शेतकरी : योगेश तोडकरी गाव : नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे एकूण क्षेत्र : साडेतीन एकर वांगी क्षेत्र : २५ गुंठे माझी एकूण साडेतीन एकर शेती असून त्यापैकी २५ गुंठे क्षेत्रावर भरताच्या वांग्याचे उत्पादन घेतो. उर्वरित क्षेत्रावर फ्लॉवर, कांदा, ऊस आणि विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतो. मी एप्रिल व सप्टेंबर असे प्रत्येकी ६ महिन्यांचे दोन हंगामात उत्पादन घेतो. प्रत्येक हंगामात साधारण २५ ते ३० गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड केली जाते. दरवर्षीचे नियोजन
साधारण मार्च महिन्यात लागवडीसाठी गादीवाफे तयार केले जातात. लागवड दोन गादीवाफ्यातील पाच फूट आणि दोन रोपांमध्ये अडीच फूट अंतर ठेवून लागवड केली जाते. गादीवाफ्यावर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा वापर होतो. लागवडीपूर्वी गादीवाफ्यावर सूक्ष्म अन्नद्रव्ये, निंबोळी पेंड यांचा वापर करण्यात येतो. लागवडीसाठी नर्सरीतील ३५ दिवसांच्या रोपांची निवड केली जाते. दरवर्षी माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करतो. शेणखताचा दरवर्षी पाच टन प्रति ३० गुंठे याप्रमाणात वापर होतो. खतांचे साधारण पाच टप्प्यांमध्ये नियोजन केले जाते. खतांची मात्रा प्रत्येकी पाच दिवसांनी चक्राकार पद्धतीने दिली जाते. लागवडीनंतर ७ ते १० दिवसांनी १९-१९-१९ या खताचा डोस देण्यात आला. प्रति ३० गुंठ्यांना तीन किलो ड्रीपद्वारे व सोबत मॅग्नेशिअम सल्फेट २ किलो दिले जाते. फुल्व्हिक ॲसिडचाही वापर होतो. साधारण दीड महिन्यानंतर फुलधारणेसाठी मॅग्नेशिअम ३ किलो, झिंक ५०० ग्रॅम आणि १३ः४५ हे खत ३ किलो याप्रमाणे दिले जाते. फळधारणेसाठी १३ः०ः४५ ३ किलो, कॅल्शिअम ३ किलो आणि बोरॉन १ किलोचे याप्रमाणे ठिबकद्वारे दिले जाते. सध्या झाडांची छाटणी (रिकट) करून दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. लागवडीनंतर साधारण ३५ दिवसांनंतर फळ काढणीस तयार होतील. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रंगीत चिकट सापळ्यांचा वापर होतो. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचा वापर केला जातो. त्यासाठी सौर पॅनेल व बल्बची व्यवस्था केली आहे. फळ काढणीदरम्यान आवश्यकतेनुसार कीडरोगांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या फवारण्या घेतल्या जातात. एप्रिल हंगामातील वांग्याचे उत्पादन १० ते१५ टनांपर्यंत तर सप्टेंबर हंगामात हेच उत्पादन पाच टनांपेक्षा अधिक मिळते. एप्रिल हंगामातील वांग्यांना सरासरी ३० रुपयांपर्यंत तर तर पुढील हंगामात तो १५ ते २० रुपये इतका मिळतो. एप्रिल हंगामातील वांग्यांना अधिक दर मिळतो. मजुरांच्या मदतीने वांग्याची काढणी केली जाते. मालाची प्रतवारी करून बाजारपेठेमध्ये पाठविला जातो. - योगेश तोडकरी, ८८८८९२८१८१