शेतकरी : देवेंद्र ज्ञानेश्वर झापडेकर गाव : राहणार रत्नागिरी आंबा क्षेत्र : १२ एकर (७०० झाडे) आमची वडिलोपार्जित १२ एकरांवर हापूस आंबा बाग आहे. त्यामध्ये साधारण ५० ते ६० वर्षे वयाची १ हजार झाडे आहेत. ही लागवड रत्नागिरी तालुक्यात हातखंबा, फणसवळे या ठिकाणी आहे. हापूस आंब्यासोबतच काजूची थोडीफार लागवड आहे. योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर बागेतून अधिक उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. हंगामात साधारणपणे ५ हजार पेटी आंबा विक्रीसाठी बाजारात पाठविला जातो. या वर्षीचे नियोजन
ऑगस्ट महिन्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश खतांच्या मात्रा प्रतिझाड ४ ते ५ किलो याप्रमाणे मात्रा दिल्या. सोबतच बाजारपेठेमध्ये उपलब्ध सेंद्रिय खते प्रतिझाड १० ते १२ किलो प्रमाणे दिली जातात. उपलब्धतेनुसार शेणखत, गांडूळ खत दिले जाते. त्यानंतर १५ जून ते १५ ऑगस्ट यादरम्यान पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला. साधारण ऑक्टोबरमध्ये काही झाडांवर मोहोर येण्यास सुरुवात झाली. पाऊस, ढगाळ वातावरणामुळे मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी फवारणी घेण्यात आली. पावसाचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबरमध्ये बागेत वाढलेले गवत ग्रासकटरच्या साह्याने काढून टाकले. झाडावर चढलेल्या वेली काढून बागेची साफसफाई केली. या वर्षी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत बुरशीनाशक आणि कीटकनाशकांच्या पाच फवारण्या घ्याव्या लागल्या. साधारणपणे पौष महिन्यात आलेल्या मोहोरास कणी सेटिंग कमी होते. झाडांना पोषक घटकांची उपलब्धता चांगली होत असल्यामुळे फुटवेही चांगले येतात. थंडी कायम राहिल्यामुळे आलेला मोहोर टिकून राहण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे आलेला पुनर्मोहर काढून टाकला जातो. कणी सेटिंगवर दव पडत असल्यामुळे आवश्यकतेनुसार बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. कडाक्याच्या थंडीमुळे झाडांना चांगला मोहर आला. एका फांदीला साधारण ३ ते ४ फूट आले. पहिल्या टप्प्यातील मोहर टिकून राहण्यासाठी फवारणी घेतली. त्यामुळे कणीचे सेटिंगही चांगले होते. मात्र अवकाळी पावसामुळे ४० टक्के गळ झाली. त्यातील शिल्लक राहिलेल्या फुटीवर सध्या कैऱ्या दिसत आहेत. त्या वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या फळे सुपारीच्या आकाराची झाली आहेत. वातावरण बदलामुळे काळी पडलेली कैरी काढून टाकली जाईल. आंबा काढणीयोग्य तयार होईपर्यंत झाडाचे सतत निरीक्षण केले जाईल. साधारण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फळे काढणीस तयार होतील. तयार फळे झेल्याच्या साह्याने काढली जातील. फळे तोडताना १ ते दीड सेंमी देठ राहील याची काळजी घेतली जाईल. प्रतवारी आणि वजनानुसार विक्रीसाठी लाकडी पेट्या तयार केल्या जातात. साधारण ५ डझनांची एक लाकडी पेटी तयार केली जाते. तसेच थेट विक्री करण्यासाठी पुठ्ठ्यांचे बॉक्स तयार केले जातात. दरवर्षी साधारण ५ ते ६ हजार हापूस आंबा पेट्यांची विक्री केली जाते. विक्री मुंबई, पुणे, अहमदाबाद येथील बाजार समितीमध्ये केली जाते. - देवेंद्र झापडेकर, ७०२००२४२४२