सध्या वातावरण सतत बदलत आहे. आगामी काळात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी घेण्यात आली. करप्याचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आत्ताच प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. शेतकरी : प्रेमानंद हरी महाजन गाव : तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव एकूण क्षेत्र : ११० एकर केळीखालील क्षेत्र : ५५ एकर (७५ हजार केळी झाडे) मी यंदा ५५ एकरांत मे ते जुलैदरम्यान टप्प्याटप्प्याने केळी लागवड आहे. बेवडसाठी कापूस व इतर पिके घेतो. माझा पीक फेरपालटीवर विशेष भर असतो. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी सर्व बाबींचे नियोजन केले जाते. मागील २० दिवसांतील कामकाज
टप्प्याटप्प्याने लागवड केल्याने सध्या पीक वाढीच्या विविध अवस्थेत आहे. काही क्षेत्रांतील पीक ४, तर काही क्षेत्रातील ५ महिन्यांचे झाले आहे. काही क्षेत्रात पिलबाग केळीदेखील आहे. एकूण ५५ एकरात सुमारे ७५ हजार केळी झाडे आहेत. पिकाची वाढीची अवस्था असल्याने विद्राव्य खतांची मात्रा दर ८ दिवसांनी दिली जात आहे. त्यात रासायनिक खतासोबत जैविक व सेंद्रिय खतेदेखील दिली जातात. जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या बागेत चार किलो ०ः०ः५० (पोटॅशिअम सल्फेट), १५ किलो पोटॅश व १० किलो युरिया प्रति एक हजार झाडांसाठी दिले. मागील २० दिवसांत ड्रीपद्वारे जैविक खते, बुरशीनाशके आणि जैविक कीडनाशके देण्यात आली. मूळकूज रोखण्यासह कंद पोखरणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही कार्यवाही करण्यात आली. साधारणपणे ऑक्टोबरमध्ये कंद पोखरणाऱ्या किडी अंडी घालतात. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीमध्ये झाडे कोसळणे किंवा कंदाच्या वरील भागापासून मोडण्याचे प्रकार होतात. जुलै व ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या बागेत कुकुंबर मोझॅक विषाणूच्या प्रादुर्भावासाठी मागील आठवड्यात कीडनाशकांची फवारणी घेतली. सध्या वातावरण सतत बदलत आहे. आगामी काळात करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी घेण्यात आली. करप्याचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे आत्ताच प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. निसवण झालेल्या बागेत विद्राव्य खते दर ७ दिवसांनी ड्रीपमधून देत आहे. एक हजार झाडांसाठी पाच किलो ०ः५२ः३५ (मोनोपोटॅशिअम फॉस्फेट), १० किलो पोटॅश व १० किलो युरिया देण्यात आला. पावसामुळे तणनियंत्रणाची कार्यवाही अधिक करावी लागते. आवश्यकतेनुसार तणनियंत्रण करण्यात आले. बागेमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. बागेतील अनावश्यक फुटवे, पिवळी पाने काढून घेतली. वेळोवेळी रोगग्रस्त पाने आहेत का याचे निरीक्षण केले. रोगग्रस्त पाने बागेबाहेर काढून शास्त्रीय पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली. पुढील १५ दिवसांतील नियोजन
सध्या पीकवाढीच्या अवस्थेत असून एप्रिलच्या बागा निसवत आहेत. यापुढील काळात आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (विशेषतः बोरॉन, झिंक) पुरवठा केला जाईल ड्रीपमधून दर ८ दिवसांनी जैविक बुरशीनाशके, कीडनाशके व मूळ वाढीसंबंधीचे घटक दिले जातील. त्यानंतर रासायनिक खते आणि अन्नद्रव्ये ड्रीपमधून दिली जातील. त्यात १२ः६१ः०० (मोनो अमोनिअम फॉस्फेट) ४ किलो, युरिया १५ किलो, मॅग्नेशिअम सल्फेट ८ किलो, पोटॅश १५ किलो प्रति एक हजार झाड या प्रमाणात दिले जाईल. आवश्यकतेनुसार मजुरांकडून तणनियंत्रण करून घेतले जाईल. पाऊस सुरू राहिल्यास सिंचन केले जाणार नाही. फक्त ड्रीपमधून खते, बुरशीनाशके व कीडनाशके सोडण्यासाठीच सिंचन सुरू राहील. सध्याच्या काळात खते आणि अन्नद्रव्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. निश्चित वेळापत्रकानुसार रासायनिक खते ड्रीपमधून दिली जातील. करपा रोग प्रतिबंधासंबंधी बुरशीनाशकांची फवारणी दर ७ दिवसांनी केली जाईल. सध्या बाग स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बागेत अस्वच्छता राहिल्यास रोगराई किंवा करप्यासारखे रोग येतात.त्यामुळे बागेतील पिवळी पाने, अनावश्यक फुटवे काढले जातील. - प्रेमानंद महाजन- ९७६३८९३७७७ (दुपारी दोन ते तीन या वेळेस संपर्क साधावा)