वने ही जैवविविधतेचे आगर आहेत. हे लक्षात घेता बी.एस्सी. (ऑनर्स) वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण आणि करियरच्या संधी आहेत. वनांची किंवा वनवृक्षांची तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. या लागवडीतून उत्पादित मालावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या सर्व क्षेत्रांचे शिक्षण वनशास्त्र अभ्यासक्रमात दिले जाते. हवामान बदलाचे परिणाम सुसह्य करण्यासाठी किंबहुना ते कमी करण्यासाठी वनांची कार्बन शोषून आणि धरून ठेवण्याची क्षमता सर्वात जास्त उपयुक्त ठरत आहे. वनांचे हे महत्त्वाचे कार्य असल्याची जाणीव होऊन वनसंपदा टिकवून ठेवण्याची आणि वाढवण्याची आवश्यकता सगळ्यांनाच कळून चुकली आहे. वने ही जैवविविधतेचे आगर आहेत. हे लक्षात घेता बी.एस्सी. (ऑनर्स) वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण आणि करियरच्या संधी आहेत.कागद, काही प्रकारचे कापड, मध, डिंक, अनेक प्रकारची औषधे यांच्यासाठी आपण अजूनही वनांवर अवलंबून आहोत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सरकारी वने असून त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र वनविभाग आहे. वनांची किंवा वनवृक्षांची तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. या लागवडीतून उत्पादित मालावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. या सर्व क्षेत्रांचे शिक्षण वनशास्त्र अभ्यासक्रमात दिले जाते. अभ्यासक्रमाची वैशिष्टे
अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा असून व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केला गेला आहे. कृषी विद्यापीठातील कृषी, उद्यानविद्या इत्यादी अभ्यासक्रमांशी समकक्ष आहे. संपूर्ण भारतात हा अभ्यासक्रम सुमारे वीस कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्रातील चारपैकी दोन कृषी विद्यापीठांत उपलब्ध आहे. बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पात्र आहेत. मात्र त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, बायोलॉजी असे विषय बारावी तसेच सी.ई.टी. साठी असणे आवश्यक आहे. चार वर्षांत सहा महिन्यांचे एकूण आठ सेमिस्टर असतात. त्यापैकी पहिल्या चार सेमिस्टरमध्ये वनशास्त्राशी संबंधित विविध विषय शिकवले जातात. पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये अनुभव शिक्षणाचे घटक असतात. यात वनरोपवाटिका, लाकूड प्रक्रिया, इतर वनोपज प्रक्रिया, कृषिवानिकी आणि निसर्गपर्यटन असे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. यापैकी एकात प्रत्यक्ष काम करून आलेल्या अनुभवातून विद्यार्थी भविष्यात आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल अशी तयारी करून घेतली जाते. सातव्या सेमिस्टरला वनकार्यानुभव असतो. त्यात प्रामुख्याने सरकारी वनातील, वन-आधारित उद्योगातील आणि समाजकार्यातील कामकाजाची पद्धत यांचा अनुभव दिला जातो. आठव्या सेमिस्टरला प्रत्येक विद्यार्थी एक संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्यावर आधारित प्रबंध सादर करतो. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळवण्यासाठी, स्वयंरोजगार निर्मितीसाठी तसेच संशोधन कार्यात सहभागी होण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये देण्याचा प्रयत्न केला जातो. वनशास्त्रातील पदवीधर वनविभागात राज्य लोकसेवा आयोगाकडून भरल्या जाणाऱ्या विविध पदांकरिता तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून भरल्या जाणाऱ्या भारतीय वनसेवा पदांकरिता पात्र असतात. महाराष्ट्र शासनाने सध्या परिक्षेत्र वन अधिकारी या पदासाठी वनशास्त्र पदवीधरांना पाच टक्के आरक्षण दिले आहे. त्यात वाढ करून दहा टक्के तसेच सहाय्यक वन संरक्षक या पदासाठीसुद्धा दहा टक्के आरक्षण देण्याची कार्यवाही राज्य शासन स्तरावर सुरू आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात संधी आहेत. पदवीनंतर एमबीए करून वेगळ्या क्षेत्रात जाता येते किंवा कृषी/उद्यानविद्या यातील पदव्युत्तर पदवी घेता येते. भारतात काही मोजक्या विद्यापीठांत असे पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम चालतात. शिवाय परदेशातही अशा शिक्षणाची संधी आहे. वनशास्त्र, वन्यजीवशास्त्र, जैवविविधता संवर्धन, अभयारण्य व्यवस्थापन अशा अनेक विषयात असे शिक्षण घेता येते. उच्चविद्याविभूषित वनशास्त्र विद्यार्थ्यांना संशोधन संस्था, विद्यापीठे, लाकूड आयात-निर्यात व्यवसाय, फर्निचर तसेच प्लायवूड कंपन्या, त्यांच्याशी संबंधित मार्केटिंग कंपन्या, वृक्ष आणि बांबू लागवड कंपन्या, वनांचे आणि वनोपजांचे प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था आणि पर्यावरण विषयात काम करणाऱ्या विविध बिगर-सरकारी संस्थांमध्ये संधी आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये वनशास्त्र घटक महाविद्यालय आहे. सध्या पदवीसाठी एकूण बत्तीस जागा आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतासह एकूण पाच देशांत तसेच भारतातील पंधरा राज्यांत उच्च शिक्षण घेतले आहे. यातल्या सुमारे दहा विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील किंवा त्या त्या विद्यापीठाच्या, संस्थेच्या प्रवेश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून प्रवेश मिळवलेला आहे. त्यांना भारतीय तसेच परदेशी शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. पन्नासहून अधिक शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यामध्ये फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट, डेहराडून तसेच सोलन, त्रिचूर, कोइंम्मतूर इथल्या कृषी विद्यापीठांचा समावेश आहे. एकंदरीत १६ विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. काही विद्यार्थांनी नोकरी तसेच व्यवसायामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. महाविद्यालयाचे विविध संस्थांशी सामंजस्य करार आहेत तसेच वनविभागाशी सहकार्याचे संबंध ठेवले आहेत. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल (www.almashines.com/cfor) सुरू केले आहे. - डॉ. विनायक पाटील, ९४२३८७७२०६ (वनशास्त्र महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)