खरडछाटणी ः पूर्वतयारी आणि व्यवस्थापन

सध्या विविध वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागेमध्ये तापमान वाढीचा अनुभव येत आहे. याच परिस्थितीत बागेतील आर्द्रताही कमी होत असल्यामुळे द्राक्ष वेलींना काही अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेगवेगळ्या अवस्थेतील बागेत पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.
चारी घेताना ३० टक्क्यांपेक्षा अधिक मुळे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
चारी घेताना ३० टक्क्यांपेक्षा अधिक मुळे तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

सध्या विविध वाढीच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष बागेमध्ये तापमान वाढीचा अनुभव येत आहे. याच परिस्थितीत बागेतील आर्द्रताही कमी होत असल्यामुळे द्राक्ष वेलींना काही अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेगवेगळ्या अवस्थेतील बागेत पुढील प्रमाणे उपाययोजना कराव्यात. खरडछाटणी पूर्वतयारी  काही बागांमध्ये फळकाढणी अंतिम टप्प्यात असेल. याच तुलनेत आगाप फळछाटणी घेतलेल्या बागेत फळकाढणी सुमारे एक महिन्यापूर्वीच झाली असावी. या बागेत खरडछाटणीसुद्धा लवकर घ्यावी लागते. कारण पुन्हा आगाप फळछाटणीकरिता काडीची परिपक्वता होणे गरजेचे असते. अशा बागेत खरडछाटणीची पूर्वतयारी करणे महत्त्वाचे असेल. चारी घेणे  खरडछाटणीच्या पूर्वी १५ दिवस आधी चारी घ्यावी. ही चारी घेताना वेलीच्या खोडापासून ८ ते ९ इंच जागा सोडून २ फूट रुंद व तीन ते चार इंच खोल असावी. ही चारी घेतेवेळी बोदामधील ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुळे तुटणार नाही, याची दक्षता घ्यावी. यापेक्षा जास्त मुळे तुटल्यास वेलीवर ताण बसून ओलांड्यावर फुटी निघण्यास विलंब होईल. फुटी मागेपुढे निघतील. वेलीचा हा ओलांडा जितका जास्त वेळ प्रखर अशा सूर्यप्रकाशात राहील, तितका तो डागाळण्याची समस्या दिसून येईल. ओलांडा डागाळण्याकरिता सूर्यप्रकाश या घटकासोबत उघडी राहिलेली वेलीची मुळेही तितकीच कारणीभूत असतात. ही परिस्थिती टाळण्याकरिता बागेत चारी घेतल्यावर त्वरित शेणखत व शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांची उपलब्धता करून चारी मातीने झाकून घ्यावी. वेलीला पाण्याची पूर्तता करून घ्यावी. या वेळी चारीच्या तळातील क्षेत्र पूर्णपणे ओले करून घ्यावे. असे केल्याने तयार झालेल्या बोदातील वातावरण थंड राहील व मुळे सुकण्याची समस्या राहणार नाही. मुळे जास्त काळ उन्हात उघडी राहिल्यास मुळांच्या पेशी सुकून काही प्रमाणात मरतील. यामुळे नवीन मुळे तयार होण्यास उशीर लागेल. खरडछाटणी घेतल्यानंतर डोळे फुटण्यास सुरुवात होईल व डोळ्यामधून निघत असलेल्या फुटीकरिता आवश्यक ती अन्नद्रव्ये मिळणार नाहीत. म्हणजेच वेलीची गरज आणि उपलब्धता यामध्ये समतोल नसल्यास पुढील काळात वेलीवर ताण बसून अडचणी निर्माण होतील.  खत व्यवस्थापन बागेत शेणखताचा वापर करताना ते पूर्ण कुजलेले असेल, याकडे लक्ष द्यावे. साधारणतः ९ बाय ५ फूट अंतरावरील दोन वेलींच्या मध्यभागी दोन घमेले शेणखत टाकणे गरजेचे असेल. रासायनिक खतामध्ये स्फुरदयुक्त खताची उपलब्धता करणे आवश्यक आहे.  खरडछाटणीनंतर ३० ते ६० दिवसांच्या कालावधीत सूक्ष्म घडनिर्मिती होण्याकरिता स्फुरदाची आवश्यकता असते.  सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दिलेले स्फुरद सावकाश उपलब्ध होते. या वेळी शेणखतासोबत स्फुरदाची उपलब्धता करावी. जुन्या बागेत ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रति वेलीची गरज असेल, तर नवीन बागेमध्ये २०० ते २५० ग्रॅम प्रति वेल पुरेसे होईल. हलकी जमीन असल्यास २५ किलो नत्र (युरिया ५० किलो प्रति एकर या माध्यमातून) देता येईल. भारी जमीन असल्यास २५ ते ३० किलो युरिया पुरेसा होईल. यासोबत ५० किलो डीएपी, १० किलो फेरस सल्फेट, १५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ५ किलो झिंक सल्फेट प्रति एकर प्रमाणे चारीत टाकलेल्या शेणखतामध्ये मिसळून घ्यावे. त्यावर माती टाकून बोद तयार करून घ्यावेत. यामुळे तयार झालेल्या बोदामध्ये हवा खेळती राहून पांढरी मुळे तयार होण्यास पोषक वातावरण तयार होईल.  प्रत्यक्ष छाटणी खरडछाटणीचा अर्थ ‘प्रत्येक काडी एक डोळा राखून छाटणे’ असा होतो. बऱ्याच बागेमध्ये ओलांड्यावर काडीची जाडी कमी अधिक दिसून येते. अशा काड्यावर निघालेली फूटही मागेपुढे निघते. ही परिस्थिती दरवर्षी अनुभवास येते. मात्र यावर उपाययोजना करायची तर वर दोन ते तीन डोळे राखून छाटणी न घेता फक्त तळातील एक डोळा राखून छाटणी घ्यावी. हा डोळा फुटण्याकरिता थोडा वेळ लागेल. मात्र पुढील काळातील अडचणी कमी होतील. बऱ्याच बागेत डागाळलेल्या ओलांड्यावर कमी अधिक फुटी निघालेल्या दिसतील. अशा स्थितीत वेलीवर काड्यांची आवश्यक ती संख्या पूर्ण होत नाही. म्हणजेच कॅनॉपी पुरेशी नसते. पुढील काळात बागेत उद्‍भवू शकणारी ही अडचण टाळण्यासाठी डागाळलेला ओलांड्याचा भाग कापून घ्यावा व नवीन ओलांडा तयार करावा. काही परिस्थितीत मागील हंगामातील काडीसुद्धा नवीन ओलांडा म्हणून वापरता येईल. ही काडी वापरण्याच्या दृष्टीने डागाळलेला ओलांड्याचा काप घेतल्यानंतर याच काडीला तारेवर बांधून घ्यावे. या काडीची लांबी चार ते पाच पेऱ्यापेक्षा जास्त नसावी.  जर ओलांडा ८० टक्क्यांपेक्षा जास्त डागाळलेला असल्यास ज्या ठिकाणी आपण पंजा मारला होतो, त्या ठिकाणी काप घेऊन नवीन ओलांडा तयार करून घ्यावा. अशा स्थितीतील ओलांड्यावरील फुटी लवकर निघणार नाहीत. तेव्हा या बागेतील व्यवस्थापन वातावरणात तापमान कमी आणि आर्द्रता जास्त असल्याच्या स्थितीमध्ये करावे. बागेत शक्यतो मोकळे पाणी देऊन आर्द्रता वाढवण्याचा प्रयत्न करावा.  हायड्रोजन सायनामाइडचा वापर  बऱ्याच वेळा खरडछाटणीनंतर डोळे आपोआप फुटतात म्हणून हायड्रोजन सायनामाइडच्या वापराची गरज नाही, असा बागायतदारांचा समज असतो. मात्र या वेळी तापमान जास्त व आर्द्रता कमी असल्यामुळे डोळे फुटण्यास अडचणी येतात. तेव्हा किमान २० ते २५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे त्याचा वापर करावा. ज्या बागेत आपण नवीन ओलांडा तयार करण्याकरिता मागील हंगामातील काडी वापरली आहे, अशा बागेत फक्त जुन्या ओलांड्यावर त्याचा वापर करावा. नव्या काडीवरील वापर टाळावा. यामुळे दोन्ही काडींवरील डोळे एकसारखे फुटण्यास मदत होईल. ज्या भागात तापमान जास्त आहे, अशा बागेत ओलांड्यावर सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान पाण्याची फवारणी करावी. ही फवारणी खरडछाटणीच्या चौथ्या दिवसापासून १२ ते १४ दिवसांपर्यंत केल्यास फुटी निघण्यास चांगली मदत होते. यापूर्वी बागेत वापरलेले शेडनेट तशीच राखली असल्यास बागेतील तापमान कमी होऊन आर्द्रता वाढण्यास मदत होते. डोळे लवकर फुटतात. - डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८  (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com