शेतकरी नाव ः ऋषिकेश सोनटक्के गाव ः टाकरखेडा मोरे, ता. अंजनगावसुर्जी, अमरावती एकूण क्षेत्र ः १६ एकर संत्रा क्षेत्र ः १२ एकर (१३०० झाडे) माझी १६ एकर शेती असून, त्यापैकी १२ एकरांवर संत्रा लागवड आहे. एकूण १३०० झाडांपैकी वडिलोपार्जित सुमारे ४३ वर्षांची २०० झाडे, २० वर्षाची २०० झाडे, १८ वर्षांची ४०० झाडे आहेत. मी २०१८ मध्ये इंडो-इस्राईल पद्धतीने ६ बाय ३ मीटर अंतरावर ५०० झाडांची लागवड केली आहे. या पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या ५५५ तर पारंपरिक पद्धतीमध्ये ती फक्त २७८ इतकीच असते. बागेतील ४३ वर्षाच्या २०० झाडांवर मृग बहर, तर उर्वरित सर्व झाडांवर आंबिया बहराचे नियोजन केले आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संत्रा बागेचे व्यवस्थापन करत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बागेचे व्यवस्थापन केल्यामुळे फळांचे दर्जेदार उत्पादन मिळत आहे. मागील १० दिवसांतील व्यवस्थापन
बाग ताणविरहित ठेवण्यासाठी बागेत वाढलेले तण ग्रास कटरच्या साह्याने काढून टाकले. बागेत पडलेली फळे कीड-रोगांच्या प्रसाराला पूरक ठरतात. अशी फळे गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली. पतंगाच्या अंडी, अळी आणि कोष या अवस्था वेलवर्गीय वनस्पतींवर उदा. गुळवेल, वासनवेल, चांदवेल यावर पूर्ण होतात. पतंगाचा प्रादुर्भाव जाणून घेण्यासाठी वेलवर्गीय पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करणार आहे. नियंत्रणासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केला जाईल. पहिल्या टप्प्यातील फळांची काढणी करण्यात आली. प्रतवारी, वॅक्स कोटिंग आणि पॅकिंगवर विशेष भर देण्यात आला. प्रतवारी ए, बी आणि सी अशा तीन ग्रेडमध्ये करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मूल्यवर्धनामुळे जादा दर मिळण्यास मदत होते. अशा फळांची पंजाब, ओडिशा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल या भागात विक्री करण्यात आली. पुढील २० दिवसांतील कामकाज
फळे तोडल्यानंतर संत्रा झाडे विश्रांती अवस्थेत जातात. झाडांना अधिक विश्रांती मिळण्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार फवारणी केली जाईल. झाडांना चांगल्या पद्धतीने ताण मिळावा, याकरिता झाडाची खोडांपासून तीन फूट माती उकरून घेतली जाईल. बागेमध्ये वखराच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत केली जाईल. झाडावरील वाढलेल्या फांद्या (सल) आरी किंवा कात्रीच्या साह्याने काढल्या जातात. वापरापूर्वी आरी किंवा कात्री निर्जंतुक केली जाईल. वाळलेली सल, काड्या काढून जाळून नष्ट केल्या जातील. शंखी गोगलगायींपासून झाडाचे संरक्षण होण्यासाठी खोडावर तीन फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावली जाईल. ताण तोडण्याच्या १० दिवसआधी सिंगल सुपर फॉस्फेट, शेणखत, निंबोळी खताची मात्रा दिली जाईल. खतांची मात्रा झाडापासून २ ते ३ फूट अंतरावर दिली जाईल. हलक्या जमिनीमध्ये ३० दिवस तर भारी ते मध्यम जमिनीमध्ये ४० ते ४५ दिवस ताण देणे आवश्यक आहे. योग्य पानगळ झाल्यानंतर झाडाला पाणी दिले जाईल. पाणी देण्यासाठी साधारण पंचवीस ते तीस टक्के पानगळ अपेक्षित असते. पाणी सुरू करण्याच्या १ ते २ दिवस अगोदर संत्रा झाडांना पुरेशी अन्नद्रव्ये देणे गरजेचे असते. त्यात नत्र ५०० ग्रॅम स्फुरद २ किलो, पालाश ४०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रॅम याप्रमाणे दिली जाईल. - ऋषिकेश सोनटक्के, ९६६५५९८५३७