दीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची अंजन या चारा वृक्षाची क्षमता आहे. पडीक, बरड, मुरमाड, खडकाळ आणि उथळ प्रकारच्या जमिनीमध्ये अंजन वाढू शकतो. झाडाच्या पानांमध्ये १० ते १२ टक्के प्रथिने असतात. निवडुंगाचे फळ खाण्यास वापरले जाते. पाने जनावरांसाठी चारा म्हणून आणि विविध उद्योगांसाठी कच्चे साहित्य म्हणून वापरतात. अंजन वैशिष्ट्ये
अंजन ही धीम्या गतीने वाढणारी कोरड्या पर्णपाती जंगलातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहे. दीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची याची क्षमता आहे. हा वृक्ष ३०० ते ६०० मिलिमीटर पावसाच्या प्रदेशात (मराठवाडा, विदर्भ, खानदेश) उत्तम प्रकारे वाढतो. पडीक, बरड, मुरमाड, खडकाळ आणि उथळ प्रकारच्या जमिनीमध्ये वाढू शकतो. झाडाच्या पानांमध्ये १० ते १२ टक्के प्रथिने असतात. या प्रजातीमध्ये उत्तम बिजासाठी सामान्यपणे २० ते २५ वर्षांचा, सरळ व उंच वाढलेल्या वृक्ष निवडावा. एप्रिल ते मे महिन्यामध्ये हलक्या तपकिरी रंगाच्या झाडाच्या फांद्या तोडून शेंगा तोडून घ्याव्या. एका किलोमध्ये सुमारे ३५०० पर्यंत बिया मिळतात. अंजनाच्या शेंगा दोन्ही बाजूने तोडून थंड पाण्यामध्ये २४ तासांसाठी भिजवून गादी वाफ्यावर किंवा पिशवीमध्ये (४ x ६ इंच) लावल्यानंतर सुमार ७ ते १५ दिवसांमध्ये उगवतात. दररोज रोपांना झारीने थोडे पाणी द्यावे. तसेच एका महिन्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी. एका वर्षाची रोपे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये शेताच्या बांधावर (१० ते १५ फुटांवरती) किंवा शेतामध्ये १५ x १५ फूट व १८ x १५ फूट अंतरावर लावावीत. लागवडीसाठी ४५ x ४५ x ४५ सेंमी आकाराचा खड्डा करावा. वनीयकुरण पद्धतीमध्ये वेगवेगळ्या गवताच्या प्रजातींची (पवना, गिनी स्टायलो, दीनानाथ) जुलै महिन्यामध्ये लागवड करावी. खत व पाणी व्यवस्थापन अंजनाची रोपे लागवडीपूर्वी उन्हाळ्यामध्ये पुरेसे शेणखत प्रती शेतामध्ये पसरावे. अंजनाची रोपे आणि गवत लावल्यानंतर शक्य झाल्यास उन्हाळ्यामध्ये एकदा तरी पाणी द्यावे. छाटणी
आंतरपीक म्हणून लावलेल्या झाडाची पहिली छाटणी लागवडी नंतर ५ ते ६ महिन्यांनी करावी. अंजनाची झाडे ३ ते ४ वर्षांची झाल्यास पहिली छाटणी करू शकतो. अंजन वृक्षास सावळणे किंवा जमिनीपासून २ मिटर उंचीवरती शेंडा कापून टाकावा. यालाच पोलार्डिंग असे म्हणतात. पोलार्डिंगमुळे लुसलुशीत आणि पौष्टिक चारा वर्षातून दोनदा मिळू शकतो. हे झाड वर्षामध्ये फक्त १५ ते २० दिवस पर्णपाती राहते. साधारणतः ३० ते ३५ टक्के झाडाचे छत पाल्यासाठी छाटावे. उत्पादन अंजन आणि अंजन आधारित वनीयकुरण पद्धतीमध्ये जुलै ते नोव्हेंबर मध्ये ३ ते ५ टन हिरवे गवत मिळते. डिसेंबर ते मार्च या महिन्यांमध्ये सहसा चाऱ्या तुटवडा असतो, त्यावेळी १ ते २ टन झाडाचा पाला व सुमारे २ टन जळाऊ लाकूड प्राप्त होते. एका मध्यम वयाच्या झाडापासून २० ते ४० किलो पर्यंत हिरवा पाला मिळू शकतो. निवडुंग वैशिष्ट्ये
सामान्यतः या पिकाला ‘निवडुंग’ किंवा ‘प्रिकली पियर’ म्हणून ओळखले जाते. हे पीक शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेश, तसेच नापीक जमीन, कोरड्या वातावरणात अतिशय उत्कृष्ट उगवते. या निवडुंगाचे फळ देखील खाण्यास वापरले जाते. पाने जनावरांसाठी चारा म्हणून आणि विविध उद्योगांसाठी कच्चे साहित्य म्हणून देखील उपयोग केला जाऊ शकतो. या पिकामध्ये जवळपास ९०-९५ टक्के पाण्याचे प्रमाण असून, कोरड्या वजनाच्या ५-१२ टक्के कच्च्या प्रथिनांचे तसेच सुमारे १० टक्के धाग्याचे प्रमाण असते. भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असल्यामुळे जनावरांची ४०-१०० टक्के पाण्याची गरज याद्वारे भागवली जाऊ शकते. मोठी जनावरे ५० ते ७० किलो पाने प्रती दिवस तर शेळी आणि मेंढरांना ५ ते ७ किलो पाने प्रती दिवस खाऊ शकतात. जाती काटे नसलेले निवडुंग चाऱ्यासाठी योग्य असून, ओपूंसिया या कुटुंबामध्ये १८० प्रजाती आहेत. यातील तीन प्रजातींना (ओ. अल्बिकार्पा, ओ. फिकस इंडिका आणि ओ. रोबस्टा) मोठ्या प्रमाणात लागवडीस वापरतात. लागवडीची वेळ आणि प्रक्रिया
लागवड पावसाळी हंगाम तसेच ऑक्टोबर-मार्च या कालावधीत केव्हाही करू शकतो. सुरवातीला पावसाळी हंगामात शेतात दीर्घकाळ पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. या पिकाची कटिंग किंवा ग्राफ्टिंगद्वारे लागवड करता येते. मातृ वृक्षापासून निरोगी, परिपक्व कटिंगची निवड करून लागवडी पूर्वी ५-१० दिवस सावलीमध्ये रोपे तयार करावीत. त्यानंतर शेतात लागवड करावी. चांगल्या चारा उत्पादनासाठी याची दाट लागवड ३ मीटर × ३ मी किंवा २ मीटर × २ मीटर अंतरावर करावी. शेताच्या बांधवरती सजीव कुंपण म्हणून देखील याची लागवड करता येते. खत व्यवस्थापन या पिकासाठी लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी १५ टन शेणखत जमिनीत मिसळावे. याचबरोबरीने ६० किलो नत्र,३० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश द्यावे. यामुळे झाडांची व्यवस्थित वाढ होते. पाणी व्यवस्थापन या पिकाला पाण्याची आवश्यकता कमी लागते. पावसाच्या पाण्यावरती हे पीक जिवंत राहून उत्पादन देते. परंतु महिन्यातून एकदा आवश्यकता पडल्यास पाणी दिल्याने उत्पादन वाढण्यास मदत मिळते. छाटणी लागवडीनंतर एक वर्षाने पानांची तोडणी करावी. शेळी, मेंढी आणि मोठ्या जनावरांना नव्याने कापणी केलेले पाने ३० टक्के हिरव्या चाऱ्याच्या बदली चारा म्हणून देऊ शकतो. निवडुंगाचे छोटे छोटे तुकडे हे दुसऱ्या कोरड्या चाऱ्यामध्ये १:३ या प्रमाणात मिसळून जनावरांना खाण्यास द्यावेत. उत्पादन सुरुवातीला सुमारे १५ ते २० किलो प्रति झाड उत्पादन मिळते. नंतर यामध्ये वाढ होत जाते. सुबाभूळ
हा एक जलद गतीने वाढणारा चारा वृक्ष आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात बिया तयार होतात. दुष्काळग्रस्त भागामध्ये या झाडाला पहिले दोन वर्ष वाढून द्यावे आणि नंतर मग छाटणी करावी. जनावरांना नवीन पाला देण्याचे टाळावे, कारण पानांमध्ये मायमोसिन हा विषारी घटक असतो. हा घटक जनावरांसाठी घातक ठरू शकतो. जाती : के ३४१, के ८, सुबाभूळ सीओ-१, एफडी- १४२३, निर्बिजा लागवड : लागवड पावसाळी हंगामात केली जाते. जून-जुलैमध्ये लागवड केल्याने उगवण व्यवस्थित होऊन झाडांची वाढ व्यवस्थित होते. जिथे पाण्याची उपलब्धता असेल तिथे वर्षभर लागवड करता येते. लागवड १ मीटर बाय १ मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीपूर्वी बियाणे गरम पाण्यात एक रात्रभर भिजवावे. लागवडीच्यावेळी रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. यामुळे बियाणाची उगवणक्षमता वाढते. लागवड करताना माती परिक्षणाच्या शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खताची मात्रा द्यावी. सुबाभूळ जमिनीमध्ये नत्राचे स्थिरीकरण करते. पाणी ः लागवड केल्यानंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. सहसा या पिकाला पाण्याची आवश्यकता कमी लागते. परंतु १५ ते २० दिवसातून आवश्यकतेनुसार पाणी दिल्याने उत्पादनात वाढ होते. छाटणीची वेळ : पहिली छाटणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्याने जमिनीपासून ९० ते १०० सेंमी उंचीवर करू शकतो. त्यानंतरची छाटणी ५० ते ६० दिवसाच्या अंतराने करू शकतो. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये सुमारे ९० ते १०० दिवसांच्या अंतराने वर्षातून तीन छाटण्या करू शकतो. उत्पादन : सुरवातीच्या काही वर्षामध्ये प्रति हेक्टरी १२ ते १५ टन प्रती वर्षी चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते. - संग्राम चव्हाण, ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)