामुख्याने ताण दिसून येतो. यामुळे जनावरे अस्वस्थ होतात. त्याचा आरोग्य आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी. जनावरांमध्ये उष्णतेच्या ताणाची लक्षणे म्हणजे भूक आणि तहान मंदावते. दूध उत्पादन क्षमता १५ ते २० टक्के आणि प्रजननक्षमता ४० ते ५० टक्क्यांनी कमी होते. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता होते.वातावरणातील तापमान वाढल्यामुळे किंवा तापमानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे शरीराचे तापमान स्थिर करण्यासाठी जनावरांच्या शरीरामध्ये थर्मोरेगुलेशन प्रक्रिया चालू होते. ही प्रक्रिया दोन पद्धतीने पूर्ण होते. पहिल्या प्रक्रियेमध्ये शरीरातील वाढलेले तापमान कमी करण्यासाठी जनावरांच्या कातडीखाली रक्ताचा प्रवाह वाढतो. जनावरे जोर जोरात धापा टाकतात. त्यामुळे जास्त प्रमाणात लाळ बाहेर पडते. ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता जनावरांना २० टक्के अतिरिक्त ऊर्जा लागते. त्यामुळे दूध उत्पादनासाठी लागणारी ऊर्जा याकरिता वळविली जाते. यामध्ये जनावरांचे दूध उत्पादन  कमी होते.  दुसऱ्या प्रक्रियेमध्ये शरीरामध्ये कमीत कमी उष्णता तयार होण्यासाठी जनावरांमध्ये आपोआप बदल घडून येतात. जनावरांमध्ये शुष्क पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. जनावरांमध्ये रवंथ करण्याची गती मंदावते. जनावरांना संपूर्ण मिश्रित आहार दिला तर जनावरे दिलेला आहार निवडून खाण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये जास्तीत जास्त धान्य किंवा पशू खाद्य खाण्याचा प्रयत्न करतात. कोरडा चारा गव्हाणीमध्ये तसाच ठेवतात. यामुळे जनावरांची पोषक तत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे देखील दूध उत्पादन कमी होते. जनावरे रवंथ कमी करत असल्यामुळे लाळेचे प्रमाण कमी होते. तयार झालेल्या लाळेमधील जास्तीत जास्त भाग जनावरे धापा टाकत असल्यामुळे बाहेर पडतो. कमीत कमी लाळ ही ओटीपोटामध्ये प्रवेश करते. त्यामुळे ओटीपोटातील सामू कमी होतो आणि तिथे जास्त आम्ल तयार होते. जास्त तयार झालेल्या आम्लामुळे तंतुमय पदार्थांचे पचन करणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तंतुमय पदार्थांचे पचन कमी होते. तंतुमय पदार्थांचे पचन कमी झाल्यामुळे ओटीपोटामध्ये जास्त आम्ल तयार होते. यामुळे कासदाह, लंगडेपणा दिसतो. ओटीपोटामध्ये जास्त आम्ल तयार झाल्यामुळे ओटीपोटातील एसीटेट: प्रोपीनेट गुणोत्तरामध्ये बदल होतो म्हणजेच तो कमी होतो. एसीटेट चे प्रमाण कमी होते, प्रोपीनेटचे प्रमाण वाढते आणि ब्युटीरेटचे प्रमाण देखील कमी होते परिणामी दुधामधील फॅटचे प्रमाण कमी होते. गोठ्याचे योग्य व्यवस्थापन  

  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हवा खेळती ठेवावी. शक्य असल्यास फॅन, एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा.
  • विदेशी गाईसाठी योग्य उंची असलेली शेड बांधावी. कडक उन्हाळ्यामध्ये फॉगर आणि स्प्रिंकलरचा योग्य उपयोग करून जनावरांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतो.
  • आहार व्यवस्थापन  

  • स्वच्छ ताजे पाणी द्यावे. आहार आणि चारा देण्याच्या वेळेमध्ये बदल करावा.
  • जनावरे दिवसा तापमान जास्त असल्यामुळे चारा कमी खातात. त्यामुळे चारा रात्रीच्या वेळी द्यावा.  
  • जनावरे रवंथ करणे कमी करतात. अशा वेळेस कोरडा चारा कमी करून हिरवा चारा जास्तीत जास्त द्यावा. हिरवा चारा कमी असेल तर मुरघास देऊ शकतो.  
  • जनावरांच्या ओटीपोटामध्ये आम्ल जास्त तयार झाल्यामुळे तंतुमय पदार्थांचे पचन योग्य पद्धतीने होत नाही. तंतुमय पदार्थांचे योग्य पद्धतीने पचन होण्यासाठी लाइव्ह यीस्टचा वापर करावा. यामुळे जनावरांमध्ये कोरडा पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता वाढते. उष्णता कमी तयार होते. उष्णतेच्या ताणामध्ये जनावरांना गुणवत्तायुक्त खनिज मिश्रण (५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस) प्रामुख्याने सेलेनियम आणि जीवनसत्त्व अ, ड-३ आणि ई देण्यात यावीत. 
  • कोरडा चारा कमी आणि धान्य मिश्रण किंवा पशू खाद्य जास्तीत जास्त प्रमाणात खातात. त्यामुळे रवंथ कमी करतात. यामुळे ओटीपोटामध्ये आम्लाचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओटीपोटातील सामू कमी होतो. सामू स्थिर करण्याकरिता आपल्याला बफरचा उपयोग केला पाहिजे. यासाठी खाण्याच्या सोड्याचा उपयोग करावा. याचे परिणाम आपल्याला चार ते आठ तासांमध्ये पाहायला मिळतात. खाण्याच्या सोड्याचा वापर आपण शुष्क पदार्थ ग्रहण मात्रेच्या ०.८ टक्का (५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस) देऊ शकतो, तसेच आपण घरगुती मिठाचा (१५ ते ३० ग्रॅम प्रति दिवस एक जनावर) वापर करू शकतो. यामुळे जनावरांची तहान वाढण्यास मदत होते. जनावर जास्त पाणी पितात. परिणामी, शरीराचे तापमान कमी होते.
  • - डॉ. कुलदीप शिंदे,  ९८८१४१४९६७ (सहायक प्राध्यापक, पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन, राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com