वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत परिणाम होतो. दूध देण्याचे प्रमाण, बैलांची कार्यक्षमता, प्रजनन क्षमता घटते. कोंबड्यांचे वजन वाढत नाही. अंडी उत्पादन घटते.
जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर पाचट किंवा तुराट्याचे आच्छादन करावे. लोखंडी पत्र्याचे छत पांढऱ्या रंगाने रंगवावे. छतावर फॉगर्स लावावेत. जनावरांना सावलीची व्यवस्था करावी. संध्याकाळनंतर मोकळ्या जागी बांधावे. ऊर्जेचा ताण कमी करण्यासाठी प्रति जनावरास १०० ग्रॅम गूळ आणि ५० ग्रॅम मीठ प्रतीदिन स्वच्छ व ताज्या पाण्यातून द्यावे. जनावरांना योग्य प्रमाणात आहार द्यावा. उष्माघात टाळण्यासाठी जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे. शरीर तापमान संतुलीत राहण्यासाठी शरीरावर गोणपाटाची झूल करावी. त्यावर वेळोवेळी पाणी शिंपडावे. जनावरांना २४ तास स्वच्छ व ताजे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दयावे. आहारात हिरव्या चारा, तंतुमय चारा उपलब्ध करून द्यावा. गोठ्याची मुख्य बाजू उत्तर दक्षिण दिशेला असावी; जेणेकरून गोठ्यात सरळ येणारे सूर्यकिरण रोखता येतात. सहा महिन्याखालील लहान वासरांची विशेष काळजी घ्यावी. वेळोवेळी त्यांच्या शारीरिक तापमानाची नोंद घ्यावी. पेयजलातून क्षारमिश्रित पावडर, गुळाचे पाणी, जीवनसत्वे द्यावीत. पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात जनावरांना हगवणीचा त्रास होऊ शकतो. लक्षणे दिसताच तात्काळ उपचार करावेत. शेडची दारे पाण्याने भिजलेल्या गोणपाटाने बंद करावीत. शेडमध्ये पंखे किंवा कुलरची व्यवस्था करावी. थंड पाण्याची व्यवस्था करावी. सकाळ, सायंकाळ खाद्य द्यावे. कोंबड्यांची संख्या मर्यादित ठेवावी. छत सिमेंट किंवा पत्र्याचे असल्यास त्यावर पाचट, कडबा यांचे आच्छादन करावे. शेडमध्ये उन्हाच्या गरम झळा येऊ नयेत म्हणून उन्हाच्या दिशेने गोणपाट लावून त्यावर पाणी शिंपडावे. उष्माघाताची तीव्रता सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अधिक असते. या कालावधीत भूक मंदावते. यामुळे कोंबड्यांना सकाळी दहाच्या आत आणि सायंकाळी पाच वाजल्यानंतर खाद्य अधिक प्रमाणात द्यावे. कोंबड्यांना पिण्याच्या पाण्यामधून शिफारशीत प्रमाणात क्षारमिश्रित पावडर, गुळाचे पाणी, जीवनसत्त्वे द्यावीत. संपर्क : अनंत शिंदे, ७५८८५७१६०२ (ग्रामीण कृषी हवामान सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)