द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात घड निर्मितीचे तंत्र
यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पाऊसही सुरू झाला आहे. १५ एप्रिल नंतर उशिरा खरड छाटणी केलेल्या द्राक्षबागेत घड निर्मितीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पाऊसही सुरू झाला आहे. १५ एप्रिल नंतर उशिरा खरड छाटणी केलेल्या द्राक्षबागेत घड निर्मितीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. यापूर्वी २००५ मध्ये अशीच स्थिती उद्भवली होती. त्यावेळी राज्यातील एकूण द्राक्ष बागांपैकी ७० टक्के द्राक्ष बागांमध्ये घडनिर्मिती कमी झाली होती. मात्र माझ्या स्वतःच्या बागेमध्ये खालील पद्धतीने नियोजन केल्यामुळे घड निर्मितीस अडचण आली नव्हती. १५ एप्रिल नंतर उशिरा छाटलेल्या बागेत सध्या घड निर्मितीचा कालावधी आहे. या कालावधीत घडनिर्मितीकरिता सूर्यप्रकाश सर्वांत महत्त्वाचा ठरतो. मात्र ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाश कमी आहे. जो काही सूर्यप्रकाश उपलब्ध होतो, तो सर्व पानांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने योग्य तितकी काडी संख्या ठेवली पाहिजे. सामान्यतः आपण प्रति चौरस फुटास एक अशी काडी बाबर पद्धतीच्या मांडवात ठेवतो. त्या ऐवजी सव्वा ते दीड चौरस फुटास एक काडी असे प्रमाण पानांच्या छोट्या मोठ्या आकारानुसार ठेवावी. म्हणजे पानांचे एकावर एक असे दोन तीन थर तयार न होता जास्तीत जास्त पाने एका थरात राहतील. सूर्यप्रकाश कमी असला तरी पानांची एकमेकावर सावली पडणार नाही. सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळेल ज्यावेळी एकावर एक थर पानांचे होतात त्या वेळा दुसऱ्या तिसऱ्या थरातील पानांना सूर्यप्रकाश कमी मिळून दुसऱ्या व तिसऱ्या थरातील काड्यांच्या डोळ्यात घडनिर्मिती कमी होते. उदा. नऊ बाय पाच फूट अंतरात ४५ चौरस फूट होतात. नेहमीच्या पद्धतीत ४५ काड्या ठेवल्या जातात. त्याऐवजी पाने छोटी असल्यास ३६ काड्या व पाने मोठी असल्यास तीस काड्या ठेवाव्यात. म्हणजे घड निर्मिती वाढते. सामान्य परिस्थितीत प्रत्येक काडीस सबकेनच्या मागेपुढे मिळून पंधरा पाने आल्यावर शेंडा बंद केला जातो. अशा वेळी काड्या एकमेकावर पडून खालील पाने सावलीत येतात. मात्र उन्हे भरपूर असल्यामुळे एकमेकावर पडलेल्या पानांमुळे पानांचे दोन थर तयार झाले तरी घडनिर्मिती चांगलीच होते. कमी सूर्यप्रकाशाच्या स्थितीत अडचण येते. काडीला सबकेनच्या मागील व पुढील पाने मिळून बारा तेरा पाने असताना शेंडे बंद करावेत. शेंडे बंद करतांना शेंड्याकडील लहान पान बोटाच्या नखाएवढे छोटे असतानाच शेंडा बंद करावा. म्हणजे काड्या एकमेकावर लवकर न पडता उभ्या राहतात. पानांचे दोन थर तयार होत नाही. ढगाळ पावसाळी हवामानात सूर्यप्रकाशाच्या कमतरतेबरोबरच पावसामुळे फुटीचा जोम वाढत असतो. अशा वाढलेल्या जोमामुळे घड निर्मिती कमी होते. जोम नियंत्रित ठेवण्यासठी माती व पर्णदेठ परीक्षणाच्या अहवालानुसार स्फुरद व पालाश द्यावे.
- वासुदेव काठे, ९९२२७१९१७१ (दाभोळकर प्रयोग परिवार, महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रगतीशील द्राक्ष बागायतदार.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.