शेतकरी : शुभम फकीरराव खैरे गाव : पालखेड मिरची, ता. निफाड, जि. नाशिक एकूण क्षेत्र : साडेपाच एकर ढोबळी मिरची : दीड एकर मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कुटुंबीयांच्या शेतीमध्ये संपूर्ण लक्ष घालत आहे. पाच एकरपैकी द्राक्ष व टोमॅटोची प्रत्येकी दोन एकरांवर लागवड केली आहे. या पिकाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी वडील फकीरराव आणि भाऊ गजेंद्र पाहतात. आमच्याकडे बऱ्याच वर्षांनंतर या वर्षी दीड एकर क्षेत्रामध्ये ढोबळी मिरची लागवड केली आहे. या ढोबळी मिरचीच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी मी पाहतो. योग्य नियोजन व्यवस्थापनातून अधिक उत्पादन घेण्याचा माझा प्रयत्न आहे. या वर्षीचे नियोजन
जुलै अखेरीस जमीन भुसभुशीत करून शेतामध्ये शेणखत मिसळून घेतले. लागवडीसाठी निरोगी रोपांची उपलब्धता होण्यासाठी रोपवाटिकेत आगाऊ नोंदणी केली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला लागवडीसाठी ४.५ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यानंतर खुल्या पद्धतीने दोन रोपांत सव्वा फूट अंतर ठेवून रोपांची लागवड केली. लागवडीसाठी २२ हजार रोपांची आवश्यकता भासली. तण व्यवस्थापनासाठी ३० मायक्रोनच्या मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आहे. जमिनीतील वाफसा पाहून दररोज १० ते १५ मिनिटे ठिबक सिंचन चालू केले जाते. लागवडीनंतर ३० दिवसांनी आधार मिळण्यासाठी झाडे तारेच्या साह्याने बांधून घेतली. लागवडीपूर्वी मॅग्नेशिअम सल्फेट, झिंक, बोरॉन, फेरस व सल्फर यांची एकत्रित २५ किलो मात्रा देण्यात आली. लागवडीनंतर तिसऱ्या दिवसापासून २ दिवसांच्या अंतराने रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची ७ वेळा आळवणी केली आहे. ठिबकद्वारे २ ते ३ दिवसांच्या अंतराने झाडाची वाढ, फुलधारणा, फळाची पक्वता होण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांची मात्रा देण्यात आली. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पावसामुळे गोगलगायींचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या. फळ सेटिंग होण्यास सुरुवात झाल्यानंतर फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. यासाठी ८ कामगंध सापळे लावण्यात आले. पावसामुळे रोप मरणे, करपा आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी बुरशीनाशकांची फवारणी केली जाते. मर रोगाची लक्षणे दिसताच, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस या जैविक घटकांचा ठिबकमधून वापर केला. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकासोबत वनस्पतिजन्य घटकांचा (उदा. निम तेल इ.) वापर करण्यात आला. लागवडीनंतर साधारण ४५ ते ५० दिवसांनी पहिला तोडा झाला. पहिल्या तोड्यामध्ये ३५० कॅरेट ढोबळी मिरची उत्पादन मिळाले. नाशिक मार्केटमध्ये प्रति कॅरेट ५५० रुपये इतका दर मिळाला. आतापर्यंत १६०० कॅरेट ढोबळी मिरची उत्पादन मिळाले आहे. अजून २५०० कॅरेट निघण्याचा अंदाज आहे. प्रतवारी करताना चमक, रंग व एकसारखा माल हे निकष असतात.