विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते. केळी पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बदलते वातावरण व ढगाळ हवामान यामुळे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. अलीकडच्या काळात केळीवर कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सी.एम.व्ही.) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. स्थानिक भाषेत यास ‘हरण्या रोग’ असे म्हटले जाते. विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण करणे शक्य नसले तरी रोगाचा प्रादुर्भाव टाळणे आणि प्रसार रोखणे शक्य आहे. त्यासाठी खालील लेखामध्ये माहिती घेऊ. अनुकूल घटक
सततचे ढगाळ वातावरण, सतत पाऊस, कमी तापमान, जास्त आर्द्रता हे घटक रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरतात. यासोबतच रोगयुक्त लागवड साहित्य, तण नियंत्रणाचा अभाव, अन्नद्रव्यांची कमतरता हे घटक रोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आहेत. रोगाचा प्राथमिक प्रसार कंदापासून आणि दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. या विषाणूची साधारणपणे ८०० ते १००० यजमान पिके आहेत. यात काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगी, मिरची तसेच एकदल व द्विदल पिकांचा समावेश होतो. पीक फेरपालट पद्धतीचा अभाव हेदेखील एक कारण आहे. सुरवातीला कोवळ्या पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसतात. हे पट्टे तुटक किंवा संपूर्ण पानावर आढळतात. एका पानावर १ ते २ अर्धवट आकाराचे किंवा पूर्ण पानभर पसरलेले पट्टे दिसतात. कालांतराने पानांचा पृष्ठभाग आकसला जाऊन कडा वाकड्या होतात. पाने आकाराने लहान होतात. पानाच्या देठाची लांबी कमी होऊन पाने जवळ येतात. शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होते. हाताने दाबल्यास कडकड आवाज येतो. पानाच्या शिरा काळपट पडून तेथील उती मरतात. पाने फाटतात. नवीन येणारी पाने आकाराने लहान होतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास, पान पिवळे पडून पोंगा सडतो. झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडांची निसवण उशिरा तसेच अनियमित होऊन फण्या अत्यंत लहान होतात. फळे विकृत आकाराची होऊन त्यावर पिवळ्या किंवा काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. अशी फळे विक्रीसाठी योग्य नसतात. उपाययोजना विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करता येत नाहीत. मात्र, गाव पातळीवर नियंत्रणासाठी एकत्रितरीत्या मोहीम राबविल्यास रोगप्रसार रोखणे शक्य होते. प्रसार रोखण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत.
रोगमुक्त ऊतीसंवर्धीत रोपे वापर किंवा रोगमुक्त बागेतून चांगली मातृवृक्ष निवडून त्यांचे कंद लागवडीसाठी वापरावेत. लागवडीपूर्वी रोपांवर शिफारशीत कीडनाशकांची फवारणी आणि कंदांवर प्रक्रिया करावी. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळांसहित उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावीत. बागेचे सातत्याने निरीक्षण करावे. बागेतील तसेच बांधावरील सर्व प्रकारची तणे काढून स्वच्छता ठेवावी. बागेत काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची, वांगी, मका या पिकांची लागवड करू नये. बागेभोवती रान कारली, शेंदणी, करटुले, गुळवेल यासारख्या रानटी झाडाचे वेल नष्ट करावेत. मावा नियंत्रण (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
डायमेथोएट (३० ई.सी) २ मिलि किंवा थायामेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि फ्लोनिकॅमीड ७ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. (केळी संशोधन केंद्राकडून शिफारस करण्यात येते.) - डॉ.सी.डी.बडगुजर, ८८८८८५०८५८ - ०२५७/२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)