शेतकरी ः उत्तम दाजी वालावलकर गाव ः वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग एकूण क्षेत्र ः ५ एकर काजू क्षेत्र ः २.५ एकर (५०० झाडे) माझी वेतोरे (ता.वेंगुर्ला) येथे पाच एकर जमीन आहे. डोंगरभागात अडीच एकरांमध्ये काजूच्या ५०० झाडांची लागवड केली आहे. त्यामध्ये वेंगुर्ला -४, वेंगुर्ला-७ आणि काही गावठी झाडे आहेत. लागवड पूर्णपणे डोंगरभागात असल्यामुळे पावसाच्या पाण्यावर काजूचे उत्पादन घेतले जाते. व्यवस्थापनातील बाबी
ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर झाडांना खत देण्याचे नियोजन असते. झाडांना एकाच वेळी खते न देता १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ वेळा खत दिले जाते. यामुळे झाडांच्या वाढीवर चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले. लागवड डोंगरात असून तेथे सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये. पावसाच्या पाण्यावर झाडे जगविली जातात. वर्षभरात बागेमध्ये किमान ३ फवारण्या घेण्याचे नियोजन असते. त्यादृष्टीने फवारणीसाठी पावसाचे पाणी सिंटेक्स टाक्यांमध्ये साठविले जाते. या साठवलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करून नंतर ते सिंचनासाठी वापरले जाते. साधारण ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. या कालावधीत ढेकण्याचा प्रादुर्भाव जाणवतो. नियंत्रणासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे फवारणी केली जाते. फवारणीपूर्वी बागेतील झाडांचे निरीक्षण केले जाते. आणि त्यानंतर प्रादुर्भाव आणि झाडाची अवस्था पाहून फवारणीचे नियोजन केले जाते. मी बागेमध्ये दिवसातून किमान १ वेळ फेरी मारून झाडांचे निरीक्षण करतो. पाने, मोहर, फळांचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार फवारणी घेतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत पूर्ण बागेतील तण काढले जाते. सध्या झाडांना चांगला मोहर आला आहे. काही झाडांवरील फळे आकार घेऊ लागली आहेत. मागील २ ते ३ दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन पुढील दोन दिवसांत कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी घेणार आहे. यावर्षी पाऊस लांबल्यामुळे काजू हंगाम लांबण्याची शक्यता आहे. साधारण फेब्रुवारी महिन्यात काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात होईल. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यत चालेल असा अंदाज आहे. सुरुवातीला वेंगुर्ला-४ झाडांचे काजू परिपक्व होतील. पूर्ण परिपक्व फळे जमिनीवर पडल्यानंतर काजू बी गोळा केली जाईल. गोळा केलेल्या काजू बीची त्वरित विक्री केली जाईल. मी त्यांची साठवणूक करत नाही. काजू हंगाम संपल्यानंतर बागेतील पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात रचला जाईल. त्यामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा मुळांवर परिणाम कमी होतो. आणि पावसाळ्यात पालापाचोळा कुजून त्याचा झाडाला फायदा होतो. हंगाम संपल्यानंतर झाडाच्या वाढलेल्या अतिरिक्त फांद्याची छाटणी केली जाईल. त्यामुळे झाडांना मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्यास मदत होते. - उत्तम वालावलकर, ९४२२७४१६६७