शेतकरी : ऋषिकेश दिलीप सोनटक्के. गाव : टाकरखेडा मोरे, ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती एकूण क्षेत्र : १६ एकर संत्रा क्षेत्र : १२ एकर (१३०० झाडे) मी शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीमध्येच योग्य व्यवस्थापनातून प्रगती केली आहे. माझी वडिलोपार्जित १२ एकरांवर संत्रा लागवड आहे. त्यात १३०० झाडे असून, ४३ वर्षांची २०० झाडे, २० वर्षांची २०० झाडे, १८ वर्षांची ४०० झाडे आणि इंडो-इस्राईल पद्धतीने लागवडीची अडीच वर्षांची ४१५ झाडे आहेत. सुमारे ४३ वर्षे वयाच्या २०० झाडांवर मृग बहर आणि उर्वरित सर्व झाडांवर आंबिया बहर धरला जातो. संत्रा फळांच्या दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने संत्रा बागेचे व्यवस्थापन करत आहे. यामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन घेऊन चांगला दर मिळविण्यात मला यश मिळाले आहे. मागील १० दिवसांतील कामकाज
सध्या बागेतील फळे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. या काळात फळांवर रस शोषणारे पतंग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सुमारे ५० ते ६० टक्के फळांचे नुकसान संभवते. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांत रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून येतो. त्यामुळे नियंत्रणासाठी बागेतून तसेच बांधावरून गुळवेल काढून टाकले. बागेत पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून जमिनीमध्ये पुरून टाकली. सायंकाळी बागेमध्ये धूर करून कीड नियंत्रणासाठी प्रयत्न केला. पतंगासाठी बागेमध्ये कामगंध सापळे लावले. त्यात अडकलेले पतंग गोळा करून नष्ट केले. आंबिया बहरातील वाढीच्या अवस्थेतील झाडांना ५० ग्रॅम फेरस सल्फेट, ६० ग्रॅम झिंक सल्फेट, ५ किलो गांडूळ खत यांसह अन्य शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा देण्यात आली. फळांवरील फायटोप्थोराची तपकिरी कूज नियंत्रणासाठी झाडांवर शिफारशीनुसार फवारणी करण्यात आली. या वर्षी पावसाची संततधार कायम राहण्यामुळे मूळकूजचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी ४० दिवसांच्या अंतराने दोन वेळा शिफारशीत बुरशीनाशकांची आळवणी केली. फळे परिपक्व होण्याच्या अवस्थेत रस शोषणाऱ्या पतंगाच्या व्यवस्थापनासाठी कडुनिंब तेलाची फवारणी घेतली. फळमाशीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी २० ते २५ कामगंध सापळे बागेमध्ये लावले. दर १५ दिवसांनी सापळ्यातील ल्यूर बदलण्यात आले. ऑक्टोबर महिन्यामध्ये निघणाऱ्या हस्त बहराच्या नवतीच्या कीड व्यवस्थापनासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी घेतली. आंबिया बहरातील फळगळ नियंत्रणासाठी, जिब्रेलिक आम्ल, कार्बेन्डाझिम आणि युरिया यांची पाण्यात मिसळून फवारणी घेतली. पुढील २० दिवसांतील नियोजन
बाग तणविरहित ठेवण्यावर माझा विशेष भर असतो. त्यासाठी बागेतील तण ग्रासकटरच्या साह्याने काढणार आहे. बागेत पडलेली फळे कीड-रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरतात. त्यामुळे बागेत पडलेली फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली जाईल. वेलवर्गीय पिकांवर पतंगाच्या अंडी, अळी आणि कोष अवस्था पूर्ण होतात. पतंगाचा प्रादुर्भाव जाणून घेण्यासाठी वेलवर्गीय पिकांचे वेळोवेळी निरिक्षण करणार आहे. नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला जाईल. पहिल्या टप्प्यातील फळ काढणी करताना प्रतवारी, वॅक्स कोटिंग आणि पॅकिंगवर विशेष भर दिला जाईल. साधारणतः नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढणी सुरू होईल. माझ्या अनुभवानुसार पहिल्या टप्प्यातील मूल्यवर्धनामुळे अधिक दर मिळण्यास मदत होते. अशा फळांना हरियाना, अमृतसर, कोलकता येथील बाजारात चांगली मागणी असते. - ऋषिकेश सोनटक्के, ९६६५५९८५३७