उन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन

गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो. गोठ्याचे आजूबाजूच्या परिसरात झाडे लावावीत. जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंड राहील.
Large fans should be installed in the cow shed
Large fans should be installed in the cow shed

गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो. गोठ्याचे आजूबाजूच्या परिसरात झाडे लावावीत. जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंड राहील. दुग्धव्यवसायात वातावरण व ऋतुमानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनात आवश्यक बदल करणे आवश्‍यक असते. आवश्‍यक बदल न केल्यास अडचणींना सामोरे जावे लागते. प्रभावी दुग्धव्यवसाय करताना अधिक ऊन, थंडी आणि पाऊस यापासून पशुधनाचे संरक्षण करणे गरजेचे असते. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. परिणामी जनावरे उत्पादनक्षम राहत नाहीत. जनावरांना योग्य वातावरण, योग्य प्रमाणात आहार तसेच इतर व्यवस्थापन योग्य ठेवल्यास चांगले दूध उत्पादन मिळवणे शक्य होते. उष्माघाताची लक्षणे 

  • सर्वसाधारणपणे जनावरांसाठी १० ते २६ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. (२४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान संकरित तर ३३ अंश सेल्सिअस भारतीय देशी व म्हशींसाठी ३३ अंश सेल्सिअस पर्यंत)
  • तापमान वाढल्यानंतर जनावरे शरीराचे तापमान धर्मग्रंथी किंवा धापनेच्या प्रक्रियेमार्फत नियंत्रित करत असतात.
  •  तापमानात चढउतार झाल्यानंतर जनावरांवर अतिरिक्त ताण येतो.
  • जनावरांच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावरे बाहेर टाकतात. परंतु, वातावरणातील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकरीचे होते. वातावरणातील ऊर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावरांच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो.
  • जनावरांच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो. त्यामुळे जनावरांचे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यांवर विपरीत परिणाम होतो.
  • शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. जनावरांचा आहार कमी होऊन तहान-भूक मंदावते.
  • शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात श्‍वासोच्छ्वासाचा दर वाढून जनावर धाप लागल्यासारखे करते. तोंडाद्वारे श्‍वासोच्छ्वास करते. श्‍वासोच्छ्वास उथळ व जास्त वेगाने होतो. परिणामी नाडीचा वेग वाढतो.
  • जनावराच्या शरीराची कातडी कोरडी पडते. डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते.
  • जनावराला पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते.
  • जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.
  • जनावरे सतत बसून राहतात.
  • उष्णता वाढीमुळे होणारे दुष्परिणाम देशी जनावरांमध्ये वातावरणातील बदल सहन करण्याची ताकद जास्त असते. याउलट संकरित आणि विदेशी जनावरांमध्ये ती ताकद कमी असते. अशा जनावरांना वातावरणातील तापमान वाढल्यानंतर शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर आणि आरोग्यावर परिणाम होतो .

  • जनावरांची ऊर्जेची गरज वाढते : जनावरांच्या शरीरातील ऊर्जा प्रामुख्याने दूध उत्पादन, वासराची वाढ, चालणे, श्‍वास घेणे, खाणे यासाठी वापरली जाते. वातावरणातील बदलामुळे जनावरावर अतिरिक्त ताण येतो. त्यावर मात करण्यासाठी जनावराला अतिरिक्त ऊर्जेची गरज लागते.
  • दूध उत्पादन घट येणे : तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानंतर दूध उत्पादनात ३० टक्के पर्यंत घट येऊ शकते. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानंतर दूध उत्पादनात ५० टक्के पर्यंत घट येऊ शकते. योग्य काळजी न घेतल्यास दूध उत्पादनातील घट वाढत जाते.
  • उष्णतेच्या वाढीचा परिणाम हा वासरांच्या व कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो.
  • दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो. जसे दुधातील स्निग्धांश व प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
  • जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते.
  • जनावरांच्या प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. उष्णतेची ताण असणारी गाय माजावर येत नाही. तसेच गाभण राहण्यास अडचणी येतात.
  • गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास त्यांचा गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.
  • ताण सहन करण्यासाठी व उष्णतेचे निस्सारण करण्यासाठी जनावर धापा टाकते.
  • जनावरांच्या पोटातील हालचाली मंदावतात. परिणामी संपूर्ण पचनक्रिया बाधित होते.
  • शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे जनावराला आम्ल पिताच त्रास होऊन पातळ जुलाब होऊ शकतात.
  • जनावराच्या कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो.
  • दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्स वर परिणाम होतो.
  •  या कालावधीत जनावरांच्या खुरांचे आजार तसेच लंगडेपणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आस्ते.
  • उपाययोजना 

  • जनावरांना उन्हात उभे न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे
  • जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी जनावरे थेट सूर्यप्रकाशात येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • गोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्‍यक आहे. एकाच जागेवर जास्त गर्दी झाल्यास, उष्णतेचे निस्सारण होण्यास जास्त वेळ लागतो.
  • गोठ्याचे आजूबाजूच्या परिसरात झाडे लावावीत. जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंड राहील.
  • गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी गोठ्यामध्ये जागा असावी.
  • गोठा बांधताना त्याच्या छताची उंची जास्त ठेवावी.
  • गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा. त्यामुळे उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांतील उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो.
  •  गोठ्याच्या छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकावे.
  • हवा खेळती राहण्यासाठी गोठ्यात पंखे लावावेत.
  • गोठ्याच्या छतावर पाण्याचे स्प्रिंकलर्स लावावेत. जनावरांच्या शरीरावर स्प्रिंकलर, फोगर्स द्वारे पाणी मारावे. त्यामुळे जनावरांचे शरीर थंड राहण्यास मदत होते.
  • गोठ्याचा भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा. जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल. आणि आतील थंड हवा आतच राहील.
  • जनावरांना स्वच्छ, थंड पाणी मुबलक प्रमाणात गोठ्यामध्येच उपलब्ध करून द्यावे. मुक्त संचार गोठ्यातील पाणी थंड राहावे त्यासाठी पाण्याच्या टाक्या सिंमेटच्या असाव्यात.
  •  जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा सकाळी किंवा सायंकाळी द्यावे. कारण चारा चावण्यासाठी जनावरांच्या शरिरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
  • या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाण द्यावे.
  • - डॉ. शांताराम गायकवाड, ०२१६६-२२१३०२ (सह.महाव्यवस्थापक दुग्धविकास) गोविंद मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि.फलटण)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com