शेतकरी ः सचिन अरुण लांजेकर
गाव ः रत्नागिरी (जि.रत्नागिरी)
हापूस आंबा ः ५० एकर (२५०० झाडे)
माझी रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे ५० एकर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. नैसर्गिकरीत्या आंबा पिकवून ग्राहकांना देण्याचा माझा प्रयत्न असतो. हंगामामध्ये साधारण २० हजार पेटी आंबा मुंबई, पुण्यासह अन्य मोठ्या शहरांतील बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो. तसेच ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बॉक्स पॅकिंगमधून आंबा विक्री केली जाते.
व्यवस्थापनातील बाबी
हंगाम संपल्यानंतर जूनच्या अखेरीस झाडांना सेंद्रिय आणि रासायनिक खते दिली जातात. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, लेंडीखत, जिवामृत यांचा वापर होतो. उपलब्धतेनुसार शेणखत किंवा लेंडीखत २ मोठी घमेली, जीवामृत ५ लिटर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये अर्धा ते १ किलो प्रति झाड याप्रमाणे दिले जाते. ऑगस्ट महिन्यात बागेतील गवत काढून बाग स्वच्छ केली जाते. ऑक्टोबर महिन्यात पुन्हा आवश्यकतेनुसार तणनियंत्रण केले जाते. मोहोर येण्यास साधारण ऑक्टोबरमध्ये सुरुवात होते. आलेल्या मोहोरावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आवश्यकतेनुसार शिफरशीत बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते. यंदा अवकाळी पावसामुळे अधिक काळ फवारणी करावी लागली. अजूनही मोहोर येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. तर काही झाडांवर वाटाण्याएवढ्या आकाराच्या कैऱ्या लागल्या आहेत. सध्या तापमान वाढत असून, मागील चार दिवसांपासून उष्णतेच्या लाटा जाणवत आहेत. त्यामुळे आंबा भाजून गळून पडत आहे. पहिल्या टप्प्यात तयार झालेला आंबा घळाच्या साह्याने काढण्याचे काम सुरू आहे. काढलेले आंबा त्वरित सावलीमध्ये ठेवला जाईल. कारण उन्हामुळे फळांत साका तयार होण्याची शक्यता असते. आंबा तोडताना देठ तुटणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तुटलेल्या देठातून चीक बाहेर येऊन फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. वजनानुसार दर्जेदार आंब्याची प्रतवारी केली जाईल. साधारण १३० ते ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन अशा सहा ग्रेडमध्ये आंब्याची प्रतवारी केली जाते. प्रतवारीनंतर लाकडी पेट्यांमध्ये ४ ते ९ डझन प्रमाणे आंबा भरून बाजारपेठेमध्ये पाठविले जाईल. थेट विक्री करताना ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बॉक्स पॅकिंगमध्ये आंबा पाठविला जातो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५ डझनांच्या एका पेटीला २ ते ७ हजारांपर्यंत दर मिळत होता. - सचिन लांजेकर, ९४२२४३२७०७, ८८०६४६६६५०